Kolhapur News : देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती गेल्या पंधरा दिवसांपासून स्थिर आहेत. सध्या व्यापाऱ्यांकडून मागणी फारशी नसल्याने कारखानेही मोठ्या प्रमाणात साखर विक्रीस काढत नसल्याचे चित्र आहे. दसऱ्याची खरेदी सुरू झाल्यानंतर दरात काहीशी वाढ होईल अशी शक्यता आहे. सध्या तरी गरजेइतक्या साखरेची खरेदीच सुरू असल्याने साखरेच्या किमती सरासरी ३७०० रुपयांच्या आसपास स्थिरावल्या आहेत.
ऑगस्टच्या मध्यापर्यंत साखर दर सातत्याने वाढत होते. साखरेची एमएसपी (किमान विक्री मूल्य) ३१०० रुपये प्रति क्विंटल आहे. जुलैच्या अखेरपर्यंत ३२०० ते ३३०० रुपयांपर्यंत साखरेचे दर वाढले. याच दरम्यान अनेक संस्थांनी पुढील वर्षी साखर कमी उत्पादित होईल असा अंदाज व्यक्त केला. याचा परिणाम बाजारावर झाला. भविष्यात दर वाढतील या अपेक्षेने व्यापाऱ्यांनी साखरेच्या खरेदीला प्राधान्य दिले.
३३०० ते ३४०० ने साखर खरेदी केल्यास दसरा दिवाळीच्या दरम्यान चढ्या दराने साखर विक्रीचे नियोजन व्यापाऱ्यांचे होते. साखरेचे देशांतर्गत बाजारात दर वाढत असल्याचे लक्षात येताच केंद्र सरकारने यात लक्ष घातले. सातत्याने विक्रीचा आढावा घेऊन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातच पुन्हा दोन लाख टनांनी विक्री कोटा वाढवला. यामुळे झपाट्याने वाढणाऱ्या साखरेच्या किमतीला ब्रेक लागला. केंद्र शासन सातत्याने हस्तक्षेप करत असल्याने व्यापाऱ्यांनीही सावध भूमिका घेत साखर खरेदीला हात आखडता घेतला.
सप्टेंबर महिन्यात मागणी ऑगस्टच्या महिन्याच्या तुलनेत कमी असली तरी दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मात्र दरात पुन्हा फारशी घसरण झाली नाही. कारखान्यांनी भविष्यात चांगला दर मिळेल या अपेक्षेने विक्रीही मर्यादित ठेवली आहे. सध्या बाजारात फक्त गरजेइतकी साखरच खरेदी केली जात असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
अनेक कारखान्यांनी धीम्या गतीने दिलेले साखर कोटे संपविण्याकडे लक्ष दिले आहे. सध्या तरी आम्ही जितकी मागणी आहे तितक्या दराने साखर विक्री करत आहोत. सध्या तरी दर जेवढे अपेक्षित होते, तितके मिळत नसल्याचे कारखानदारांनी सांगितले.
येत्या दोन महिन्यांत दसरा, दिवाळी आहे. सप्टेंबरच्या तुलनेत जर कमी कोटा केंद्राने दिला तर साखरेच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. देशातील हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होत असला, तरी प्रमुख ऊस उत्पादक राज्याची नवी साखर बाजारात येण्यास नोव्हेंबर उजाडतो. यामुळे केंद्र शासन ऑक्टोबरचा कोटा किती देते यावर दराचेही गणित अवलंबून असेल.
देशात ऑक्टोबरच्या पूर्वार्धात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. असे झाले तर ऊसतोडणी विलंबाने होऊ शकते. यंदाचा हंगाम सुरू होईपर्यंत जेवढी साखर आवश्यक आहे तितकी साखर देशात असल्याने कृत्रिम भाववाढ होऊन साखरेचे दर आवाक्याबाहेर जाणार नाहीत, असे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. दसरा, दिवाळीत नैसर्गिक मागणी वाढल्याने दरात निश्चित वाढ होईल. याचा फायदा कारखानदारांना होईल, असा आशावाद साखर उद्योगाला आहे.
राज्य एस ग्रेड एम ग्रेड
महाराष्ट्र ३६५५ - ३६८० ३७५५ -३७८०
उत्तरप्रदेश - ३७७० -३८७५
गुजरात ३६५१-३७०१ ३७५१- ३७९१
मध्य प्रदेश ३७८०-३७९० ३८३०-३८६०
पंजाब - ३९६०-४०७१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.