नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून परराज्यात जाणाऱ्या भाजीपाल्याच्या वाहतुकीस रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाने अडथळा निर्माण झाला आहे. जादा रेल्वे डबे उपलब्ध होत नसल्याने नाशिक रोड स्टेशनवर भाजीपाला खराब होत आहे.
भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी जादा डबाप्रश्नी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व खासदार हेमंत गोडसे थेट रेल्वे मंत्रालयात या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाबाबत तक्रार करणार आहेत. तसेच जादा डबे त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रतन चावला यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेद्वारे पाठविण्यात येतो. उत्तरेकडील राज्यात जाणारा बहुतांश भाजीपाला येथील शेतकरी रेल्वेने पाठविण्यास अग्रक्रम देतात. नाशवंत असल्याने जनतेपर्यंत हा शेतीमाल जलद पोचला तरच शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना जादा भावही मिळतो. या स्थानकावरून दररोज किमान २०० टन शेतमाल पाठविण्यात येतो. त्यासाठी रोज पाच डब्यांची गरज असताना रेल्वे विभाग ही सुविधा देण्यास टाळाटाळ करतो. तसेच बड्या व्यापाऱ्यांसाठी ५६ डब्यांचा संपूर्ण रॅक उपलब्ध करून दिला जात आहे.
रेल्वे मंत्रालयाने शेतीमालासाठी डबे उपलब्ध करून न दिल्याने जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रतन चावला यांच्यामार्फत खासदार चव्हाण आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर मांडली. दोन्ही खासदारांनी रेल्वेच्या भुसावळचे डी. आर. एम. यादव तसेच वाणिज्य अधिकारी नाईक व जनरल मॅनेजर साकेत मिश्रा, मध्य रेल्वेचे ए. जी. अग्रवाल यांना ही समस्या सोडविण्याबाबत निर्देश दिले. मात्र, दोन्ही खासदारांच्या या आवाहनाकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत आहे.