राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल ः खडसे
नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. केळी उत्पादक कधीही सरकारपुढे मदतीसाठी येत नाहीत. केळी लागवडीवर होणारा खर्चही मोठा आहे. गारपिटीच्या संकटामुळे हे शेतकरी दोन वर्षे उभे राहू शकणार नाहीत, असे असताना राज्य सरकार हेक्टरी १८ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची टिंगल करीत आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी (ता. १९) केली.
दरम्यान, या लक्षवेधीला उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आजच्या आज बैठक घेऊन विशेष बाब म्हणून केळी उत्पादकांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सभागृहाला दिले.
त्याआधी आमदार हरिभाऊ जावळे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे केळीच्या बागांचे ५०० कोटींचे मोठे नुकसान झाले. याबाबत शासनाकडे मागणी करूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. शेजारील मध्य प्रदेश सरकारप्रमाणे सरकारने नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी``
राज्यमंत्री कांबळे म्हणाले, ‘‘एनडीआरअफच्या निकषांनुसार केळी उत्पादकांना हेक्टरी १८ हजार रुपये मदत मिळते. शेतकऱ्यांच्या पशुधन दगावले असल्यास तसेच रस्त्यांच्या कामांसाठीही तातडीने मदत दिली जाईल.``
खडसे म्हणाले, केळी लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च होतो. या संकटातून उभे राहण्यासाठी शेतकऱ्यांना दोन वर्षे लागतील, अशी स्थिती आहे. ``
या वेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार म्हणाले, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या दोघांवर नेहमी तुलनात्मक अन्याय होतो. सध्या केळी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नुकसान झाले आहे. त्या नुकसानीला भरीव अशी तरतूद करावी, अशी मागणी आहे.