हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ५६ हजार ३९५ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी प्रस्तावित आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात २० टक्के घट तर सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध व्हावेत, यासाठी विविध पिकांच्या १ लाख १० हजार ८७४ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात ३ लाख ५७ हजार ६३५ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ३ लाख ५६ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असे गृहीत धरण्यात आले आहे. गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झाल्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा कापूस लागवड क्षेत्रात ११ हजार २२ हेक्टरने घट होऊन ४३ हजार ६८४ हेक्टरवर लागवड होईल असे गृहीत धरण्यात आले आहे.
सोयाबीनच्या क्षेत्रात २५०० हेक्टरने वाढ होऊन यंदा २ लाख ३० हजार ५१८ हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. तुरीची ४६ हजार ९९७, मुगाची १२ हजार ४७२, उडिदाची ८ हजार ९२, ज्वारीची १० हजार २६, मक्याची २६२३, तिळाची २३१ हेक्टरवर पेरणी होईल असा अंदाज आहे.
महाबीजकडे ७३४२.१३ क्विंटल आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे मिळून एकूण १ लाख १० हजार ८७४.९७ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारीचे ७५१, मुगाचे ७४८, तुरीचे ३८७७, कपाशीचे १०९२, मक्याचे ११८, तिळाचे ५.८४, सोयाबीनच्या १ लाख ३ हजार ७३३ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.
खरीप हंगामासाठी विविध ग्रेडच्या ५८ हजार १२० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर झाला आहे. यामध्ये युरिया १७ हजार २६०, डीएपी १० हजार ८१०, पोटॅश ४ हजार, एनपीके १७ हजार ३४०, सुपर फाॅस्फेट ८७१० टन खतांचा समावेश आहे. गतवर्षीचा १५ हजार ७९१ टन खतसाठा शिल्लक आहे असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.