भंडारा जिल्ह्यातील ६२ गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. सन २०१८-१९ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ६२ गावांसाठी ५४ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी ही मंजुरी दिली असून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व शौचालय बांधकामासाठी ३० कोटी ८३ लक्ष निधी मंजूर केला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च २०१५ मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. मागील २ वर्षांत केवळ संसद आदर्श ग्राम व गुणवत्ता बाधित गावांमध्येच योजना घेण्याचे केंद्र सरकाचे निर्देश होते. लोणीकर यांनी याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्र शासनाने सन २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणीपुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी दिली व त्याप्रमाणे सन २०१८-१९ चा आराखडा तयार करण्यात आला.
या आराखड्यामध्ये प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यातील विधानसभा, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व जवळपास १०० पेक्षा जास्त सरपंच या सर्वांनी सातत्याने पाणीपुरवठा योजनांची मागणी केली. या योजना राबविण्यासाठी एकूण २३ कोटी ४१ लक्ष रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. यामुळे २ वर्षांच्या कालखंडानंतर या वर्षी हा जंबो आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मागील योजनांसाठी ३ कोटी १८ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन व चालू असणाऱ्या अशा ७१ गावे-वाड्यांसाठी ६२ योजनांसाठी एकूण रु. २६ कोटी ५९ लक्षचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आलेला आहे.