पंढरपुरात वारकऱ्यांना पाण्याची बाटली, बटाटा चिवडा मोफत
पंढरपूर : आषाढी वारीमध्ये यंदा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून पहिल्यांदाच वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटर आणि बटाटा चिवडा पाकिटाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील काही स्वयंसेवी, सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ लाख मिनरल वॉटरच्या बाटल्यांची व्यवस्था झाली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली. त्यांनी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तयारीची पाहणी केली. या वेळी ते बोलत होते.
डॉ. भोसले म्हणाले, "आषाढी यात्रेसाठी १२ ते १३ लाख वारकरी पंढरपुरात येतात. हा अंदाज घेऊन प्रशासनाकडून त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. वारीच्या काळात २० ते २३ जुलैदरम्यान पाण्याच्या बाटल्या आणि बटाटा चिवड्याची पाकिटे वारकऱ्यांना दिली जाणार आहेत. राज्यातील विविध भागांतून यंदा प्रथमच १ हजार स्वयंसेवक स्वच्छता व मंदिर समितीस आवश्यक असलेली मदत करणार आहेत.``
‘‘या बरोबरच कराडच्या कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे एक पथक दर्शनरांगेतील वारकऱ्यांसाठी कार्यरत असेल. गरजू वारकऱ्यांच्या तपासणीसह औषधेही तिथेच दिली जातील. दर्शनरांगेचा विचार करून गोपाळपूर परिसरात शेवटच्या टोकाला १० पत्राशेडही उभारले आहे,`` असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
पाण्याची बाटली आणि चिवडा पाकिटे मिळणारी ठिकाणे मंदिर परिसर, दर्शनरांग, चंद्रभागा वाळवंट, बस स्थानक, ६५ एकर परिसर