वेळ अमावस्या उत्साहात साजरी
उस्मानाबाद : शेतातील उत्पादनात समृद्धी व भरभराट होण्याची मनोकामना व्यक्त करीत काळ्या आईची मनोभावे विधिवत पूजा करून जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी (ता. १७) वेळ अमावास्या शेतकऱ्यांनी उत्साहात साजरी केली.
शेतातील पांडवांची, पिकांची पूजा करून शेतकरी कुटुंबीयांनी मित्रपरिवारांसह वनभोजनाचा आनंद घेतला. वेळ अमावास्येमुळे बहुतांश नागरिक शेतात गेल्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये दुपारनंतर अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती होती.
जिल्ह्यात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वेळ अमावास्या शेतकरी कुटुंबीय मोठ्या उत्साहात साजरी करतात. रब्बीच्या पेरणीनंतर येणारी सातवी अमावास्या वेळ अमावास्या म्हणून जिल्ह्यातील शेतकरी साजरी करतात.
या सणाची शेतकरी गेल्या तीन-चार दिवसांपासून तयारी करीत होते. शेतात कडब्याच्या पेंढ्यांनी कोप तयार करून त्यात पांडवांची स्थापना केली जाते. पाच दगड एकत्रित करून त्याला गेरू (काव) आणि चुन्यांनी रंगविले जाते. कोपी घालणे, पांडवांना रंगविण्याचे काम गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांनी पूर्ण केले. रविवारी सकाळी कुटुंबातील कर्ता व्यक्ती अांबिलचे माठ घेऊन पायी शेताकडे दाखल झाले. त्यानंतर अनेक कुटुंबांनी पारंपरिक बैलगाडीतून शेत गाठले. त्यानंतर शेतात पांडव, पिके, लक्ष्मीचे पूजन शेतकरी कुटुंबीयांनी केले.
पूजनानंतर मित्रपरिवारांसह वनभोजनाचा आनंद घेतला. बाजरी व ज्वारीपासून केलेले उंडे, भात, शेंगाच्या पोळ्या, खीर, विविध पालेभाज्यांपासून तयार केलेली भज्जी, माठातील थंडगार अांबिल असा जेवणाचा बेत होता.
वेळ अमावास्येमुळे जिल्ह्याच्या विविध भागांतील शेतशिवारे महिला, पुरुष, मुलां-मुलींनी गजबजून गेले होते. त्यामुळे शहरे मात्र दुपारनंतर ओस पडल्याचे चित्र होते. उस्मानाबादेतील बाजारपेठेही दुपारनंतर बंद होती.
दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबीय बैलगाडीने शेताकडे गेले होते. शहरी भागातील कुटुंबीय, मित्रपरिवार मात्र चारचाकी वाहनांतून शेताकडे जात होते. त्यामुळे जीप, सहा आसनी रिक्षा, मालवाहू टेंपोला रविवारी मोठी मागणी होती.