cold
cold  
मुख्य बातम्या

निफाडला २.४ अंश तापमान; राज्य थंडीने गारठले

टीम अॅग्रोवन

पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. शुक्रवारी (ता. १७) यंदाच्या हंगामातील नीचांकी २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत निफाड येथे हुडहुडी वाढून अक्षरश: कापरं भरलं. तर, नाशिक, जळगाव, धुळे आणि मराठवाड्यातील उस्मानाबादही चांगलेच गारठले आहे. आज (ता.१८) मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. किमान तापमानाचा पारा १० अंशांपेक्षा खाली येऊन, सरासरीच्या तुलनेत तापमानात ४.५ अंशांची घट झाली असेल तर, त्या भागात थंडीची लाट आल्याचे समजले जाते. शुक्रवारी (ता.१७) निफाड येथील गहू संशोधन केंद्रातील वेधशाळेत हंगामातील नीचांकी २.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. यापूर्वी २७ डिसेंबर २०१८ रोजी निफाड येथे १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी (ता. १७) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथे ६, धुळे येथे ६.६, जळगाव ७ अंश तर तापमानाची नोंद झाली. तर पुणे, नगर, मालेगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद येथे तापमान १० अंशांच्या खाली आले असून, विदर्भात मात्र तापमानाचा पारा ११ अंशांच्या पुढे होता. जळगाव, उस्मानाबाद येथे किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ अंशांची घट झाल्याने थंडीची लाट होती. शुक्रवारी (ता. १७) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ८.२ (-३), नगर ९.२ (-३), धुळे ६.६, जळगाव ७.०(-५), कोल्हापूर १४.५(-१), महाबळेश्वर १०.०(-३), मालेगाव ८.२ (-३), नाशिक ६.० (-४), सांगली १४.० (०), सातारा १०.२ (-३), सोलापूर १५.७ (-१), अलिबाग १२.९ (-५), डहाणू १४.५ (-३), सांताक्रूझ ११.४ (-६), रत्नागिरी १४.१ (-५), औरंगाबाद ८.१ (-४), परभणी १२.७ (-२), नांदेड ११.५ (-२), उस्मानाबाद ९.७ (-५), अकोला १२.४ (-२), अमरावती १४.० (-१), बुलडाणा ११.४ (-३), चंद्रपूर १६.२ (१), गोंदिया १३.६ (०), नागपूर १५.१ (१), वर्धा १७.६ (४), यवतमाळ १४.४ (-१). द्राक्षपीक सल्ला : सध्या कमाल आणि किमान तापमानातील तफावत मोठी आहे. तसेच थंडीचे प्रमाण वाढले आहे. मण्यात पाणी उतरण्याच्या परिस्थितीत ज्या पांढऱ्या द्राक्ष जाती आहेत, तेथे पिंक बेरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.  उपाययोजना ः

  • पहाटेच्या वेळी बागेत तापमान वाढविण्यासाठी शेकोटी करून धूर करावा.
  • बोदावर पाचटाचे आच्छादन करावे. यामुळे मुळांच्या परिसरातील तापमान वाढेल.
  • बागांना जास्तीचे पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीचे किमान १ ते २ अंश सेल्सिअस तापमान वाढते.
  • द्राक्षघड पेपरने झाकावेत. त्या अगोदर भुरीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी. 
  • - डॉ. आर. जी. सोमकुंवर,  संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

    हवामान सल्ला 

  • गेल्या दोन दिवसांत थंडीचा कडाका वाढला आहे. जेव्हा तापमान ८ अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाते,तेव्हा त्याचा प्रतिकूल परिणाम पिकांच्या वाढीवर होतो. सध्या द्राक्ष, कांदा, हरभरा, गहू पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. द्राक्ष मणी फुटत आहेत. 
  • सध्याची थंडी लक्षात घेता फळबागांमध्ये पहाटे शेकोट्या करून धूर करावा. त्यामुळे काही प्रमाणात तापमान वाढेल. तसेच पिकांना संध्याकाळी पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीचे तापमान फारसे थंड होणार नाही.
  • - डॉ. रामचंद्र साबळे,  ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT