जिल्हा परिषदेत मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर
जळगाव : वडगाव येथील अंगणवाडीत निकृष्ट दर्जाच्या शेवया आढळून आल्यानंतरही जिल्हा परिषदेने अद्यापही दाखल न केलेला गुन्हा, चहार्डी येथे अंगणवाडीत आढळून आलेला निकृष्ट दर्जाचा पोषण आहार, जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे रखडलेले नियोजन आदी विषयांवरून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी बुधवारी (ता. २५) जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. या सभेत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा प्रस्तावही मंजूर झाला. एक तास उशिराने सुरू झालेली सभा रात्री आठपर्यंत सुरूच होती.
ही सभा अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण समितीचे सभापती पोपट भोळे, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, आरोग्य सभापती दिलीप पाटील, बांधकाम समिती रजनी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे उपस्थित होते.
पोषण आहाराचे प्रकरण दडपल्याचा आरोप
वडगाव येथील अंगणवाडीत निकृष्ट दर्जाच्या शेवया आढळून आल्याबाबत मागील सभेत झालेल्या पुरवठादारावर गुन्हा दाखल करून पुरवठा थांबविण्याबाबतच्या महिनाभरातील कार्यवाही संबंधीची विचारणा सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली. हे प्रकरणही दडपले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, नाना महाजन यांनीही दिवेकर यांना धारेवर धरले. गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासन बालकांच्या मरणाची वाट पाहताय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
बालकल्याण आयुक्तांच्या परवानगीनंतर गुन्हा दाखल करणार
बुरशीयुक्त शेवयांचे नमुने सादर करूनही प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही होत नाही. या नमुन्यांचे अहवाल काय आलेत? पुरवठादारांकडून करारानुसार भरपाई केली का? गुन्हा दाखल करण्यास कुणाचा अडथळा आहे, संबंधितांची नावे उघड करण्याची मागणी रावसाहेब पाटील यांनी केली. यासाठी आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे दिवेकर यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांची प्रश्नांनी केली कोंडी गेल्या तीन महिन्यांपासून ‘डीपीडीसी''कडून १२० कोटी रुपयांच्या निधीचे नियतव्यय प्राप्त झाले आहेत. मात्र त्याबाबत प्रशासनाकडून नियोजन झाले नसल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची कोंडी केली. याबाबत कॉँग्रेसचे प्रभाकर सोनवणे, शिवसेनेचे नानाभाऊ महाजन, प्रताप पाटील, गोपाळ चौधरी व राष्ट्रवादीचे शशिकांत साळुंखे व अन्य सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.