Rains will hit tur productivity
Rains will hit tur productivity 
मुख्य बातम्या

तूर उत्पादकतेला पावसाने फटका बसणार

टीम अॅग्रोवन

पुणे : देशात यंदा तूर लागवड क्षेत्रात वाढ झाली. मात्र तूर उत्पादक पट्ट्यांमध्ये मागील १० ते १५ दिवस पावसाने थैमान घातले. त्यामुळे पिकाला मोठा फटका बसला असून महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्पादकतेला फटका बसण्याची शक्यता जाणकार आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. उत्पादकतेला १० ते १५ टक्के फटका बसेल, असा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

दिल्ली येथील शेतीमाल बाजार विश्लेषक आणि संशोधक राहुल चौहान म्हणाले, की तूर उत्पादक राज्यांतून पिकाचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक शेतकरी आणि व्यापारी यांनी दिली आहे. यात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये जास्त नुकसान असल्याची माहिती आहे. वास्तविक पाहता तुरीचे पीक तयार होऊन डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात बाजारात येईल. बहुतेक ठिकाणी पीक अजून फुलोऱ्याच्या अवस्थेतही नाही. मात्र, तुरीच्या झाडांना पावसाने फटका बसत आहे. त्याचा परिणाम पुढील काळात उत्पादकतेवर बसण्याची शक्यता आहे.  

देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये जवळपास ५० टक्के तुरीचे क्षेत्र आहे. नेमके याच दोन्ही राज्यांतील तूर उत्पादक जिल्ह्यांमध्ये पावसाने नुकसान झाले. दोन्ही राज्यांमध्ये पीक लागवडीनंतर १५ जून ते १५ जुलै या काळात पावसाने ताण दिल्याने वाढीवर परिणाम झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अचानक पावसाचे प्रमाण वाढल्याने पीक काहीसा फटका बसला. 

कर्नाटकात कलबुर्गी जिल्ह्यात तुरीची लागवड मोठ्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. या जिल्ह्यात ७.५० लाख हेक्टरवर खरिपाची लागवड असून तब्ब्ल ५.५० लाख हेक्टरवर तुरीचे पीक आहे. या जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांत पावसाने थैमान घातले. नद्या आणि नाल्यांच्या शेजारील शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पीक जवळपास आठवडाभरापेक्षा जास्त काळ पाण्यात राहिले. त्याचा परिणाम पिकावर झाला आहे. सखल भागात पाणी साचून राहिल्याने समस्या आणखी वाढली आहे. पाणी शेताबाहेर जात नाही तोपर्यंत पिकाचे नुकसान होतच राहील.  महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात तुरीचे प्रामुख्याने उत्पादन होते. सप्टेंबरच्या शेवटी पावसाने केलेली सुरुवात अद्यापही काही भागांत कायम आहे. 

अकोला आणि वाशीम जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी अजूनही शेतात कामासाठी वाफसा नाही. ठिकठिकाणी तूर पाण्यात उभी आहे. नदी, ओढे, तळ्यांकाठची तूर अद्यापही पाण्यात आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत तुरीच्या पिकाला कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यांत पीक जास्त प्रभावित झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कलबुर्गी जिल्ह्यात मोठा फटका कलबुर्गी जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात पावसाची दडीने पिकाची स्थिती बिकट आणि आता पावसाचा परिणामही होत असल्याने नुकसान वाढले आहे. येथील तूर उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या भागात यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा आठवडाभरापेक्षा अधिक काळ पाऊस लागून आहे. अनेक ठिकाणी पीक सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अनेक ठिकाणी पाने पूर्ण गळून पडली आहेत, असे कलबुर्गी तूर उत्पादक संघाने म्हटले आहे.  

असे झाले नुकसान

  • ७ ते १० दिवस पाणी साचून राहिल्याने पीक पिवळे पडले
  • नदीकाठच्या भागांत शेतातून पाणी कमी होत नसल्याने पीक सडण्याची भीती
  • उथळ भागात पावसाच्या पाण्याबरोबर माती आणि पीकही वाहून गेले
  • सततचा आणि वाऱ्यामुळे अनेक भागांत पीक आडवे झाले
  • ढगाळ हवामानामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव
  • आमच्या भागात गेल्या १० ते १५ दिवासांपासून तूरीच्या पिकाची मोठी हानी केली. सखल भागात पाणी साचून असल्याने पीक हातचे जाते की काय याची भीती वाटत आहे. पाणी साचून असलेल्या शेतातील तुरीला शेंगा येतात की नाही आणि आल्या तर किती येतील, याची चिंता आहे.  - गणेश सोमाणी,  तूर उत्पादक शेतकरी, अकोला

    पावसामुळे सोयाबीनसह तुरीच्या पिकालाही मोठा फटका बसला. माझ्या २० एकर क्षेत्रात तूर आहे. त्यापैकी नदीकाठच्या १० एकरांतील पिकाचे नुकसान झाले आहे. किती उत्पादन मिळेल सांगता येत नाही.  - मुरलीधर गोरे, तूर उत्पादक शेतकरी, बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी

    सरसकट जास्त नुकसान नाही. मात्र,नदीकाठच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे निश्चितच उत्पादकतेवर परिणाम होईल. कर्नाटक आणि महाराष्ट्रात उत्पादकतेत १० ते १५ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, पुढील काही दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल. - नितीन कलंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, कलंत्री फूड प्रोडक्ट्स, लातूर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

    Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

    Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

    Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

    Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

    SCROLL FOR NEXT