नामपूर बाजार समिती संचालक मंडळाला बरखास्तीची नोटीस 
नामपूर बाजार समिती संचालक मंडळाला बरखास्तीची नोटीस  
मुख्य बातम्या

नामपूर बाजार समिती संचालक मंडळाला बरखास्तीची नोटीस 

टीम अॅग्रोवन

नाशिक : सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री कामकाजात शेतकऱ्यांना अडचणी होत्या. यात संचालकांनी हस्तक्षेप न केल्याने शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक व शारीरिक नुकसान झाल्याने व कामकाजात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी गुरुवारी (ता.२६) बरखास्तीची नोटीस बजावली. 

नामपूर बाजार समितीमध्ये काही नव्या व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदीचा परवाना मंजूर करण्यात आला. दरात स्पर्धा व्हावी हा उद्देश असताना नव्या व्यापाऱ्यांना जुना व्यापाऱ्यांचा विरोध असल्याचे दिसून आले. त्यानुसार नव्या व्यापाऱ्यांना अप्रत्यक्षपणे विरोध दाखवीत जुन्या व्यापाऱ्यांनी लिलावातून काढता पाय घेऊन लिलाव बंद ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत रस्ता रोकोही केला होता. तरीही बाजार समिती व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. 

शेतकऱ्यांना भांडवलाची गरज असल्याने बाजार समितीत साडेसहाशे ते सातशे ट्रॅक्टर कांदा लिलावासाठी आले होते. मात्र या दिवशी अवघे दीडशे ट्रॅक्टरचा लिलाव झाला. तर बाकी वाहने तशीच राहिल्याचे चित्र होते. या दिवशी शेतकऱ्यांना किमान १५०० तर कमाल ४१०० रुपये दर मिळाला. मात्र शिल्लक ट्रॅक्टरचे लिलाव होऊ न शकल्याने शेतकऱ्यांना येथेच थांबून रात्र काढावी लागली होती. दुसऱ्या दिवशी लिलाव झाले. मात्र दरात काही अंशी घरसन होऊन शेतकऱ्यांना दरात फटका बसला. मनमर्जी व दर पाडण्याचा प्रकार यावेळी घडला. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समितीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार या सर्व बाबींची दखल घेत कलम २९ नुसार कर्तव्यात कसूर केल्याचा संचालक मंडळावर ठपका ठेवून जिल्हा उपनिबंधकांनी गुरुवारी संचालक मंडळ बरखास्त करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस बाजार समितीला बजावले आहे. 

कृषी व पणन कायद्यातील कलम २९ अन्वये ही नोटीस बजावण्यात आली असून संचालकांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपस्थित राहून आपले म्हणणे यावर मांडावे लागणार आहे.  प्रतिक्रिया बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करण्यासाठी व्यवस्था असायला हवी. शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित रहावेत. शेतमालाचा लिलाव पार पाडण्याची सर्व जबाबदारी संचालक मंडळाची असतानाही ती पूर्ण केली गेली नाही. ज्या कारणामुळे लिलाव बंद राहिले, आशा घटकांना नोटीस का दिली नाही, किंवा संबंधित कार्यवाही केली नाही, त्यामुळे बाजार समिती बरखास्त करण्याची नोटीस बजावली आहे.  - सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक, नाशिक 

काही कुप्रथा बाजार समितीमध्ये आहेत. त्या मोडीत काढायला हव्यात, तरच शेतकऱ्यांच्या हिताचे कामकाज होऊ शकेल. ही सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापन व त्यानंतर प्रशासनाची असते. त्यामुळे असे प्रकार घडत असतील तर कारवाई योग्य आहे. शेतमाल विक्रीत स्पर्धा व्हायला हवी तरच बाजार समित्यांच्या कामाचा खरा अर्थ आहे.  - सुनील पवार, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT