जळगाव ः कर्जमाफीचा लाभ सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना झाल्याचा दावा प्रशासन करीत असले, तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कमच प्राप्त झालेली नाही. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे कर्जखाते अजूनही एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) मध्येच दिसत असून, त्यांना नव्याने कर्ज मिळण्याची शक्यताही कमीच आहे.
जिल्ह्यात सुमारे ६४० कोटी रुपये कर्जमाफीसंबंधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे दावे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले होते. कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी सोसायट्यांमध्ये आली. ज्यांचे कर्ज दीड लाखांवर होते, त्यांनी दीड लाखांवरील रक्कम उसनवारी करून बॅंकेत भरली. परंतु, या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कमच आलेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी चार-पाच महिन्यांचे व्याजही भरले आहे. हे व्याजही त्यांना मिळालेले नाही. कर्जमाफीची रक्कम शासनाकडून आलेली नाही, अशी उत्तरे संबंधित बॅंकेचे अधिकारी देतात.
जोपर्यंत शासन कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या कर्जखात्यात जमा करणार नाही तोपर्यंत त्यांचे खाते एनपीएबाहेर येणार नाही. खाते एनपीए नसेल तर नव्याने कर्ज कसे देणार, असे बॅंकेचे अधिकारी शेतकऱ्यांना सांगत असल्याची माहिती मिळाली.
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना २५ टक्के सवलत अंतर्गत कमाल २५ हजार व किमान १५ हजार रुपये देण्याचे म्हटले आहे. परंतु जिल्ह्यातील सुमारे ६५ हजार नियमित कर्जदारांना ही रक्कम मिळालेली नाही. एका सोसायटीमधील सरासरी सुमारे पाच ते सातच नियमित कर्जदारांना ही रक्कम मिळू शकली आहे. यामुळे नियमित कर्जदारही संभ्रमात असून, त्यांना ही रक्कम मिळेल केव्हा, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात कर्जवाटपही संथगतीने सुरू आहे. कर्जाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असून, राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्जवितरण गतीने सुरू व्हावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सोसायट्यांमध्ये सचिव येत नाहीत. कर्जासाठी सात बारा उतारा जमा करण्याचे कामही व्यवस्थित सुरू नाही.
सध्या शेतीची मशागत सुरू आहे. ट्रॅक्टरने मशागतीसाठी निधीची गरज आहे. तसेच पुढे बियाणे, मजुरीसाठी पैसे लागतील. नवा हंगाम उभा करण्याची वेळ आली तरी हाती कर्जाची रक्कम बॅंकांनी दिलेली नसल्याने शेतकरी आणखीच अडचणीत आला आहे, असे आसोदा येथील शेतकरी किशोर चौधरी यांनी म्हटले आहे.