पुणे ः खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासू नये, यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या दीड महिन्यात उद्दिष्टाच्या १६९८ कोटी ४२ लाख ७६ हजार रुपयांपैकी ५४७ कोटी ९० लाख ९० हजार रुपये म्हणजेच ३२ टक्के पीककर्ज वाटप केले असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या वर्षी पाच मे अखेरपर्यंत १५४७ कोटी ८४ लाख ५८ हजार रुपयांपैकी ७६ हजार १४९ सभासदांना ५६३ कोटी ६४ लाख ९२ हजार रुपये म्हणजेच३६ टक्के पीककर्जाचे वाटप केले गेले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीककर्जाच्या वाटपात चार टक्क्यांनी घट झाली असल्याचे दिसून येते. मात्र, येत्या दोन महिन्यांत कर्जवाटपात आणखी वाढ होणार आहे.
यंदा खरीप हंगामात सुमारे दोन लाख ३० हजार ८२६ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील शेतकरी भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भूईमूग, तीळ, कारळा, सुर्यफूल, सोयाबीन, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. याशिवाय, फळभाज्या, फळपीके, ऊस, फुलपिकांची लागवडदेखील होते.
या पिकांच्या लागवडी, पेरणी करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येतात. या अडचणीवर मात करण्यासाठी अनेक शेतकरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या तालुकास्तरीय शाखांमार्फत, गावपातळीवरील सहकारी सोसायट्यामार्फत पीककर्ज घेतात.
जिल्ह्यात बॅंकेच्या जवळपास २७५ शाखा असून त्याला गावपातळीवरील सहकारी सोसायट्या जोडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बॅंकेची खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० एवढी आहे. त्यापैकी जवळपास दोन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यत शून्य टक्के व्याजदराने तर तीन लाखांच्या पुढे सहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जात आहे.
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, सोयाबीन, सुर्यफूल, कापूस, ऊस, हरभरा, फळबाग, भाजीपाला पिकांना पीककर्जाचा पुरवठा केला जात आहे. या कर्जातून शेतकरी खते, बियाणे खरेदी तसेच नांगरणी, वखरणी आदी कामे करतात.