नाशिक : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या यंदाच्या नाशिक विभागाच्या आराखड्यास विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिली. यात आतापर्यंत उच्चांकी ११०० गावांची निवड करण्यात आली आहे. चालू वर्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी जास्त गावांची निवड झाल्याने जलपरिपूर्ण होण्याची संधीही जास्त गावांना मिळणार आहे. या गावांसह विभागातील ३७८७ गावांना जलयुक्त शिवार योजनेमुळे संजीवनी मिळणार आहे. त्यापैकी पहिल्या तीन टप्प्यांतील सुमारे २६०० गावे जलपरिपूर्ण झालेली आहेत.
जलयुक्त शिवार योजनेचा पहिला टप्पा २०१५-१६ मध्ये राबविण्यात आला. यात नाशिक विभागातील ९४१ गावांचा समावेश करण्यात आला होता. २०१६-१७ या दुसऱ्या टप्प्यात ९०० तर २०१७-१८ या तिसऱ्या टप्प्यात ८४६ गावे निवडली गेली होती.
पहिल्या टप्प्यात निवडलेल्या गावांत ६१० कोटी ५० लाख रुपये निधी खर्चून ३६ हजार कामे करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातही ५१३ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीतून २४ हजार कामे, तर तिसऱ्या टप्प्यांतही २२ हजार कामांवर ५०९ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी खर्च झाला होता. आतापर्यंतच्या तिन्ही टप्प्यांत विभागात २६८७ गावांत ८२ हजारांपेक्षा जास्त कामांवर सुमारे १६३३ कोटी ७० लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे.
‘जलयुक्त’च्या निधीतून कामे झालेली बहुतांश गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावाही सरकारने केला आहे. ‘जलयुक्त’च्या चौथ्या टप्प्यांसाठी नाशिक विभागातील तब्बल ११०० गावांची निवड झाली आहे. जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्या परवानगीने व विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांच्या प्रयत्नांतून नाशिक विभागात जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट गावांची संख्या वाढली आहे. या गावांची निवड नुकतीच निश्चित झाली आहे. काही जिल्ह्यांतील सर्व गावे आता ‘जलयुक्त’ची लाभार्थी ठरली आहेत.