Article on Govind Hande : कृषी आयुक्तालयातील सेवानिवृत्त तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांचे नुकतेच निधन झाले आहे. कृषिमाल निर्यातीत त्यांचे अतुलनीय योगदान पाहता त्यांच्या निधनाने सर्वसामान्य शेतकरी, आयात-निर्यातदार, शीतगृह-पॅकहाऊस चालक या सर्वांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. कृषी विभागात त्यांनी आपल्या वेगळ्या कार्यशैलीने चांगलाच ठसा उमटविला होता. एक अभ्यासू, मितभाषी, अतिसंवेदनशील अधिकारी अशी त्यांची ओळख होती.
सुरुवातीच्या काळात निविष्ठा गुणनियंत्रण तसेच भौगोलिक मानांकन यात काम करून त्यांनी शेतीमाल निर्यात कामात स्वतःला वाहून घेतले होते. शेतीमालाचे निर्यातक्षम उत्पादन ते प्रत्यक्ष निर्यात यात शेतकरी निर्यातदारांना कोणतीही समस्या उद्भवली तर हातातील सर्व कामे बाजूला सारून त्यांच्या समस्या सोडविण्यास हांडे यांचा प्राधान्यक्रम असायचा. शेतकऱ्यांच्या, निर्यातदारांच्या प्रत्यक्ष अडचणींतून त्यांनी शेतीमाल निर्यात प्रक्रियेत अपेडाच्या साहाय्याने अनेक सुधारणा केल्या. शेतीमाल निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ, सुटसुटीत आणि विश्वासार्ह करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असायचे.
द्राक्ष, आंबा, भाजीपाला यांच्या निर्यातीत कीडनाशके उर्वरित अंशाचे (रेसिडयू) अधिक प्रमाण यामुळे आपला शेतीमाल ‘रिजेक्ट’ होत असे. शेतकऱ्यांच्या थेट नुकसानीबरोबर यामुळे जागतिक बाजारात देशाचेही नाव खराब होत होते. यातूनच ग्रेपनेट, अनारनेट, मॅंगोनेट, व्हेजनेट अशा फळे-भाजीपालानिहाय निर्यातीच्या ‘फूल प्रुफ’ व्यवस्था निर्माण करण्यात हांडे याचा मोलाचा वाटा राहिला आहे. या व्यवस्थेत निर्यातक्षम शेतीमाल उत्पादकांच्या नोंदणीपासून ते निर्यातीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन होते.
यातून निर्यातीतील कीडनाशके उर्वरित अंशांची समस्या मार्गी लागली असून राज्यात अनेक शेतकरी निर्यातदार तयार झाले आहेत. एवढेच नव्हे फायटो सॅनिटरी प्रमाणीकरण, फ्रुटनेट या प्रणालीच्या माध्यमातून शेतीमाल निर्यातीत जगाचा विश्वास संपादन करण्यात आप यशस्वी झालो आहोत. अपेडा या देशाच्या प्रमुख निर्यात संस्थेची राज्याच्या कृषी विभागाशी समन्वय साधण्याचे महत्त्वाचे कार्य एक दशकाहून अधिक काळ हांडे यांनी केले. यातून त्यांची कामाप्रति निष्ठा आणि सर्वसमावेशकता दिसून येते.
निवृत्तीनंतरही हांडे कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक संस्थांवर सल्लागार म्हणून काम करीत असल्याने शेतकरी आणि त्यांच्यातील स्नेहाचा धागा कधी तुटला नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते शेतकऱ्यांना मार्गदर्शनाच्या कामात सक्रिय राहिले. अलीकडे ॲव्होकॅडो या नवीन फळपिकाला येथील मातीत रुजविण्यासाठी हांडे यांचे प्रयत्न सुरू होते. हे फळपीक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी राज्यभर दौरे सुद्धा केले होते.
महाराष्ट्र ॲव्होकॅडोच्या निर्यातीचे मोठे केंद्र बनू शकते, असे त्यांचे म्हणणे होते. नव उद्योजकांना मोघम काहीतरी सांगण्यापेक्षा उद्योग-व्यवसायातील बारकावे ते सांगत असत. एखाद्या उत्पादनाची निर्मिती करायची, असे नव उद्योजकाने त्यांना सांगितल्यावर ते त्या उत्पादनाचा ‘मार्केट स्टडी’ केला का? म्हणून विचारायचे.
तसे कोणी केले नाही तर आधी हा अभ्यास करून या, असा सल्ला ते द्यायचे. निर्यातीसाठी अत्यावश्यक असलेली सर्व मानके त्यांना मुखोद्गत होती. त्यांच्या पुढाकारामुळेच राज्यातील प्रमुख निर्यात जिल्ह्यांच्या ठिकाणी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात) फायटो सॅनिटरी अधिकारी ही कृषी अधिकारी संवर्गातील पदे निर्माण झाली आणि त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
देशात महाराष्ट्र राज्य शेतीमाल निर्यातीत आघाडीवर असले तरी जागतिक बाजारात देशाचा वाटा खूप कमी आहे. निवृत्तीच्या अगोदर आणि नंतरही त्यांना याबाबत खंत वाटत होती. विभागामध्ये कृषी निर्यातीसाठी स्वतःहून पुढाकार घेणारे अभ्यासू अधिकारी निर्माण होत नाहीत, असेही ते बोलून दाखवत असत. कृषी विभागात निर्यातीत अभ्यासू अधिकारी तयार होऊन शेतीमालाची निर्यात वाढविणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.