वाशीम ः जिल्ह्यात रविवारी (ता. १३) सर्वदूर जोरदार पाऊस झाला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिकांचे नुकसानही झाले आहे.
रविवार रात्री मालेगाव तालुक्यातील पांगरी शिवारात जोराचा पाऊस झाला. पावसामुळे या गावशिवारात पिकांची नासाडी झाली आहे. पांगरी नवघरे येथील मदन नवघरे यांच्या चार एकरातील उडिदाचे नुकसान झाले. यंत्रणांनी तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. पांगरीच्या आजूबाजूला असलेल्या अमानी, खडकी मसला या गावांमध्ये सुद्धा मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे शेतातील सोंगणी केलेले उडिदाचे पीक पाण्यात ओले झाले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी शेंगामधून कोंब फुटू लागले आहेत. प्रशासनाने झालेल्या नुकसानाची तत्काळ पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामेश्वर नवघरे यांनी केली आहे. वाशीम जिल्ह्यात रविवारी सर्वदूर पावसाची नोंद झाली आहे. प्रामुख्याने वाशीम तालुक्यात ६१.९ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. याशिवाय रिसोड तालुक्यात सरासरी ५०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. प्रामुख्याने आॅगस्टपासून पाऊस सातत्याने हजेरी देत असल्याने पिकांचे नुकसान होण्याची चिन्हे तयार झाली आहे. कारंजा, मालेगाव तालुक्यात काही भागात ओल्या दुष्काळाची मागणी शेतकरी करीत आहेत. सततच्या पावसामुळे मूग, उडीद या पिकांचे तर नुकसान झालेच शिवाय आता काढणीसाठी तयार होत असलेल्या सोयाबीनलाही फटका बसण्याची चिन्हे वाढली आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.