दीड महिन्यापासून वऱ्हाडात तप्त उन्हाच्या झळा
अकोला ः वऱ्हाडातील तीन ही जिल्ह्यांना गेल्या दीड महिन्यापासून तप्त उन्हाचा जोरदार तडाखा बसला अाहे. याची झळ उन्हाळी पीक उत्पादनालाही बसत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघू शकलेला नाही.
वऱ्हाडात १५ एप्रिलपासून उन्हाच्या झळा वाढायला सुरवात झाली. दिवसाचे सरासरी तापमान हे ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत राहत अाहे. चालू अाठवड्यात तर तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान राहत अाहे. वाढत्या उन्हामुळे संत्रा, केळी, लिंबू या फळबागांना फटका बसला आहे. सोबतच उन्हाळी भुईमूग, भाजीपाला पिकेही या उन्हाची झळ सहन करू शकलेली नाहीत.
भुईमूगासारखे हक्काचे पीक यावर्षी अनेकांना उत्पादन खर्चही देण्यापुरते अालेले नाही. या पिकाची वाढ होऊनही झाडांना शेंगा लागल्या नव्हत्या. केळी बागांमध्ये अनेक ठिकाणी झाडे वाळली. पानांवर करपा दिसून अाला. घडसुद्धा काही ठिकाणी हे तीव्र उन्हाचा तडाखा सहन करू शकले नाही.
उन्हामुळे पिकांसाठी पाण्याची मागणी वाढली तर दुसरीकडे पाणी पुरेसे नसल्याने पिकांची तहान भागवताना शेतकऱ्यांची मोठी अोढाताण होत अाहे. प्रामुख्याने केळीसारख्या पिकाला पाणी देताना इतर पिकांकडे दुर्लक्ष करावे लागते अाहे. पाणी कमी झाल्याने व वाढलेले तापमान लक्षात घेता शेतकरी या हंगामात केळी लागवड कमी प्रमाणात करतील असा अंदाज व्यक्त होत अाहे.
भाजीपालावर्गीय पिकांना तर दररोज पाणी द्यावे लागत अाहे. दिवसाच्या तापमानात पाणी देणे पिकासाठी पोषक नसल्याने तसेच भारनियमन होत असल्याने अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत अाहेत.
वऱ्हाडात बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत कापसाचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. बुलडाणा जिल्ह्यात घाटाखालील तालुके व अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात प्री-मॉन्सून कपाशी लागवड केली जाते. सध्याच्या तापमानामुळे अद्याप शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही. सिंचनासाठी पाणी नसल्याचे दुसरे कारणही यामागे अाहे.