नगर ः जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू आहेत. या ठिकाणी आतापर्यंत १७ हजार ७९६ क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. हरभरा विक्री करण्यासाठी आतापर्यंत ७ हजार २३० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग कार्यालयातून देण्यात आली.
जिल्हाभरात हरभऱ्याचे यंदा सरासरीपेक्षा जास्त क्षेत्र आहे. त्यामुळे यंदा हरभऱ्याचे भरघोस उत्पादन मिळाले. मात्र हरभऱ्याची बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करत असल्याने सरकारने खरेदी केंद्रे सुरू करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दर दिवशी होणारी आवक आणि मिळणाऱ्या दराची माहिती संकलित करून जिल्ह्यात हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्याची परवानगी मागितली होती.
जिल्हाभरात साधारण दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी अपेक्षित आहे. सध्या तूर खरेदी केंद्र सुरू आहे, तेथेच हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ११ ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र आतापर्यंत यापैकी चार ठिकाणी हरभरा खरेदी सुरू असून तेथे १ हजार ६२५ शेतकऱ्यांकडून १७ हजार ७९६ क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. हरभरा विक्रीसाठी आतापर्यंत जवळपास ७ हजार २३० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, असे जिल्हा पणन अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हरभरा विक्रीबाबतच्या अडचणी समजून घेत नाफेडने खरेदी केंद्रे सुरू केली आहे. येथे जास्तीत जास्त हरभरा खरेदी करण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी ११ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू होणार असली तरी आतापर्यंत नगर येथील ५२ शेतकऱ्यांकडून ६१८, नेवासा येथील ५ शेतकऱ्यांकडून ७८, श्रीगोंदा येथील ३४९ शेतकऱ्यांकडून २९०० तर खर्डा (ता. जामखेड) येथील १२१९ शेतकऱ्यांकडून १४ हजार २०० क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. जिल्हाभरात सुमारे दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी केला जाणार असली तरी खरेदीची सद्यःस्थिती पाहता खरेदीला वेग येत नसल्याचे चित्र आहे.