जळगाव : जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे उडीद, मूग व सोयाबीनच्या रिकाम्या क्षेत्रामध्ये हरभऱ्याची अधिक पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. सुमारे आठ ते १० हजार हेक्टर अधिक पेरणी होईल, अशी अपेक्षा असून, त्या दृष्टीने ‘महाबीज’कडून बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात यंदा रब्बीचे अपेक्षित क्षेत्र एक लाख ३८ हजार हेक्टर आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र एक लाख १३ हजार हेक्टरपर्यंत पोचले होते. यंदाही सप्टेंबर व आता दसऱ्यानंतर झालेल्या पावसाचा लाभ रब्बीला होईल. त्यात कमी पाण्यात व कमी खर्चात येणारे पीक म्हणून हरभऱ्याला पसंती दिली जाणार आहे.
जळगाव, चोपडा, यावल, पाचोरा भागांतील काळ्या कसदार जमिनीत पेरणी सुरू झाली आहे. बियाणे बाजारात हरभरा बियाण्याची अधिकची उचल सुरू आहे. त्यादृष्टीने बियाणे विक्रेत्यांनी महाबीज व इतर खासजी कंपन्यांचे बियाणे उपलब्ध करून दिले आहे. महाबीजच्या बियाण्यासंबंधी कृषी विभागाने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विविध बियाणे पुरवठ्याच्या सूचना केल्याची माहिती मिळाली.
हरभऱ्याचे क्षेत्र जवळपास ७५ हजार हेक्टरपर्यंत असू शकते. त्यासाठी महाबीजकडून तीन हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. शासकीय संस्थांकडून आणखी हरभरा बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने सूचना दिल्याची माहिती मिळाली.
जिल्ह्यात दादरची (रब्बी ज्वारी) पेरणी सुरू झाली आहे. तसेच मागील १० दिवसांपूर्वीच सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी संकरित ज्वारीची पेरणी केली आहे. ती ज्वारी तरारली असून, मागील चार- पाच दिवसांत झालेल्या पावसाचा तिला लाभ होणार आहे.