अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू कपाशीला फटका
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू कपाशीला फटका 
मुख्य बातम्या

अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू कपाशीला फटका

टीम अॅग्रोवन

अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू कपाशीला मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली असली, तरी खंड व परतीच्या पावसाअभावी कोरडवाहू कपाशीला मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील अनेक भागांत कोरडवाहू कपाशीचा हंगाम येत्या महिनाभरातच पूर्ण होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. कोरडवाहू कपाशीचे उभे पीक आता सुकलेले दिसत असून, झाडांवर लागलेल्या बोंडांमधून कापूस उमलत आहे. या कापसाची वेचणी झाल्यानंतर अनेक शेतांमधील कपाशीचे पीक काढून टाकण्यायोग्य होईल, अशी स्थिती आहे. अकोला जिल्ह्यात एकूण लागवडीच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक क्षेत्र हे कोरडवाहू कपाशीचे आहे.   या हंगामात वऱ्हाडात अकोला जिल्ह्यात चांगला पाऊस झाला, तर शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यात पावसाने सरासरीही गाठली नाही. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाचा खंड मोठा राहिल्याने कोरडवाहू कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला. पीक फारसे जोमदार वाढले नाही. शिवाय फूल, पात्या धरण्याच्या, बोंड परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाऊस, ओलावा नसल्याने सर्वाधिक फटका बसला. गेल्या काही दिवसांत हलक्‍या जमिनीतील पीक दिवसा सुकल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची अपेक्षा लागलेली होती. मात्र, कुठेच हा पाऊस बरसला नाही.  अकोला जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यांमधील शेतकऱ्यांना कोरडवाहू कापूस उत्पादनातून उत्पादन खर्च मिळेल, अशी शक्‍यता दिसत नाही. बाळापूर तालुक्‍यात गायगाव, निमकर्दा, पारस व इतर गावांमध्ये कपाशी पिकाची दुरवस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. कोरडवाहू शेतातील कपाशीच्या झाडावर आठ ते दहा बोंड्या धरलेल्या दिसून आल्या. या भागात कुठे पीक हिरवेगार होते, मात्र त्यावर कीडींचा, रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. तर, कुठे उभे पीक दुपारच्या वेळेत सुकलेले दिसले. झाडांवर असलेल्या बोंड्या अर्धवट स्वरूपात उमललेल्या होत्या.  सध्या लागलेल्या बोंडामधील कापसाची वेचणी केल्यानंतर हे पीक पूर्णतः खाली होईल, अशी स्थिती आहे.  ही सर्व लक्षणे कपाशीचा हंगाम लवकरच संपण्याच्या दिशेने निर्देश करीत आहेत. दर वर्षी हिवाळ्यात कोरडवाहू कपाशी पिकाच्या स्थितीत सुधारणा होऊन शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन होत असते. यंदा मात्र गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून पिकाला हवे असलेले पाणी, ओलावा नसल्याने उभे पीक कोमेजत आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळण्याची शक्‍यता नाही.

बुलडाण्यातही बिकट अवस्था कापसाचे क्षेत्र अधिक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातसुद्धा कोरडवाहू कपाशीची स्थिती बिकट आहे. पीक होरपळले असून, झाडांवर लागलेल्या बोंड्या उमलत आहेत. एक किंवा दोन वेचण्या केल्यानंतर कपाशीचे पीक उपटून टाकावे लागण्याची शक्यता आहे. कपाशी उपटून रब्बीची लागवड करावी, तर पाण्याची व्यवस्था नसल्याने हा पर्यायसुद्धा शेतकऱ्यांपुढे उपलब्ध नाही.  मी या वर्षी सहा एकरांत कोरडवाहू कापूस लागवड केली होती. परंतु, पावसाच्या अनियमितपणामुळे पिकाची वाढ झाली नाही. सध्या माझ्या शेतातील कपाशीला दोन ते चार बोंडे लागले आहेत. एकरी ८० ते ९० किलो कापूस होईल, असे दिसते. यातून उत्पादन खर्चही निघण्याची शक्‍यता नाही. शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज आहे. - मार्तंड रघुनाथ डिवरे, शेतकरी, महाळुंगी, ता. नांदुरा, जि. बुलडाणा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

SCROLL FOR NEXT