पुणे ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे विभागातील धरणांमधील पाणीपातळीत झपाट्याने घट होण्यास सुरवात झाली आहे. विभागातील ७२५ मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ५३७.४४ टीएमसी असून, रविवारी (ता. २२) या प्रकल्पांमध्ये मिळून २११.४० टीएमसी (३९.३३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तापमानात वाढ होणार असल्याने पाण्याची मागणी आणि बाष्पीभवनाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे उर्वरित पाण्याचे जपून नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
पुणे विभागातील मोठ्या ३५ प्रकल्पांमध्ये मिळून १७६.७७ टीएमसी (४०.१९ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये १९.५६ टीएमसी (४०.६९ टक्के), तर ६४० लघू प्रकल्पांमध्ये १४.९७ टीएमसी (३०.४२ टक्के) पाणीसाठा उपलब्ध अाहे.
गेल्या वर्षी याच तारखेला मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांमध्ये अनुक्रमे २४.९३, २९ आणि १९.०४ टक्के असा एकूण २४.७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. पुणे विभागात यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले अाहे.
पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पूर्णपणे भरलेल्या उजनी धरणात यंदा अद्यापही चांगल्या प्रमाणात पाणीसाठा आहे. या धरणात चल आणि अचल साठा मिळून ७५.८३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, यापैकी १२.१९ टीएमसी (२२.७५ टक्के) चल साठा आहे. कोयना धरणात एकूण ५५.२५ टीएमसी पाणीसाठा असून, यापैकी ५०.१० टीएमसी (५०.०६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.
गतवर्षी उजनी धरणामध्ये अवघा ४.६३, तर कोयना धरणामध्ये २६.८३ टक्के पाणीसाठा होता. उजनी, कोयनेसह साताऱ्यातील उरमोडी, धाेम, वीर, सांगलीतील वारणा, पुण्यातील भामा अासखेड, पानशेत, कोल्हापुरातील तुळशी या धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.