Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Organic Agriculture : शेतात पिकांचे अवशेष जाळले जातात किंवा फेकून दिले जातात. परंतु या घटकांमधून सेंद्रिय स्वरूपातील नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा पुरवठा होतो. यासाठी त्यांना कुजविणे आणि खनिजीकरण सुयोग्य तंत्रज्ञानाद्वारे करणे अत्यंत आवश्यक आहे.
Agriculture
AgricultureAgrowon

डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. आनंद गोरे

Recycling of Farm Organic Matter : शेतातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून पुनर्चक्रीकरण करता येते. तांदळाचा भुसा,गहू, इतर तृणधान्य, ऊस पाचट, उसाचा चोथा, उसाची मळी, प्रेस मड, नारळ काथ्या, कापसाच्या पऱ्हाट्या, वनातील पालापाचोळा, शहरातील काडीकचरा, फळे भाजीपाल्याचे टाकाऊ अवशेष, मळीच्या ऊर्धपातन प्रक्रियेतील पदार्थ, अळंबी उद्योगातील पदार्थ, पशू उद्योगातील पदार्थ पुनर्चक्रीकरणाकरिता उपलब्ध आहेत. शेतात पिकांचे अवशेष जाळले जातात किंवा फेकून दिले जातात. परंतु या घटकांमधून सेंद्रिय स्वरुपातील नत्र,स्फुरद आणि पालाश यांचा पुरवठा होऊ शकतो. त्यासाठी त्याचे कुजविणे आणि खनिजिकरण सुयोग्य तंत्रज्ञानाद्वारे करणे अत्यंत आवश्यक आहे.

काढणी केल्यानंतर शेतामध्ये पिकांचे अवशेष भरपूर प्रमाणात उरतात. त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारीची धसकटे, गव्हाचे काड आणि इतर तृणधान्याचे अवशेषांचे कुजविणे आणि खनिजीकरण शेतावर करणे शक्य आहे. त्यासाठी साधारणपणे ४ × २ ×१ मीटर आकारमानाचा खड्डा करावा. या खड्ड्यात शेतातील उपलब्ध मातीचा पहिल्यांदा १५ सेंटिमीटर जाडीचा थर भरावा. त्यावर शेणाचे पाणी शिंपडावे.

त्यावर शेणाचा ५ सेंटिमीटर जाडीचा थर द्यावा. या थरानंतर एक किलोग्रॅम स्फुरद खत पसरावे. अशाप्रकारे खड्डा भरणी जमिनीपासून पाच सेंटिमीटर उंच येईपर्यंत करावी. त्यावर मातीमिश्रित शेणाचे सारवण करावे. पाच आठवड्यानंतर खड्ड्यातील घटकांची उलथापालथ करावी. मोकळ्या वातावरणात सेंद्रिय घटक लवकर कुजतात. हे खत साधारणपणे पाच महिन्यांत तयार होऊन वापरात येऊ शकते.

असे पुनर्चक्रीकरण आपण शेतावर चांगल्या रीतीने करू शकतो. संशोधनाअंती असे निदर्शनास आले आहे की या पद्धतीत स्फुरद मिसळल्यामुळे नत्राची गळती थांबते. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद गतीने होऊन खतातील स्फुरदाचे प्रमाण वाढते. या खताचा आपण रासायनिक खतासोबत वापर केल्यास रासायनिक खताच्या मात्रा कमी करून खर्चात बचत करता येऊ शकते.

Agriculture
Indian Agriculture : हवामान बदलाच्या स्थितीत शेती व्यवस्थापनातील बदल

ऊस पाचटाचे पुनर्चक्रीकरण

एक टन उसाच्या पाचटाचे दहा बारा सेंटीमीटर आकाराच्या तुकड्यात रूपांतर करून त्याचे दहा भागात प्रत्येकी १०० किलोग्रॅममध्ये विभाजन करावे. पाच बाय तीन मीटर भागामध्ये १०० किलो पाचटाचे तुकडे पसरावेत.यामध्ये ओलावा राहावा यासाठी पन्नास लिटर पाणी शिंपडावे. या थरावर दुसरा १०० किलोचा थर व्यवस्थित पसरवून त्या थरावर ट्रायकोडर्मा व्हिरीडीची फवारणी करावी. त्यावर पुन्हा पाणी शिंपडावे. दोन थरातील एक किलो युरिया समप्रमाणात मिसळावा. अशा प्रकारे संपूर्ण दहा भागांची विभागणी एकावर एक थर देऊन त्यावर २५० किलो चिकण माती व वाळू मिसळून घट्ट थर द्यावा.

चार दिवसांतून एकदा त्यावर शंभर लिटर पाणी शिंपडावे. सर्वसाधारणपणे एक टन उसाच्या पाचटापासून सेंद्रिय कंपोस्ट तयार करण्यासाठी दोन लिटर ट्रायकोडर्मा व्हिरीडी, जिवाणू संवर्धक आणि पाच किलो युरिया वापरावा.

चांगले उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होण्यासाठी साधारणतः तीन ते चार महिन्याचा अवधी लागतो.अशाप्रकारे उसाचे पाचट जाळून न टाकता त्याचे पुनर्चक्रीकरण पद्धतीद्वारे चांगले खत म्हणून उपयोग होऊ शकतो. रासायनिक खतांची बचत होते.

पुनर्चक्रीकरणात कर्ब

नत्र प्रमाण अति महत्त्वाचे

जमिनीची सुपीकता मुख्यत्वेकरून पिकांना अन्नद्रव्य पुरवठा उपलब्ध करून देण्यावर अवलंबून असते. जमिनीतून नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना होतो.

नत्र हे जमिनीत सेंद्रिय कर्बाच्या स्वरूपात उपलब्ध असते. कर्बाचे रूपांतर उपलब्ध नत्रातून नंतर ते पिकास मिळते. म्हणूनच जमिनीची सुपीकतेमध्ये कर्ब : नत्र प्रमाण १२: १ ते २०: १ या मर्यादेपर्यंत असू शकते. सर्वसाधारणपणे हे प्रमाण १०: १ ते १२: १ असावे.

पुनर्चक्रीकरणानंतर जमिनीतील कर्ब: नत्र प्रमाण हे मुख्य म्हणजे तापमान, वातावरण, ओलावा आणि जमिनीचा प्रकार या बाबींवर अवलंबून असते. वातावरण उष्ण व दमट असेल तर कर्ब: नत्र प्रमाणाचे संतुलन हे शुष्क व अतिउष्ण तसेच अतिशीत हवामानापेक्षा संतुलित असते. हे प्रमाण सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेवर व जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंच्या क्रियेवर सतत बदलत असते.

वातावरण उष्ण व दमट असेल तर कुजण्याची क्रिया जलद होते.याउलट अतिशीत वातावरणात हीच क्रिया मंदावते, जिवाणूंचे कार्य नीट होऊ शकत नाही.

जमिनीत ओलावा टिकून राहणे हे सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या क्रियेला आवश्यक आहे. ओलावा भरपूर असल्यास सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. पर्यायाने कर्ब: नत्र प्रमाण चांगल्याप्रकारे संतुलित राहते.

जमिनीच्या प्रकारावर कर्ब: नत्र प्रमाण अवलंबून असते. हलक्‍या व पाण्याच्या त्वरित निचरा होणाऱ्या जमिनी पेक्षा भारी ओलावा धरून ठेवणाऱ्या जमिनीत कर्ब: नत्र प्रमाण उत्तम असते.

Agriculture
Indian Agriculture : स्वदेशी तंत्र हाच विकासाचा मंत्र

कर्ब : नत्र प्रमाण योग्य राखण्यासाठी उपाययोजना

जमिनीचे नियोजन

जमिनीच्या प्रतवारीनुसार पिकांची लागवड केली तर जमिनीत सेंद्रिय पदार्थाद्वारे अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. हलक्‍या जमिनीत जर सोटमूळ असणाऱ्या पिकांपेक्षा आगंतुक मुळे असणारी पिके घेतली तर अशा जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची प्रक्रिया लवकर होते. पर्यायाने सेंद्रिय पदार्थ कुजून कर्ब : नत्र प्रमाण वाढते.

सेंद्रिय खतांचा वापर

जमिनीच भरपूर प्रमाणात सेंद्रिय खते मिसळावीत. म्हणजे कर्ब : नत्र प्रमाण वाढविण्यास मदत होते. जमिनीची भौतिक स्थिती सुधारते. जलधारणाशक्ती,निचरा व जैविक प्रक्रिया वाढून जमिनीचा पोत सुधारतो. कर्ब :नत्र प्रमाण देखील वाढते.

पिकांची फेरपालट

सतत एकाच प्रकारची पिके त्याच जमिनीत घेतल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचे शोषण होते. त्यामुळे कर्ब: नत्र गुणोत्तराचे प्रमाण बिघडते. याकरिता वेगवेगळे पिके आलटून-पालटून घेणे फायदेशीर ठरते. उदा. मिश्र पिके, ज्वारी, बाजरी, गहू ,भात पिकानंतर दुसऱ्या हंगामात तूर ,मूग ,उडीद तसेच तेलबिया पिकांची लागवड करावी. म्हणजे पिके हवेतील नत्र शोषून घेऊन सहजीवन पद्धतीने जमिनीत नत्र स्थिर करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कायम राखली जाते.

हिरवळीची पिके

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रचलीत व सोपी पद्धत म्हणजे हिरवळीचे पिके. या पद्धतीमध्ये विविध प्रकारची पिके शेतात घेतली जातात. फुलोऱ्यात येण्यापूर्वी जमिनीत गाडली जातात. ती जमिनीत कुजून चांगले खत तयार होते. ज्या जमिनीत आपणास हिरवळीचे खत मिसळायचे आहे, त्या ठिकाणी ढेंचा, ताग, गिरिपुष्प, मूग, उडीद या पिकांची लागवड करावी. ही पिके फुलोऱ्यात येण्यापूर्वी नांगरणी किंवा कापणी करून त्याच जमिनीत अथवा इतर ठिकाणी गाडली जातात. त्यावर जिवाणूंची प्रक्रिया होऊन ती कुजतात. त्यापासून उत्तम खत तयार होते. ही पिके जमिनीत राहून हवेतील नत्र स्थिर करतात. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून सुपीकता वाढविली जाते. यामध्ये मूग व उडदाचे पीक घेऊन त्याचे मुख्य उत्पादन घेतल्यानंतर जमिनीत पिकांचे अवशेष गाडावेत.

जिवाणू संवर्धक

पिकांच्या वर्गीकरणानुसार बियाण्यास रायझोबियम व जिवाणू संवर्धकाची पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. यामुळे ही पिके हवेतील नत्र जमिनीत स्थिर करून सुपीकता वाढवितात. याप्रकारे निळे-हिरवे शेवाळ देखील जमिनी मिसळल्यानंतर कर्ब : नत्र प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचा उपयोग भात पिकामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो. जमिनीतील स्थिर स्फुरदाची उपलब्धता वाढविण्यासाठी स्फुरद विरघळणारे जिवाणू खत वापरावे.

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे वेगवेगळे भाग अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्‍चिती करू शकतो. यामध्ये रोगाचे तंतू (Filament) लांब धाग्याप्रमाणे दिसून येतात. या तंतूंवर काळसर रंगाचा छोटासा बीजाणू कोषदंड (Conidiophore) असतो. या कोषदंडावर लंब गोलाकार व कप्पे कप्पे असले बीजाणू (Conidia) असतात. हे या बुरशीचे अलैंगिक बीजाणू असतात. हे बीजाणू पुढील रोग निर्मितीस कारणीभूत असतात.

डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६, (सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com