मुख्यमंत्र्यांनी ऑडिओ ब्रीजद्वारे सरपंचांशी साधला संवाद
मुख्यमंत्र्यांनी ऑडिओ ब्रीजद्वारे सरपंचांशी साधला संवाद 
मुख्य बातम्या

मुख्यमंत्र्यांनी ऑडिओ ब्रीजद्वारे सरपंचांशी साधला संवाद

टीम अॅग्रोवन

मुंबई ः नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशीम जिल्ह्यांतील सरपंचांशी ऑडिओ ब्रीज यंत्रणेद्वारे संवाद साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा, प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक प्रभावीपणे राबविता येतील असे निर्देश दिले.  गेल्या सहा दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस हे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्हा स्तरावरील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. काल नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशीम या पाच जिल्ह्यांतील साधारण शंभरहून अधिक सरपंचांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, तक्रारींची दखल घेऊन त्याचे तत्काळ निवारण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच या जिल्ह्यांतील सरपंचांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक व्हॉटसॲप क्रमांकही देण्यात आला आहे. या क्रमांकावर दुष्काळाशी संबंधित आलेल्या तक्रारींवरही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील सरपंचांनी नदी-नाले, विहिरींमधील गाळ काढण्याची मागणी केली. त्यावर संबंधित गावांचा समावेश गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेत करून नदी, नाला खोलीकरण, विहिरी व तलावांतील गाळ काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच नांदेड जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, तेथील मागणीनुसार नियमित व योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यात यावे. नागरिकांकडून कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. हिंगोली जिल्ह्यातील विशेष दुरुस्तीअंतर्गत जुन्या झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा. राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झालेल्या गावांमधील कामासाठी निधीची कमतरता नसून, ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले. वर्धा जिल्ह्यात आवश्यकता असेल तेथे विंधन विहिरींचे अधिग्रहण करून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्स व रोहयो कामांचे नियोजन करून प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना ‍मुख्यमंत्र्यांनी वाशीम जिल्हा प्रशासनाला दिल्या. या वेळी वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील सरपंचांनी गावातील टँकर, पाण्याच्या टाक्या, चारा छावण्या, प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, रोहयोची कामे अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती दिली. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. जेथे गरज असेल तिथे रोजगार हमीची कामे मिळतील याकडे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  २०१८ ची लोकसंख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरचा पाणीपुरवठा वाढविण्यात यावा. टंचाईसंदर्भात तातडीच्या बाबींवर ४८ तासांच्या आत निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी. तसेच आजच्या संवादात सरपंचांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT