चंद्रपूर ः राज्यात कापूस खरेदीला परवानगी देण्यात आली असली तरी त्याची गती मंद आहे. त्यामुळे कापूस खरेदीची गती वाढवावी त्याकरिता केंद्रांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल एजाज कुरेशी यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या या संदर्भाने निवेदन पाठविण्यात आले असून त्याव्दारे ही मागणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसमोरील संकटात वाढ झाली आहे. हंगाम तोंडावर असताना देखील त्यांना शेती कामे प्रभावीपणे करणे शक्य होत नाहीत. त्यामध्ये पोलिसांकडून होणाऱ्या अडवणुकीचा प्रश्न गंभीर आहे.
दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस शिल्लक आहे. परंतु खरेदी केंद्राची संख्या अत्यल्प असल्याने या कापसाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना बराच कालावधी लागणार आहे. खरेदीची गती अशीच संथ राहिल्यास या वर्षाअखेरच खरेदी पूर्ण होईल, अशी भीती आहे. ही बाब लक्षात घेता खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. कापूस केंद्राची जेमतेम संख्या आणि खरेदीची मंद गती याचा फायदा व्यापारी स्तरावर घेतला जात आहे.
शेतकऱ्यांना हंगामासाठी पैसा लागणार हे जाणून घेत व्यापारी कापसाला दीड हजार ते ४२०० रुपये इतका दर देत आहेत. कापसाचे हमीभाव ५५५० रुपये असल्याने या माध्यमातून शेतकऱ्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांव्दारे होत असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे कापसाला योग्य भाव मिळावा याकरीता शासनस्तरावरुन प्रयत्न करावे, अशी मागणीही श्री. कुरेशी यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.