Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Prices Crashed by 5 thousand: तुरीचा भाव ५ हजाराने सहा महिन्यांमध्ये पडला; तुरीची हमीभावाने खेरदी वेळेत सुरु करण्याची मागणी

Market Update : तुरीचा भाव मागील ६ महिन्यांत ५ हजाराने आणि एकाच महिन्यात २ हजार ५०० रुपयाने कमी झाला. आवकेचा दबाव वाढून दर आणखी कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना आधार हवा आहे.

Anil Jadhao 

Pune News : तुरीचा भाव मागील ६ महिन्यांत ५ हजाराने आणि एकाच महिन्यात २ हजार ५०० रुपयाने कमी झाला. आवकेचा दबाव वाढून दर आणखी कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना आधार हवा आहे. पण सोयाबीनप्रमाणे तुरीचे होऊ नये यासाठी तातडीने खरेदी जाहीर करून नोंदणी सुरु करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. केंद्राने ५ राज्यांमध्ये ९ लाख ६६ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट जाहीर केले. पण महाराष्ट्रात अद्यापही खरेदीचे उद्दीष्ट जाहीर झाले नाही.

देशात तुरीच्या भावात जून २०२३ पासून तेजीला सुरुवात झाली. त्याचे कारण होते कमी पाऊस आणि कमी लागवड. तेव्हापासून सुरु झालेल्या तेजीने मजल दरमजल करत जून २०२४ मध्ये १२ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला. कारण गेल्या हंगामात तुरीची लागवड कमी होऊन उत्पादनात मोठी घट झाली होती. पण यंदा माॅन्सून चांगला बरसला. लागवडही १४ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे चांगल्या उत्पादनाची चर्चा सुरु आहे.

देशात यंदा तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने नवा माल बाजारात दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली. जून महिन्यातील मोठ्या तेजीनंतर बाजारात भाव कमी होत गेले. डिसेंबर महिन्यात देशातील काही बाजारात नवी तूर दाखल झाल्यानंतर दर आणखी कमी झाले. सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. म्हणजेच जून महिन्यातील उच्चांकी भावाचा विचार करता सध्याचा भाव ५ हजाराने कमी आहे. तर नोव्हेंबरमधील भावाचा विचार केला तर सध्या २ हजार ५०० रुपये कमी भाव आहे.

तुरीचा भाव मागील सहा महिन्यात ५ हाजाराने आणि एकाच महिन्यात २ हजार ५०० रुपयाने कमी झाला. अजून तर तुरीची बाजारातील आवक वाढायची आहे. ज्या भागात तुरीची लागवड आगाप झाली त्याच भागातील तूर काढणी झाली. बाजारातील नव्या मालाची आवकही अगदी किंचित आहे. आवकेचा दबाव फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या काळात तुरीच्या भावात आणखी नरमाई येईल का? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. कारण सध्या आवक अगदी कमी असतानाही अनेक बाजारात भाव हमीभावाच्या खाली गेले आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतर काही काळ का होईना मार्केट दाबावात येऊ शकते. 

शेतकऱ्यांनी लागवडीच्या काळात तुरीच्या भावातील तेजी पासून लागवड वाढवली. पण भाव कमी झाले. अनेक शेतकरी माल आल्यानंतर लगेच विकत असतात. जे शेतकरी थांबू शकत नाही त्यांना कमी भाव मिळू शकतो. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर तुरीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र जे शेतकरी थांबू शकत नाहीत त्यांनाही किमान हमीभाव मिळायला हवा. त्यासाठी सरकारने हमीभावाने तूर खरेदीसाठी वेळेत उद्दीष्ट जाहीर करून नोंदणी आणि खरेदी लवकर सुरु करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. 

सोयाबीनचा अनुभव

सोयाबीनच्या हमीभाव खरेदीत अनेक अडचणी असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान ९०० रुपये कमी भावात माल विकावा लागला. नोंदणी वेळेत होऊ शकत नाही, नोंदणीनंतर खरेदीसाठी महीना-महीना थांबावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात सोयाबीन विकावी लागत आहे. तूर खरेदी करताना सरकारने या अडचणी सोडविणे आवश्यक आहे. 

पाच राज्यांमध्ये उद्दीष्ट जाहीर

केंद्र सरकारने ५ राज्यांमध्ये सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट जाहीर केले. या राज्यांमध्ये ९ लाख ६६ हजार टन खरेदी केली जाणार आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ३ लाख ९५ हजार टन खेरदीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. कर्नाटकात ३ लाख ६ हजार टनांचे उद्दीष्ट देण्यात आले. तर तेलंगणात १ लाख ६९ हजार टन, आंध्र प्रदेशात ९५ हजार टन आणि हरियानात ४९५ टन खेरदीचे उद्दीष्ट केंद्राने दिले. मात्र तूर उत्पादनात कर्नाटकनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात अद्याप खरेदीचे उद्दीष्टही जाहीर करण्यात आले नाही. 

केंद्र सरकार तूर लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे विदेशातून तूर आणि पिवळा वाटाण्याची मोठ्या प्रमाणात आयात करत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारामध्ये तुरीचे बाजार भाव कोसळत आहेत. हे कोसळलेले बाजारभाव स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने हमीभावानुसार तूर खरेदी करून शेतकऱ्यांना एक हजार रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर करावा. तरच भविष्यामध्ये कडधान्य बाबतीत देश स्वयंपूर्ण होईल.
विश्वंभर गोरवे, तालुका अध्यक्ष, शेतकरी संघटना, सोनपेठ.
शेतकऱ्यांची तूर बाजारात आल्यानंतर भाव काही काळ दबावात राहण्याची भीती आहे. लहान शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने हमीभावाने तूर खरेदी वेळेत सुरु करण्याची गरज आहे. बाजारातील तेजीचा बहुतांशी शेतकऱ्यांना फायदा होत नाही. पण किमान हमीभाव तरी मिळावा, असे धोरण सरकारने राबवावे. 
गणेश सोमाणी, तूर उत्पादक, अकोट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT