Pune News: हमीभावाने खेरदी केलेल्या सोयाबीनची विक्री नाफेडने बुधवार (ता.५)पासून सुरु केली. त्यामुळे देशातील सोयाबीनचे भाव पुन्हा सरासरी २०० रुपयांपर्यंत कमी झाले. नाफडने ज्या भावात सोयाबीन विकले त्याच भावात प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनची खरेदी केली. त्यामुळे बाजारात सोयाबीनला केवळ ३ हजार ७०० ते ३ हजार ९०० रुपयांचा भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील घाडमोडींंचाही परिणाम होत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
देशात नाफेड आणि एनसीसीएफने जवळपास २० लाख टन सोयाबीन खरेदी केले. त्यापैकी महाराष्ट्रात ११ लाख २१ हजार टनांची खेरदी झाली. देशात चालू हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा कमी होता. त्यामुळे सरकारच्या हमीभावाने खेरदीला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
सरकार खरेदी उतरले तेव्हा खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव सुधारतील, असा अंदाज बांधला जात होता. पण सरकार जास्त दिवस सोयाबीनचा स्टाॅक ठेवणार नाही, याची चर्चा बाजारात सुरु झाली आणि बाजाराला या खरेदीचा आधार मिळाला नाही. बाजारातील चर्चेप्रमाणे नाफेडची कृती घडत आहे. नाफेडने खरेदी बंद होऊन महीनाही होत नाही तोच बाजारात माल विक्रीचा निर्णय घेतला.
नाफेड मध्य प्रदेशात ३ लाख टन सोयाबीन मार्च महिन्यात विकणार, ही पहीली माहिती समोर आल्यानंतर सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने दर पडतील असा धोका व्यक्त केला होता. सोपाचे म्हणणे आहे की, सरकारने किमान २०२५ च्या खरिपातील पेरणी होईपर्यंत सोयाबीन विकू नये. अन्यथा दर पडल्यास पेरणी कमी होऊ शकते. सरकारने आतापर्यंत मध्य प्रदेशातील सोयाबीन विकले नाही मात्र कर्नाटकात बुधवारी (ता.५) विक्री केली.
कर्नाटकात विक्री
कर्नाटकात नाफेडने केवळ १ हजार ६० टन सोयाबीन ई लिलावाद्वारे विकले. हुबळी आणि रामदुर्ग केंद्रावर ही विक्री झाली. हुबळी येथील केंद्रावर विक्रीत ४ हजार १६१ रुपये भाव मिळाला. तर रामदुर्ग केंद्रावर ४ हजार १५१ रुपये प्रतिक्विटलचा भाव मिळाला.
बाजारावर परिणाम
नाफेडने विकलेले सोयाबीन केवळ १ हजार ६० टन होते. तसे पाहीले तर हा माल खूपच कमी आहे. मात्र नाफेडने विक्री सुरु केली हे सेंटीमेंट बाजारात पसरले. तसेच नाफेड इतरही राज्यांमध्ये विक्री सुरु करेल आणि बाजारात पुरवठा वाढेल या सेंटीमेंटचा बाजारावर परिणाम झाला. नाफेडने ज्या भावात सोयाबीन विकले त्याचदरम्यान प्रक्रिया प्लांट्सनीही आपले खरेदीचे भाव काढले होते. देशभरात आत प्रक्रिया प्लांट्सनी ४ हजार ५० ते ४ हजार १५० रुपयांच्या दरम्यान सोयाबीन खरेदी केले. त्यामुळे बाजारात सोयाबीनचे भाव ३ हजार ७०० ते ३ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकले गेले.
आतबट्ट्याची विक्री
सरकारने हमीभावाने म्हणजेच, ४ हजार ८९२ रुपये सोयाबीनचे खरेदी केली. मात्र हेच सोयाबीन सरकारने एका महिन्यात ७५० रुपये कमी भावात विक्रीला काढले. शेतकऱ्यांच्याही सोयाबीनची बाजारात आवक होत आहे. म्हणजे बाजारात माल येत नाही असे नाही. त्यामुळे याचा परिणाम खुल्या बाजारातील दरावर होणारच होता. सरकारने सोयाबीन विक्रीचे दर एवढे कमी केले नसते तर मार्केटही एवढे तुटले नसते, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.