Jaggery
Jaggery Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Rate : शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरे बंदच राहणार

Abhijeet Dake

सांगली : शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरे (Gurhal Ghar) दसरा आणि दिवाळीनंतर सुरू होतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून गुळाला (Jaggery Rate) अपेक्षित दर मिळत नसल्याने गूळ उत्पादक (Jaggery Production) शेतकरी संकटात आला आहे. त्यातच गूळ निर्मितीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच सातत्याने महापुराचा फटका गुऱ्हाळ घरांना बसत असल्याने गुऱ्हाळ घराचे मोठे नुकसान होते. या साऱ्यामुळे यंदाच्या हंगामातील गुऱ्हाळ घरे सुरू करण्याच्या मानसिकतेत गुऱ्हाळ घरमालक दिसत नाहीत. परिणामी, गुऱ्हाळ घरांना घरघर लागली असल्याचे चित्र आहे.

शिराळा तालुक्यातील कोकरुड, मणदूर, बिळाशी, सागाव, कणदूर मांगरुळ या गावांत गुऱ्हाळ घरांची संख्या अधिक आहे. तालुक्यात गुऱ्हाळ घरांची संख्या अगदी सुरुवातीपासून १०० हून अधिक होती. तालुक्यात दर्जेदार गूळ निर्मिती करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. दसरा झाल्यानंतर तालुक्यातील गुऱ्हाळ घरमालक घरांची दुरुस्ती, मजुरांची जुळवाजुळव यासह इतर कामे हाती घेतात.

त्यानंतर दिवाळीच्या दरम्यान, गुऱ्हाळ घरांवर गूळ निर्मितीसाठी लगबग सुरू व्हायची. गेल्या पाच वर्षांपर्यंत तालुक्यात सुमारे ३० ते ४० गुऱ्हाळ घरे सुरू व्हायची. इथला गूळ कऱ्हाड (जि. सातारा) येथील बाजार समितीत गुळाला चांगला दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी विक्रीसाठी घेऊन जायची. अडीच ते तीन टन उसापासून सुमारे २७० किलो गूळ निर्मिती होते. गुळाचा उताराही अपेक्षित मिळत असे. मात्र परंतु गेल्या चार वर्षांत गुळाला अपेक्षित असा दर मिळणे बंद झाला. त्यामुळे गूळ निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.

हळूहळू गुऱ्हाळ घरात काम करणाऱ्या मजुरांची टंचाई निर्माण होऊ लागली. स्थानिक मजुरांची मदत घेऊन गूळ निर्मिती सुरू ठेवली. परंतु मजूरटंचाईचा सामना गुऱ्हाळ घरमालकांना करावा लागला. त्यातच २०१९ मध्ये महापूर आला. त्यामध्ये गुऱ्हाळ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातूनही गुऱ्हाळ घरे दुरुस्त करून पुन्हा नव्या उमेदीने सुरू केली. परंतु दुसऱ्या तिसऱ्या वर्षीही महापुराचा सामना करावा लागला. त्याची दुरुस्ती करण्यासाठी तीन ते चार लाखांचा खर्च येऊ लागला. त्यामुळे त्या वेळी आर्थिक कमतरता असल्याने बहुतेक गुऱ्हाळ घर मालकांनी घरे दुरुस्तीसाठी पुढे आलेच नाहीत. त्यामुळे हळूहळू गुऱ्हाळ घरांची संख्या कमी होऊ लागली. गेल्या वर्षी तालुक्यात अवघी ५ ते ७ गुऱ्हाळ घरे सुरू झाली.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून गुळाला अपेक्षित असा दर मिळाला नाही. मजुरांची टंचाई वाढली. त्यातच बंद असलेली गुऱ्हाळ घरे सुरू करण्यासाठी खर्च वाढणार या साऱ्यामुळे यंदा दिवाळीपासून सुरू होणाऱ्या गूळ हंगामाला याचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात गुऱ्हाळ घरे बंदच राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी, गुऱ्हाळ घरांना घरघर लागली आहे.

हमीभावाकडे दुर्लक्षच

गुळाला हमीभाव मिळावा यासाठी गुऱ्हाळ घरमालक आणि गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली. हमीभाव जाहीर केला असता, तर गुळाला अपेक्षित दर मिळण्यास मदत झाली असती. त्यामुळे गुऱ्हाळ घरे सुरू राहिली असती आणि गूळ निर्मितीही झाली असती. परंतु त्या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले.

आम्ही पाच लाख रुपये खर्च करून गुऱ्हाळ घराची दुरुस्ती केली, पण मजूरटंचाई, महापूर आणि गुळाला अपेक्षित दर नाही. या साऱ्याचा परिणाम गूळ निर्मितीवर झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून घरांची संख्या कमी झाली आहे. गुळाला हमीभाव दिला तर गूळ निर्मितीत चांगले दिवस येतील अशी आशा आहे.
गजानन शेटे, गुऱ्हाळ घर मालक, कोकरुड, ता. शिराळा, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT