Onion Market
Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market Rate : सरकार म्हणतं जुलैपासून कांदा, डाळी स्वस्त; कांद्याचे उत्पादन खरिपात बंपर होण्याची सरकारला अपेक्षा

Anil Jadhao 

Pune News : सरकार एकिकडे शेतकऱ्यांना चुचकारण्याचं नाटक करतं तर दुसरीकडे प्रशासनाच्या आडून सरकारचे जुनेच धंदे सुरु आहेत. स्टाॅक लिमिटमुळे पुढच्या महिन्यात तूर आणि हरभऱ्याचे भाव कमी होतील. तर टोमॅटो आणि कांद्याचेही भाव नियंत्रणात राहतील, असा विश्वास केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी व्यक्त केला. सरकार डाळी आणि भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात ठेवण्याचे सर्व ते प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आता कांदा आणि टोमॅटोचे भाव उत्पादन कमी झाल्याने वाढले. कांद्याचे भाव पाडण्यासाठी तर सरकारने जे जे करणे शक्य आहे ते सर्व केले. पण कांद्याची उपलब्धताच कमी असल्याने कांद्याचे भाव वाढले. त्यातच कांदा आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हातून गेला आणि व्यापाऱ्यांच्या चाळीत पडून आहे. हे व्यापारी शेतकऱ्यांप्रमाणे काही पॅनिक सेलिंग करणार नाहीत. शेतकऱ्यांकडेही काही प्रमाणात कांदा आहे. पण सर्वच कांदा शेतकऱ्यांकडे नाही. 

ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितले की, यंदा खरिपात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा कांद्याची लागवड मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढण्याचा अंदाज आहे. यंदाच्या खरिपात कांद्याची लागवड ३ लाख ७६ हजार हेक्टरवर होण्याची शक्यता आहे. मागच्या खरिपात २ लाख ८५ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. लागवड वाढल्यामुळे खरिपातील कांदा उत्पादनही वाढेल. खरिपातील कांदा सणांच्या काळात बाजारात येईल. त्यामुळे सणासुदीत ग्राहकांना स्वस्त कांदा मिळेल, असे संदेश त्यांनी दिला. 

पण वस्तुस्थिती ही आहे की, रब्बीचे उत्पादन जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत. आता तुम्हाला माहित आहे की वर्षभर कांदा पुरवठ्यात रब्बीतील कांद्याचा वाटा ७० टक्क्यांपर्यंत असतो. आता याच रब्बीतील उत्पादन कमी झाल्याने पुरवठ्यात तूट तर असणार. 

पण सरकारच्या मते, उत्पादन केवळ १८ टक्क्यांनी कमी झालं. गेल्यावर्षी २३६ लाख टन उत्पादन झाले होते. ते यंदाच्या रब्बीत १९३ लाख टनांवर स्थिरावले. त्यात सरकारच्या धोरणांमुळे कांदा निर्यात कमी झाली. त्यामुळे कांदा उत्पादन कमी झाले तरी कांद्याचा तुटवडा सांगितला जातो त्या प्रमाणात नसेल, असेही सरकारच्या वतीने सांगितले जात आहे. 

म्हणजेच काय तर कांदा बाजारात मागच्या काही आठवड्यांपासून सरकार आणि व्यापाऱ्यांच्या वतीने काहीसा संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. सरकारने एक लाईन धरली आणि व्यापाऱ्यांची लाईन दुसरी आहे. या परिस्थितीत जाणकारांनी सांगितलं की, शेतकऱ्यांनी दिवळीपर्यंत पुरेल असा टप्प्याटप्प्याने कांदा विकावा. बाजारातील अचानक होणारे चढ उतार आणि चर्चांकडे दुर्लक्ष केलेले बरे. 

निधी खरे यांनी सांगितले की, स्टाॅक लिमिटमुळे तूर आणि हरभरा डाळीचे भाव कमी झाले. किती कमी झाले हे ऐकले तर तुमचे डोळे फिरतील. हरभरा डाळ किलोमागे ३२ पैसे स्वस्त झाली. तर तूर डाळ ३० पैशांनी स्वस्त झाली. सरकार बाजारावर सध्या माईंड गेम खेळत आहे. खरे तर तूर आणि हरभऱ्याची टंचाई आहे. त्यामुळे भावात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच असल्याचे अभ्यासक सांगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market : अकोल्यात हरभऱ्याला प्रतिक्विंटल सहा हजारांचा दर

River Revival : सतरा ग्रामपंचायतींच्या हद्दीत होणार खाम नदीचे पुनरुज्जीवन

Vegetable Market : कोल्हापुरात कोथिंबिरीची आवक चौपटीने वाढल्याने दरात घट

AAI Yojana : बिनव्याजी कर्ज असणाऱ्या 'आई' योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा

Groundnut Market : हिंगोलीत भुईमूगाच्या शेंगांना ४८०० ते ६६८० रुपयांचा दर

SCROLL FOR NEXT