Akola News: गेल्या दोन-तीन हंगामांपासून केळीला चांगला दर मिळत असून त्याबरोबरच मनरेगातून (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) लागवड ते व्यवस्थापनापर्यंत अनुदानही भेटत असल्याने शेतकऱ्यांचा या लागवडीकडे कल वाढला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी शेकडो हेक्टरवर योजनेतून तसेच वैयक्तिक पातळीवर केळीची लागवड होत आहे. यंदाच्या हंगामात गुढीपाडव्यानंतर काही शेतकऱ्यांनी केळी रोपांच्या लागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र बाजारपेठेत यंदा केळीची टिश्युकल्चर रोपांनाही महागाईच्या झळ बसल्याचे दिसून येत आहे. रोपांमागे एक ते तीन रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
केळी लागवडीसाठी या भागात प्रामुख्याने टिश्युकल्चर रोपांचा अधिक प्रमाणात वापर केल्या जातो. काही शेतकरी एप्रिलमध्ये, तर बहुतांश लागवड ही जून-जुलैत होत असते. एप्रिलमध्ये लागवडीची तयारी सुरू झाली असून, काही शेतकऱ्यांकडे कंपन्यांनी टिश्युकल्चर रोपांचा पुरवठा केला आहे. या हंगामात एका रोपाची किंमत ही १८ रुपयांपासून २१ ते २२ रुपयांपर्यंत आहे. कंपन्यानुसार ही किंमत बदलते.
गेल्या हंगामात किमान १६ रुपयांपासून टिश्युकल्चर रोप शेतकऱ्याला जागेवर कंपन्या पोहोचवून देत होत्या. एका एकरात १६५० ते १७०० रोपे वापरली जातात. आताच्या सरासरी १८ रुपये प्रतिरोप दराचा विचार केल्यास बेण्यासाठीच एकरी ३० हजारांचा निव्वळ खर्च करावा लागतो आहे. केळीच्या इतर व्यवस्थापनासाठीही मोठा खर्च लागत असतो. तरीही इतर पिकांच्या तुलनेत हे पीक शेतकऱ्यांना परवडणारे बनल्याने केळी लागवडीकडे कल अधिक वाढत चालला आहे.
कंपन्यांचे बुकिंग जोरात
यंदाच्या केळी हंगामात लागवडीसाठी रोपे पुरविण्याच्या उद्देशाने विविध टिश्युकल्चर उत्पादक कंपन्यांनी रोपांची नोंदणी सुरू केलेली आहे. या वर्षात जिल्ह्यात सहा ते सात लाखांपेक्षा अधिक रोपांचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. कंपन्यांनी स्थानिक भागात प्रतिनिधी नेमून नोंदण्या पूर्ण केल्या आहेत. तर एप्रिलमध्ये लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना रोपांचा पुरवठाही करण्यात आला.
मनरेगातून लाभ दिलासादायक
केळी उत्पादकांना मनरेगा योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जात आहे. यासाठी कमाल दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मर्यादा आहे. यासाठी जॉबकार्डची अट आहे. या कार्डधारकास एका वर्षात १०० दिवसांपेक्षा अधिक लाभ देण्यासाठी अधिक जॉब कार्डधारकांची मदत घ्यावी लागते. योजनेच्या लाभासाठी कृषी विभागामार्फत स्थानिक पातळीवर तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी दिली जाते. लागवडीसाठी शासन मान्यता असलेल्या कंपनी रोपवाटिकेतून रोपे घेणे बंधनकारक आहे.
पीक कालावधी तीनऐवजी दोन वर्षे करण्याची गरज
केळी उत्पादकांना मनरेगातून तीन वर्षांत दोन लाख ७९ हजार ६०० रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. मात्र, या भागात कुठलाही शेतकरी केळी पिकाचे तीन वर्षे उत्पादन घेत नाही. काही शेतकरी एका वर्षातच पीक काढतात. स्थिती चांगली असेल तर दोन वर्षांपर्यंत ही बाग चालवली जाते. अशा स्थितीत केळी पिकासाठी तीन वर्षांचा निकष कुचकामी ठरतो आहे. केळी उत्पादकांसाठी हा निकष व निधी दोन वर्षांचा करण्याची गरज आहे. तरच केळी उत्पादकाला संपूर्ण निधीचा लाभ मिळू शकेल. सध्या दोन ते सव्वा दोन लाखापर्यंतच हे अनुदान मिळते आहे. दोन वर्षांचा निकष बनवल्या गेला तर संपूर्ण अनुदान प्राप्त होईल.
टिश्युकल्चर रोपांच्या किमती
१८, १८.५०, १९, २१ रुपये
एकरी लागवड होणारी रोपे
१,६५० ते १,७००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.