Sugar  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Industry : राज्य बँकेकडून साखर मूल्‍यांकनात १०० रुपयांची घट

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : खुल्या बाजारात साखरेचे दर घसरल्याने आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनेही साखरेच्या मूल्यांकनात १०० रुपयांनी घट केली आहे. दोनच महिन्यांपूर्वी साखरेचे मूल्यांकन ३४०० रुपये केले होते.

आता २ मार्चपासून हे मूल्यांकन ३३०० रुपये असेल. नव्या मूल्यांकनानुसार कारखान्‍यांना प्रति क्विंटल २९७० रुपये इतकी उचल मिळेल. बँकेच्या या निर्णयामुळे कारखान्यांच्या अडचणीत वाढच होणार असल्‍याची प्रतिक्रिया साखर उद्योगाची आहे.

केंद्र अजूनही साखरेच्या एमएसपीत वाढ करण्‍यास तयार नाही. सातत्‍याने वाढीव कोटे कारखान्यांना देत आहे. साखर मुबलक प्रमाणात बाजारात असल्याने साखरेच्या दरात (Sugar Price) सातत्‍याने घसरण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य बॅंकेने हा निर्णय घेतल्‍याने साखर कारखाना वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.

हंगामाच्या अंतिम टप्प्यात हा निर्णय घेतल्याने शेवटच्या टप्प्यातील उसाच्या बिलावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ही बिले विलंबाने मिळण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

२०२० पर्यंत राज्य बँक दर तीन महिन्याला साखर दराचा आढावा घेऊन मूल्यांकन ठरवत होती. यामुळे साखरेचे दर घसरल्‍यास त्‍याचा फटका कारखान्यांना बसत होता. २०२० ला मात्र किमान विक्री मूल्याइतकी किंमत गृहीत धरून साखरेचे मूल्यांकन ३१०० रुपये केले. यानंतर साखरेच्या दरात चढ-उतार होत राहिली, परंतु बॅंकेने कोणताच निर्णय घेतला नव्हता.

काही कारखानदारांनीही मूल्यांकन वाढविण्याबाबत बँकेला विनंती केली होती. अखेर तीन वर्षांनी सकारात्मक हालचाली करताना बँकेने १ जानेवारीपासून २०२४ पासून मूल्यांकन वाढविले. तत्पूर्वी बँक प्रशासनाने साखर संघाकडून साखर उत्‍पादनाला येणारा खर्च, मिळणारी किंमत याचा लेखाजोखा मागवला.

व्‍यवस्थापन खर्चात वाढ झाल्याने अनेक कारखान्यांना एफआरपी देताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बॅंकेने मूल्यांकन वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर केवळ दोन महिन्यांतच मूल्यांकन शंभर रुपयांनी कमी केले. व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी मूल्यांनकन घटीचे पत्र कारखान्यांना पाठविले आहे.

पुढील हंगामावर परिणामाची शक्यता

अनेक कारखान्यांनी यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने भविष्‍यात साखरेचे दर वाढतील, या अपेक्षेने उत्पादकांनी एफआरपी पेक्षाही जादा दर दिला आहे. अशा कारखान्यांची या निर्णयामुळे गोची होण्याची शक्यता आहे.

सध्या अनपेक्षितपणे वाढणारे साखर उत्पादन, केंद्राच्या हस्तक्षेपामुळे कमी झालेल्या किमती यामुळे साखर दरात वाढ होण्याची शक्यता धूसर बनली आहे. केंद्राने इथेनॉलकडेही अतिरिक्त साखर वळविण्यास हिरवा कंदील दाखवला नाही.

एफआरपीतही वाढ केली. साखर विक्री न होता तशीच शिल्लक राहिल्यास पुढील हंगामावरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडीमुळे कारखाने शार्टमार्जिनमध्ये येऊ शकतील, अशी भीती साखर उद्योगाला आहे.

राज्य बँकेच्या निर्णयाचा दूरगामी विपरीत परिणाम या हंगामासह पुढील हंगामाला बसण्याची शक्यता आहे. साखरेला उठाव नसल्याने कारखाने अडचणीत असताना बँकेचा निर्णय कारखान्यांच्या चिंतेत भर टाकणारा आहे.
- विजय औताडे, साखरतज्ज्ञ
बँकेच्या नव्या निर्णयामुळे ऊस बिलासाठी अतिरिक्त खर्च वजा जाता प्रति क्विंटल केवळ २१२० रुपये शिल्‍लक राहणार आहेत. याशिवाय कमी केलेल्या उचल दरामुळे अपुरा दुरावा निर्माण झाल्यास ती रक्कम प्रथम वसूल करून मग उरणारी रक्कम ऊस बिलासाठी अदा हेाणार आहे. त्यामुळे या शिल्लक रकमेतून एफआरपी कशी द्यावी, असा प्रश्न आहे. हा निर्णय म्हणजे आगीत तेल ओतण्याचाच प्रकार आहे.
- पी. जी. मेढे, साखरतज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT