शेततळे शेवाळमुक्त ठेवण्यासाठी पाण्यामध्ये जाळी फिरवावी.
मत्स्यशेती करताना हवामानातील बदलामुळे व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे विविध समस्या उद्भवतात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपाययोजना केल्यास समस्यांवर मात करता येते. चांगल्या व्यवस्थापनातून मत्स्य उत्पादनात वाढ होऊन आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होते. मत्स्यशेतीचे यश हे व्यवस्थापनावर अवलंबून असते. मत्स्यसंवर्धनामध्ये पूर्वतयारी, मत्स्यबीज संचयन व त्यानंतरचे व्यवस्थापन हे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. मत्स्यशेती करत असताना काही समस्या उद्भवतात, त्याचा परिणाम माशांच्या वाढीवर होऊन उत्पादनात घट होते व त्यामुळे आर्थिक तोटा होतो. त्यामुळे अशा समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी मत्स्यसंवर्धनामध्ये येणाऱ्या प्रमुख समस्यांची व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेणे आवश्यक आहे.
१. तलावातील पाण्यात जास्त शेवाळ तयार होणे
मत्स्य तलावामध्ये खतांचे प्रमाण जास्त झाल्यावर पाणी गडद हिरव्या रंगाचे होते व पाण्यावर खूप शेवाळ तयार होते. त्यामुळे तलावातील प्राणवायूचे प्रमाण विशेषतः रात्री व पहाटे खूप कमी होऊन मासे पृष्ठभागावर येतात.काही वेळेस पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण अतिशय कमी झाल्यामुळे माशांची मरतूक होते. अशावेळेस पाण्यावरील शेवाळ जाळीने काढून तळ्यामध्ये प्रती एकर ५० ते १०० किलो चुना टाकावा.मत्स्यसंवर्धन काळामध्ये माशांची वाढ झपाट्याने होणे अपेक्षित असते. परंतु काही कारणांमुळे माशांची वाढ होताना दिसून येत नाही. माशांना खाद्य कमी प्रमाणात देणे हे एक कारण असू शकते.माशांना चांगल्या प्रतीचे पूरक खाद्य नियमितपणे दिले पाहिजे. या उलट हिवाळ्यामध्ये पाण्याचे तापमान कमी झाल्यामुळे माशांचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.अशा वेळेस पूरक खाद्याचे प्रमाण कमी करावे. कारण माशांनी न खालेले खाद्य तलावाच्या तळाशी जमा होते व त्यामुळे पाण्याचा दर्जा खालावतो व त्याचा परिणाम माशांच्या वाढीवर होतो.पहाटेच्या वेळी असंख्य मासे तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावर येतात व तोंडाची उघडझाप करतात. याचा अर्थ पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झालेले आहे असे समजावे.ही समस्या मुख्यत्वे उन्हाळ्यामध्ये दिसून येते. अशावेळेस पंपाद्वारे तलावामध्ये पाणी उंचावरून टाकणे. त्यामुळे हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढते.आधुनिक किंवा सधन मत्स्यसंवर्धन पद्धतीत एरेटर्सचा वापर करतात. या शिवाय स्प्रिंकलर्सद्वारेही पाणी तलावामध्ये टाकल्यास प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होते.माशांमध्ये रोगाचे प्रमाण वाढल्यास मरतुक होते. ही समस्या हिवाळ्यामध्ये उद्भवते. यामध्ये फिनरॉट, टेलरॉट यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.अशावेळेस चुना, पोटॅशियम परॅमगनेट, मिठाचे द्रावण इ. चा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने रोग नियंत्रणासाठी करावा.रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या माशांची तपासणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करून उपाययोजना कराव्यात.काही वेळेस माशांच्या अंगावर किंवा कल्ल्याच्या अथवा पराच्या मागे अर्ग्युलस नावाचे परजीवी आढळून येतात. हे अर्ग्युलस माशांचे रक्त पितात व मासे अशक्त होतात.माशांवर या परजीवींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास शरीरावर जखमा होऊन जिवाणूंचा प्रादुर्भाव होतो व माशांची मरतूक होते. यासाठी चुना, पोटॅशिअम परमॅंगनेट, मीठाचा वापर करावा. संपर्क ः डॉ. अजय कुलकर्णी, (मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)