Cattle health should be examined twice a year
आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक अवयवांमध्ये आणि रक्तामध्ये विशिष्ट बदल घडवितात. शरीरातील या विशिष्ट बदलांना तसेच रोगजंतूना ओळखून आजारांचे योग्य निदान प्रयोगशाळेतील तपासणीद्वारे करता येऊ शकते. व्यावसायिक पशुपालन करत असताना, अगदी कमी खर्चामध्ये अधिक नफा मिळविण्याकडे भर असतो. त्यामुळे जनावरांच्या शारीरिक क्षमतेवर ताण येतो, म्हणून जनावरांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यामध्ये संतुलित आहार, गोठ्याची स्वच्छता आणि विविध आजारांचे सुयोग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. विविध आजारांमुळे उत्पादनात घट होऊन, मरतुक होऊन आणि उपचारातील खर्चामुळे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जनावरांमधील विविध आजारांचे योग्य निदान करून, योग्य उपचार आणि प्रतिबंध तसेच जैवसुरेक्षेचे काटेकोर पालन, लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. वैद्यकशास्त्रामध्ये योग्य उपचार करण्यासाठी अचूक रोगनिदानाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे पशुवैद्यक शास्त्रामध्ये सुद्धा प्रयोगशाळेतील तपासणीचे रोगनिदानामध्ये अत्यंत महत्व आहे. जनावरे सुध्दा आजारांना बळी पडतात. आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक अवयवांमध्ये आणि रक्तामध्ये विशिष्ट बदल घडवितात. शरीरातील या विशिष्ट बदलांना तसेच रोगजंतूना ओळखून आजारांचे योग्य निदान प्रयोगशाळेतील तपासणीद्वारे करता येऊ शकते. पाळीव प्राण्यांमधील विविध जीवाणूजन्य, विषाणूजन्य, रक्तातील परजीवी जंतू, रक्तक्षय, चयापचयाच्या तक्रारी, शरीरातील पेशीदाह इत्यादी विविध आजार आणि आरोग्य विषयक तक्रारीचे योग्य निदान करून त्यावर प्रतिबंधक उपाय आणि उपचार करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, जेणेकरून आर्थिक हानी कमी प्रमाणात होईल. रक्तातील विविध घटकांचे मापन व परीक्षण करून विविध आजारांचे निदान करू शकतो. अचूक निदान झाल्यामुळे रोगी जनावरांचे विशिष्ट उपचार करावे, आणि कळपातील निरोगी जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय योजिले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांचा आजारी जनावरांच्या उपचारावरील अनावश्यक खर्च कमी होईल, तसेच जनावरांमध्ये मरतुकीचे प्रमाण कमी होऊन उत्पादनात वाढ होईल. रक्त तपासणीचे महत्त्व
साधारणपणे पशुवैद्यकाने आजारी जनावरांची प्राथमिक शारीरिक तपासणी केल्यानंतर, रोग निदान मुख्यतः रक्ततपासणीद्वारे करण्यात येते. रक्त हे मानवाच्या तसेच प्राण्यांच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. रक्ताद्वारे शरीरातील प्रत्येक उतीला प्राणवायू आणि पोषक घटक द्रव्ये पोचविले जातात. त्याचप्रमाणे अनावश्यक घटक जमा करून शरीराबाहेर टाकण्यास मदत करते.जनावरांच्या शरीरात कोणतीही इजा झाली असता शरीरातील रक्तामधील घटकांमध्ये बदल होतात. हे विशिष्ट बदल ओळखून विविध आजारांचे निदान करणे शक्य असते. त्यामुळेच रक्ताला एकूण शारीरिक आरोग्याचा प्रतिबिंब म्हटले जाते. प्रयोगशाळेतील रक्ताची तपासणी रक्ताचे काचपट्टीद्वारे परीक्षण
यामध्ये एक थेंब रक्त काचपट्टीवर पसरवून त्याला विशिष्ट रंगद्रव्याने रंगवून सूक्ष्मदर्शकाद्वारे परीक्षण केले जाते. यामध्ये तांबड्या पेशींचे प्रमाण, आकारमान व त्यामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण बघून रक्तक्षयाचे निदान केले जाऊ शकते. तसेच रक्तामधील विविध पांढऱ्या पेशींची टक्केवारी काढून आजारांच्या रोगजंतूंचा अंदाज बांधता येतो. ज्यामध्ये विषाणूजन्य आजार, जीवाणूजन्य आजार, ॲलर्जी, किंवा परजीविमुळे होणारे आजार, तसेच काही रोगजंतू प्रत्यक्ष रक्तामध्ये बघून आजारांचे अचूक निदान केले जाते. यामध्ये पाळीव प्राण्यांमध्ये विशेषतः संकरित गायींमध्ये आढळणारे विविध प्रकारचे गोचीड ताप (थायलेरीयोसीस, बबेशियोसीस, एनाप्लाज्मोसीस एर्लीशीयोसीस), सर्रा, घटसर्प इत्यादी रोगाचे अचूक निदान केले जाऊ शकते. पशुवैद्यकाच्या साहाय्याने ८ ते १० मिलि रक्त काढून विविध घटकांचे मापन करून जीवाणूजन्य, विषाणूजन्य आजार, ॲलर्जी, किंवा परजीविमुळे होणार आजार, रक्तक्षय तसेच रक्ताचा कर्करोग इत्यादी आजारांचे निदान करू शकतो. यामध्ये जनावरांच्या शिरेमधून रक्त काढून ते एका विशिष्ट बाटलीमध्ये त्वरित घेऊन इडीटीए ची पावडर मिसळावी लागते, जेणेकरून रक्ताच्या गुठळ्या तयार होणार नाही. यामध्ये रक्तातील विविध घटकांचे मापन केले जाते. तांबड्या पेशींची संख्या, त्यांची घनता व हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजून जनावरास रक्तक्षय असल्याचे निदान केले जाऊ शकते. पांढऱ्या पेशींची एकूण संख्या व विविध पाच प्रकारच्या पांढऱ्या पेशींची टक्केवारी मोजून झालेला आजार हा विषाणूजन्य, जीवाणूजन्य, परजीवीमुळे, किंवा ॲलर्जी मुळे झाला आहे याचे निदान करता येते. त्याचप्रमाणे संपूर्ण रक्त तपासणीद्वारे आजाराची तीव्रता आणि स्वरूप सुद्धा ओळखता येते. जनावरांतील पोटातील टोकदार वस्तू (फॉरेन बॉडी सिंड्रोम)जसे की तार, सुई, खिळा, इत्यादी तसेच रक्तातील कर्करोगाचे सुद्धा अचूक निदान संपूर्ण रक्त परीक्षणाद्वारे करणे शक्य आहे. रक्त द्रव्याची ( रक्तजल) तपासणी
यामध्ये साधारणपणे १० मिलि एवढे रक्त जनावरांच्या मानेतील शिरेतून काढून बाटलीमध्ये गोठू दिले जाते. त्यानंतर रक्ताची गुठळी तयार होऊन रक्तजल वेगळे होते, ज्याला सिरम असे म्हणतात. या रक्तद्रव्यामधून प्रयोगशाळेत विविध घटकांच्या तपासण्या करून विविध आजारांचे निदान केले जाते. यामध्ये प्रामुख्याने रक्तातील लोह, तांबे, कॅल्शिअम, फॉस्फरस, सोडियम, इत्यादी क्षारांचे प्रमाण, रक्तातील एकूण प्रथिने, रक्तातील कावीळ, रक्तातील जमा होणारे वाईट नत्रजन्य पदार्थ इत्यादी सुमारे वीस प्रकारच्या तपासण्या केल्या जातात आणि विविध आजारांचे योग्य निदान केले जाते. यामध्ये पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, यकृताच्या बिघाडामुळे होणारे आजार, मूत्रपिंडाच्या बिघाडामुळे होणारे आजार आणि चयापचयाच्या बिघाडामुळे होणारे आजार, इत्यादींचे निदान अचूकपणे करता येते. विविध दुर्धर व जुनाट आजारांमध्ये, शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर तसेच जनावरांची शारीरिक स्थिती खराब होत असेल तर रक्तातील विविध घटकांची तपासणी अवश्य केली पाहिजे. संपर्क- डॉ. भूपेश कामडी, ७५८८२२६०१८, डॉ. चंद्रशेखर मोटे, ८२३७२६९५९१, (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा)