Linseed Cultivation
Linseed Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Linseed Cultivation : जवस लागवडीसाठी वापरा सुधारित जाती

टीम ॲग्रोवन

जवस हे रब्बी हंगामातील (Rabi Season) महत्त्वाचे तेलबिया पीक (Oil seed crop) आहे. त्याचा उपयोग तेल व धागानिर्मितीसाठी (Thread Production) केला जातो. जवस हे अतिशय पौष्टिक असून, त्यामधून आठ प्रकारची प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात. जवसाच्या तेलामध्ये ५८ % ओमेगा-३, ओमेगा-६, कोलेस्ट्रेरॉलल आणि अँटिऑक्सिडंट आहेत.

जवस तेलाच्या एकूण उत्पादनापैकी २०% खाद्यतेल म्हणून, तर ८०% तेलाचा औद्योगिक क्षेत्रात साबण, पेंड, व्हॉर्निस, शाई तयार करण्यासाठी वापर होतो. जवसाची ढेप दुभत्या जनावरांसाठी उत्तम खुराक आहे. जवसाच्या कड्यापासून तयार होणाऱ्या धाग्याची प्रत चांगली असल्यामुळे त्याचा पिशव्या, कागद व कपडे तयार करता येतात.

जमीन :

जवस पिकासाठी मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. तिचा सामू (आम्ल-विम्ल निर्देशांक) ५ ते ७ दरम्यान असावा.

हवामान :

या पिकाच्या वाढीसाठी २० ते ३० अंश से. तापमान आवश्यक असते. या पिकास फुलोरा व त्यानंतरच्या अवस्थेत जास्त कोरडे व उच्च तापमान (३२ अंश से.) असल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय घट संभवते.

पूर्वमशागत :

प्रथम जमिनीची खोल नांगरट करून एक कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर काडीकचरा वेचून घ्यावा. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरून मिसळावे.

पेरणीची वेळ व अंतर :

जवसाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधवड्यात करावी. दोन ओळींतील ३० सेंमी किंवा ४५ से.मी. अंतर ठेवावे. तर दोन रोपांमधील अंतर १० सें.मी. ठेवावे. पेरणी ५ ते ७ सेंमीपेक्षा अधिक खोल करू नये.

बियाण्याचे प्रमाण :

अधिक उत्पादनासाठी रोपांची संख्या प्रति हेक्टरी ४.५ ते ५ लाख असावी. त्यासाठी शिफारस केलेले शुद्ध प्रमाणित, टपोरे व निरोगी बियाणे प्रति हेक्टरी ८ ते १० किलो प्रति हेक्टरी वापरावे.

जवसाची सुधारित वाणे व त्यांची वैशिष्ट्ये

अ.क्र. --- सुधारित वाणाचे नाव --- कालावधी (दिवस) --- तेलाचे प्रमाण (%) --- उत्पादन(कि./हे.) --- विशेष गुणधर्म

१. --- लातूर जवस-९३ --- ९०-९५ --- ४० --- ८००-१६०० --- लवकर तयार होणारा, कमी लागवड अंतरासाठी, कोरडवाहू लागवडीसाठी, मर, भुरी, अल्टरनेरीया अल्टरनेरीया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम.

२. --- एन.एल.-९७ --- ११५- १२० --- ४२ --- ६००-१२०० --- मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम.

३. --- एन.एल.-२६० --- १११-११५ --- ४३ --- १५००-१६०० --- मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम.

४. --- शारदा (कोरडवाहूसाठी) --- १००- १०५ --- ४१ --- ८०० --- मर, भुरी, अल्टरनेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम.

बीजप्रक्रिया :

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम किंवा थायरम ३ ते ३.५ ग्रॅम लावावे.

खत व्यवस्थापन :

रासायनिक तसेच सेंद्रिय खते जवसाच्या उत्पादनवाढीस महत्त्वाचे कार्य करीत असतात.

कोरडवाहू पिकासाठी, २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद संपूर्ण खत प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस द्यावे.

बागायती लागवडीसाठी, ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र (३० किलो) + संपूर्ण स्फुरद (३०

किलो) पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरीत अर्धी नत्र मात्रा (३० किलो नत्र) पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी द्यावी.

पाणी व्यवस्थापन :

जवस हे पीक पाण्यास उत्तम प्रतिसाद देणारे आहे. या पिकास दोनदा पाणी देणे आवश्यक आहे. पहिले पाणी पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच ४० ते ४५ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६५ ते ७० दिवसांनी (बोंडे धरण्याच्या वेळेस) द्यावे.

आंतरमशागत :

जवसाचे पीक पहिल्या ३५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर २५ दिवसांनी पहिली डवरणी करावी.

आंतरपीक : पुढील आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते.

१. जवस + हरभरा (४:२)

२. जवस + करडई (४:२)

३. जवस + मोहरी (५:१)

पीक संरक्षण :

१. गादमाशी :

-गादमाशीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्यात करावी.

- गादमाशीच्या नियंत्रणासाठी, डायमेथोएट (३०% प्रवाही) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

२. भुरी :

या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

या रोगाच्या नियंत्रणाकरिता, गंधक (पाण्यात मिसळणारी भुकटी) २.५ ग्रॅम किंवा कॅराथेन १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

३. अल्टरनेरिया ब्लाइट :

या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे होतो.

या रोगाच्या नियंत्रणासाठी, थायरम किंवा कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यासोबत बीजप्रक्रिया करावी.

रोगाची लक्षणे दिसताच, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

४. मर :

या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव कमी राहण्यासाठी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच करावी.

या रोगाच्या नियंत्रणाकरिता, थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे अशी बीजप्रक्रिया करावी.

काढणी व मळणी :

पिकाची पाने व बोंड्या पिवळ्या रंगाची झाल्यावर जवस पीक काढणीस योग्य असे समजावे. त्यानंतरच विळ्याच्या साह्याने काढणी करावी. त्यानंतर ४ ते ५ दिवस सूर्यप्रकाशात वाळवून नंतर मळणी करावी.

उत्पादित बियाणे स्वच्छ करून वाळवावे.

बियाण्यामध्ये ओलावा १० टक्क्यांपर्यंत आल्यास वाळविणे थांबवावे.

निर्जंतुक केलेल्या पोत्यात भरून कोरड्या हवेत त्याची साठवणूक करावी.

डॉ. अशोक डंबाळे, ८७८८०२७४७४

(सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, कृषी महाविद्यालय, सेलू)

टीप ः बियाणे खरेदी करताना त्यास कोणती बीजप्रक्रिया केली आहे ते तपासूनच पुढील प्रक्रिया करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT