Rural Development Agrowon
ॲग्रो गाईड

Rural Development : गाव नियोजनात शिवार फेरीचे महत्त्व?

जलयुक्त शिवार अभियानात गावाला दुष्काळ आणि पुरापासून वाचवण्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीसाठी शिवार फेरीत ग्राम समितीमध्ये विविध सदस्य असावेत. शिवार फेरीच्या वेळी सगळे सोबत असावेत, म्हणजे सर्व नोंदी घेता येतात.

Team Agrowon

डॉ.सुमंत पांडे

Village Management : महाराष्ट्रात दुष्काळ (Drought) आणि पुराची आपत्ती (Flood Calamity) काही नवीन नाही. मागील काही वर्षात पावसाने हात आखडता घेतल्याने शेती समोर अडचणी वाढल्या आहेत. आपल्याकडे सुमारे १९२ वर्षांची पर्जन्याची आकडेवारी आहे.

त्या नोंदी नुसार बहुतेक वेळा, पाऊस सरासरी इतकाच पडतो आहे; पूर्वी पावसाळ्यात पर्जन्याचा दिवसाचा कालावधी सुमारे ५७ ते ६० दिवस इतका राहत असे; तथापि हल्ली तोच कालावधी सुमारे २७ ते ३० दिवस इतका कमी झाला आहे.

यामुळे कमी काळात अधिक पाऊस असे गणित दिसते आहे, या बदलत्या पावसाचा परिणाम पिके आणि लोकजीवनावर दीर्घकाळ दिसतो.

अति पाऊस आणि पर्जन्याचा खंड :

सर्वसाधारणपणे मॉन्सून आपल्यासाठी पूरक आहे.

मॉन्सून काळ : जून ते सप्टेंबर

मॉन्सून पश्चात : ऑक्टोबर ते डिसेंबर

हिवाळी पाऊस : जानेवारी – फेब्रुवारी

मॉन्सून पूर्व पाऊस : मार्च ते मे

मॉन्सूनच्या स्वभावाप्रमाणेच जर पर्जन्य वृष्टी झाल्यास तो पिकांना पूरक असतो.

पावसाच्या काळातील वर्गीकरण

१) दिवसाचा पाऊस

२) जास्तीचा पाऊस

३) बीनपावसाचा काळ

पर्जन्याचा नोंदी

१) प्रत्येक गावातील पाणलोट निहाय पर्जन्य मापक असावा. तेथून दररोज सकाळी ८.३० वाजता अथवा सायंकाळी ५.३० वाजता पाऊस मोजला जातो. त्यानुसार पर्जन्याचा नोंदी ठेवाव्यात. हवामान शास्त्र विभागामार्फत प्रत्येक मंडळ निहाय नोंदी ठेवल्या जातात. या सर्व नोंदी maharain या संकेत स्थळावर उपलब्ध असतात.

२) दिवसाचा पाऊस ठरवताना अनेक बाबींची नोंद घ्यावी लागते, पावसाचा दिवस म्हणजे किमान रोजचा २,५ मिमी पाऊस पडल्यास तो पाऊस म्हणून गणला जातो.

कोरडा काळ आणि संरक्षित सिंचन :

२) २,५ मिमी पेक्षा कमी पाऊस असतो. तेव्हा त्याला कोरडा काळ असे संबोधले जातो आणि याच काळात संरक्षित सिंचनाची गरज भासते.

पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी आवश्यक पाणी:

(संदर्भ: मृद व जल संधारण विभाग परिपत्रक दिनांक ४/०८ /२०१५)

१) खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात पिकात दाणे भरणे, पीक फुलोऱ्यात येणे,दाणे भरणे,कळी,फुलोरा व शेंगा भरणे, पाते येताना आणि बोंडे भरताना अशा निरनिराळ्या पिकांच्या अवस्थेत वेगवेगळ्या काळात संरक्षित सिंचनाची गरज असते. नेमक्या त्याच काळात पुरेसा पाऊस नसल्यास वाढीवर परिणाम होतो. हाच धागा पकडून जलयुक्त शिवार अभियानाची रचना झालेली आहे.

२) जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वरील बाबी नियोजनकर्त्याने समजून घेणे अपरिहार्य आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत जलयुक्त शिवार अभियानाचा पाहिला टप्पा राबविण्यात आला आहे. यात अनेक यशकथा नक्कीच आहेत त्याच प्रमाणे अनेक प्रयत्न कथा देखील आहेत.

शिवार फेरी आणि त्याचे महत्त्व :

१) जलयुक्त शिवार अभियान टप्पा १ आणि आता सुरु असलेला टप्पा २ यामध्ये शिवार फेरीचे अत्यंत महत्त्व आहे. गाव जलपरीपूर्ण करणे हे उद्दिष्ट ठेवले आहे.

२) गाव /सूक्ष्म पाणलोट जल परिपूर्ण करण्याच्या नियोजनासाठी, कृषी सहाय्यक किंवा इतर कर्मचारी यांना गावातील /पाणलोटातील जलस्रोतांची माहिती असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वरील प्रमाणे उल्लेख केल्यानुसार माहिती असणे आवश्यक ठरते.

३) महाराष्ट्र राज्यात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता आणि खंडामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो.

• राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा

• अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती

• हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण

• अनिश्चित व खंडित पर्जन्यमान

यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता ह्या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सन २०१५-१६ पासून ते सन २०१८-१९ पर्यत राबविण्यात आले.

शिवार फेरीतील ग्राम समितीची गरज

जलयुक्त शिवार अभियानात गावाला दुष्काळ आणि पुरापासून वाचवण्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीसाठी शिवार फेरीत ग्राम समितीमध्ये विविध सदस्य असावेत. शिवार फेरीच्या वेळी सगळे सोबत असावेत, म्हणजे बारीक नोंदी घेता येतात.

कारण गाव शिवाराची माहिती असणारे सोबत असल्यास तेथील नेमकी माहिती नोंदवता येते,जसे की ओढे किती खोल आणि रुंद होते? आजची स्थिती काय आहे? ते गाळाने भरले आहेत किंवा कसे? इत्यादी.

१) सरपंच

२) उपसरपंच

३) ग्रामपंचायत सदस्य

४) गावातील पुरस्कार प्राप्त आणि प्रगतिशील शेतकरी

५) महिला प्रतिनिधी

६) जलसेवक

७) गावांशी संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि समन्वयक

८) जलसंधारण अधिकारी आणि कृषी अधिकारी

९) जिल्हा जलसंधारण अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम पहातील

शिवार फेरीला जाताना कोणती माहिती घ्यावी ?

१) सरासरी पर्जन्यमान(मि.मि.)

२) एकूण भौगोलिक क्षेत्र (हे.)

३) पाणलोट क्षेत्राचे उतार- निहाय वर्गीकरण.

४) लागवडीलायक क्षेत्र (हे.)

५) जलस्रोत : यात गावातील तलाव,विहिरी यांची माहिती आणि सद्य स्थिती.

६) गावची लोकसंख्या

७) गावाचा पाणलोट नकाशा, यामध्ये जलस्रोत आणि प्रवाह दर्शविलेले असावेत.

८) पशुधन संख्या इत्यादी.

शिवार फेरी फेरी कशी करावी?

१) शिवार फेरी ठरली की, त्याचा दिनांक आणि दिवसाची निश्चिती करावी.गावातील लोकांच्या आणि आपल्या सोयीचा दिवस निश्चित करावा.

२) एकदा ठरल्यावर त्यात शक्यतो बदल करू नये. वर उल्लेख केलेली माहिती सोबत ठेवावी.

३) शिवार फेरी पूर्वी पंचायतीमध्ये बैठक घेऊन त्याचा उद्देश आणि फलनिष्पत्ती लोकांना सांगावी.

४) पाणलोटानुसार आणि वस्तीनुसार कार्यक्रम आखावा.

५) ज्या वस्तीत भेट आहे त्याची पूर्व कल्पना गावकऱ्यांना द्यावी.

६) शिवार फेरीसाठी निघण्यापूर्वी सोबत गावाचा पाणलोटाचा नकाशा सोबत ठेवावा(त्याची A ३ आकाराची प्रिंट घ्यावी) हा नकाशा gsda॰gov॰in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

७) छोट्या पाणलोट क्षेत्रासाठी एक दिवस पुरतो. तथापि पाणलोट एकापेक्षा अधिक असल्यास अधिक दिवस लागतील. अशावेळी एकापेक्षा अधिक गट तयार करावेत.

८) प्रत्येक गटासोबत एक नोंद वही,पेन पेन्सील,टोक यंत्र, खोड रबर, पाण्याची बाटली,उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पांढरा रुमाल, टोपी इत्यादी सोबत ठेवावे. शक्यतो पायात बूट असावेत.

९) केवळ उपचार म्हणून शिवार फेरी नको.

शिवार फेरी दरम्यान घ्यावयाच्या नोंदी:

१) जलयुक्त शिवार अभियानात शिवार फेरीला अनन्य साधारण महत्त्व आहे. सोबत असलेल्या नकाशाचे नीट वाचन करावे. त्यातील ओढे, नाले,नदी,यांचा उगम ,इतर ओढ्यांशी त्यांचा झालेला संगम इत्यादी पहावे.

२) शिवारातील प्रत्येक ओढ्याला ओळख असते,त्याचे नाव असते ते नकाशावरील ठिकाणी लिहून ठेवावे,एकदी विहीर असल्यास त्याची आकृतीसह नोंद करून ठेवावी. कूपनलिका असल्यास त्याचीही नोंद करावी.

३) १९७२ च्या दुष्काळात अनेक ओढे, नाल्यावर बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यांची नोंद घ्यावी. यातील बहुतांशी ओढे हे गाळाने भरले आहेत किंवा तुटलेले आहेत. त्यांची नेमकी नोंद ठेवणे आवश्यक आहे. कारण हे धरण किंवा तलाव गाळमुक्त करावयाच्या नियोजनात याचा उपयोग होईल.

तलावांचे सांडवे:

तलावाचे रक्षणकर्ते असा यांचा उल्लेख करतात. धरण, तलावाचे बांधकाम करत असताना त्या क्षेत्रात असलेले ओढे, नाले प्रवाह इत्यादी तसेच पर्जन्यमान, तेथील उतार इत्यादी बाबी विचारात घेऊन त्याची क्षमता ठरविण्यात येते. त्यानुसार क्षमता ठरते.

क्षमतेपेक्षा अधिक पाणी साठल्यास तलाव फुटण्याची शक्यता असते,कधी कधी ढगफुटी सारखा पाऊस झाल्यास वेगाने पाणी येते, तलाव फुटू शकतो म्हणून क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचा साठा झाल्यास अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे वाहून जाते आणि तलावात त्याच्या क्षमते एवढेच पाणी साठते.

या कामासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी अभियंत्याची मदत घ्यावी किंबहुना त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करावे.

नियोजनात मोबाईल फोनचा वापर

१) शिवार फेरी करताना एकदा स्मार्ट फोन सोबत ठेवावा.

२) अक्षांश आणि रेखांश असलेले फोटोचे ॲप डाऊनलोड करून घ्यावे. म्हणजे त्यात फोटोची नेमकी जागा नोंद होते.

३) महत्त्वाचे जेथे काम करावयाचे आहे अशा ठिकाणचे अक्षांश आणि रेखांश यांच्या नोंदी ठेवणे गरजेचे आहे. यामुळे त्या भागाचा गूगल अर्थ चा वापर करून तंतोतंत नकाशा तयार करता येतो. या नकाशाचा वापर करून तलावांची रचना, त्याचे आकारमान त्यातील गाळ, लांबी, रुंदी इत्यादी माहिती सहज समजते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Disease : ‘लम्पी’ लसीकरण सुरू; तूर्त आजारी पशूंची नोंद नाही

Soybean Sowing : मराठवाड्यात २२ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी

Tree Plantation: कोटीच्या कोटी वृक्ष लागवड उद्दिष्टांची उड्डाणे?

Interview with Rajendra Jadhav: सोयाबीन, कापूस, तूर दबावात राहण्याची चिन्हे

Krishi Karma Vidya: एका ग्रंथाचा शोध आणि बोध

SCROLL FOR NEXT