Road Agrowon
ॲग्रो गाईड

आयुष्याची राखरांगोळी करणारे अपघात

टीम ॲग्रोवन

अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत राहिले, तर जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये अपघाताचा समावेश होईल असे जागतिक आरोग्य संघटना (World Health Orginisation) सांगत आहे. अपघातात अनेकांचे परिवार पूर्णपणे नष्ट होतात, काहींचे पालकत्व हरवते, तर काहींच्या कुळाला वारसदार राहत नाही. जगातील अपघातांचा अभ्यास करता रस्ते अपघातांमध्ये आपला देश अव्वल आहे

याशिवाय त्यात होणारे मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे. २०१९ मध्ये देशात दोन लाख ३५ हजार ९२९ रस्ते अपघात झाले, त्यात ९२ हजार ८३७ व्यक्ती मरण पावल्या. २०१४ मध्ये हा आकडा ३६ हजार ५४३ इतकाच होता. मृत्यू जरी आपण टाळू शकत नसलो, तरी रस्ते अपघात टाळून दुर्दैवी मरण आपण निश्‍चित टाळू शकतो, यासाठी फक्त सर्वांनी एकत्र येण्याची आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार याबाबत गंभीर आहेतच मात्र काही बदल आपण स्वतःहून स्वीकारणे अपेक्षित आहे.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी तसेच मृत्यू रोखण्यासाठी दीर्घकालीन आणि विशेष उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. या अपघातांनी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच जीडीपी देखील कमी होतो हे अनेकांना माहीत नसावे. जगातील एकूण वाहनांच्या तुलनेत भारतात फक्त एक टक्का वाहने आहेत. मात्र रस्ता अपघातात मरण्याचे प्रमाण ११ टक्के इतके आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडील वाहनांना सध्याचे रस्ते हे पुरेसे पडत नाहीत, त्यात अनेक तांत्रिक दोष असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

केवळ रस्ते बांधून आणि शहरे आणि गाव जोडले म्हणजे विकास होतो हे चुकीचे आहे. रस्त्यांचा दर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यांचे बांधकाम करणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या जाळ्यांपैकी फक्त दोन टक्के राष्ट्रीय महामार्ग आणि तीन टक्के राज्य महामार्ग असून, इतर रस्ते ९५ टक्के आहेत. त्यावर होणारे अपघात अनुक्रमे ३० टक्के, २५ टक्के, २५ टक्के असून मृत्युदर अनुक्रमे २५ टक्के, ३६ टक्के, ३९ टक्के इतके आहे. यावरून एक लक्षात येते, फक्त चांगले रस्ते करून प्रवास वेगवान होईल, प्रवासाची वेळ कमी करता येईल.

मात्र सुरक्षेचे उपाय नसल्यास अपघात वाढतात आणि चांगल्या रस्त्यांवर होणारे अपघातांचे, मृत्यूचे प्रमाण जास्त वाढले जाते. चांगल्या रस्त्यांसोबत रस्त्यांना डिव्हाइडर, दुसऱ्या रस्त्यांची क्रॉसिंग, रस्त्यांवरील साइड पट्ट्यांची भरणी, रस्त्यावरील लेन, सूचनाफलक, रस्त्यांचे वळण, घाट योग्य असणे आवश्यक आहे. अनेक रस्त्यांचा उतार चुकीचा असल्याने देखील रस्ते मृत्यूचे सापळे झाले आहेत. रस्त्यांवरील योग्य ठिकाणी योग्य प्रकारचे आणि योग्य प्रमाणात गतिरोधक असणे आवश्यक आहे, अन्यथा या गतिरोधकांमुळे देखील काही अपघात होतात.

मोटर सायकल हे वाहन आपल्याकडे सर्वाधिक वापरले जाते. एकूण रस्ते अपघातात दुचाकीच्या अपघाताचे प्रमाण ३० टक्के आहे. मात्र, मृत्युदर अधिक आहे. हा मृत्युदर फक्त हेल्मेटच्या वापराने ३९ टक्के इतका कमी करता येतो, तर गंभीर जखमी होण्याचे प्रमाण ७२ टक्के इतके कमी करता येते. सरकारने शहरांतर्गत, गावांतर्गत सूट देऊन इतर सर्व ठिकाणी हेल्मेट सक्ती करणे आवश्यक आहे. आपल्या देशाची एकंदर स्थिती पाहता देशात ११० सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे इंजीन आणि ६० ते ७० किलोमीटर प्रतितास वेग असणारी दुचाकी वाहने आपल्याला पुरेसे आहेत.

परंतु आजच्या तरुणाईकडे असणारी मोठमोठ्या वेगाची आणि क्षमतेची दुचाकी वाहने बऱ्याचशा अपघातांना निमंत्रण देतात. अनेक दुचाकीस्वार चारचाकी स्वारापेक्षाही अधिक वेगाने प्रवास करतात. त्यामुळे सरकारने ११० सीसी आणि जास्तीत

जास्त ७० चा स्पीड अधिकृत करून यापेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने उपाय करावा. ज्यामुळे इंधनाची देखील बचत होईल, प्रदूषण कमी होईल आणि अपघात देखील कमी होतील. वाहतूक पोलिसांनी देखील अमर्याद वेग, हेल्मेट नसणे यावर कठोर कार्यवाही करावी. चारचाकी वाहनाला सीट बेल्ट आणि दुचाकी वाहनाला हेल्मेट अत्यावश्यक करणे गरजेचे आहे. दुचाकी असो की चारचाकी वाहन चालकाने व्यसन केलेले असल्यास अपघाताची शक्यता कित्येक पटींनी वाढते.

मात्र यावर अजून ठोस उपाय करण्यात आपण यशस्वी झालो नाही हे खेदाने नमूद करावे लागेल. कायदे तर आहेत मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे ती जनजागृती. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये वाहतूक पोलिसांकडून ट्रक चालकांचे प्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. दारूबरोबरच इतर महागड्या व्यसनांचे सेवन करून अनेक निष्पापांचे बळी जातात यावर उपाय म्हणून प्रबोधन करण्यासाठी सामाजिक संस्थेने पुढे येणे आवश्यक आहे. कायदे कडक करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

अपघात होण्याच्या कारणांमध्ये इतरही काही महत्त्वाची कारणे आहेत. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसणे हे एक कारण आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यास रस्त्यांवरील गर्दी कमी होऊन अपघात कमी होतील. मुंबईत लोकलच्या जाळ्यामुळे रस्ते अपघात कमी झाल्याचे पाहायला मिळाले. ग्रामीण भागात एसटी महामंडळ अधिक भक्कम करण्याची गरज आहे. महामंडळ तोट्यात असले तरी अनेकांचे प्राण त्यामुळे वाचू शकतात हे लक्षात घेतले पाहिजे.

रेल्वे वाहतूक सर्वांत सुरक्षित आहे. मात्र वेळेवर बुकिंग न मिळणे, गर्दी असणे हे प्रकार नियमित होतात. त्यामुळे रेल्वेचे प्रमाण वाढवण्याचे काम केंद्र सरकारने करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील वाहने कमी करता येऊ शकतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमकुवत झाल्याने अनेकदा वाहन क्षमतेपेक्षा अधिक सामान तसेच व्यक्तींची वाहतूक होताना दिसते. त्यामुळे देखील अनेकांचे अपघात होऊन प्राण जातात. ट्रक किंवा मालवाहतूक करणारी अनेक वाहने मर्यादेपेक्षा अधिक सामानाची वाहतूक करतात यांच्यामुळे अपघात घडतात.

रस्ते अपघात घडण्याच्या इतर कारणांमध्ये वाहनांना ब्रेक, हेडलाइट नसणे, वाहनात तांत्रिक दोष असणे, रस्त्याच्या कडेला अंधार असणे, स्ट्रीट लाइट बंद असणे, गतिरोधकाचे तसेच इतर मार्गदर्शक सूचनांचे फलक जागेवर नसणे, रस्त्यावर अनेक वळणे तसेच रस्ते अरुंद असणे आदी कारणे आहेत. लांबच्या प्रवासात चालकाला झोप लागत असल्याने अनेक अपघात घडतात.

यासाठी दर दीड ते दोन तासांनी चालकाने गाडी उभी करून फ्रेश होणे आवश्यक आहे. वाहन चालकाने पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. वाहन चालवत असताना झोप लागल्यास वाहन उभे करणे सर्वोत्तम. रस्त्यावरील भटके प्राणी, कुत्रे, गाई यांच्यामुळे देखील अपघात घडतात. स्थानिक प्रशासनाने यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. वाहतुकीचे सर्व नियम चालकांना माहीत असणे आवश्यक आहे.

वाहनाचा, वाहन चालकाचा आणि इतर सर्वांचा अपघात विमा असणे आवश्यक आहे. ॲम्बुलन्स सेवा प्रत्येक शहरात तत्पर असल्यास किमान मृत्युदर आपण कमी करू शकतो. अपघातग्रस्तांना वेळेवर मदत झाल्यास देखील मृत्युदर कमी होतात. याबाबत जनजागृती करून अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्याची गरज आहे. येत्या काळात आपण हे सर्व बदल केल्यास अनेक जिवांचे प्राण वाचू शकतो तसेच अनेक घरे उध्वस्त होण्यापासून आपण रोखू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT