Guava Orchard Management : जास्त तापमानामुळे पपई ची पानं करपण, फळावर चट्टे पडण, फळातील गर खराब होऊन फळे पिवळी पडून गळतात. तर पेरुच्या आंबे बहरातील फळांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
पपई पिकाला सरासरी २२ ते २६ अंश सेल्सिअस तापमान मानवत. पण तापमानाचा पारा ४० च्या वर गेल्यास जमिनीतील तापमानामुळे उष्णतेचा परिणाम मुळांवर होतो. त्यामुळे मुळे खराब होतात. मुळांच अन्नद्रव्य आणि पाणी शोषण करण्याचं काम मंदावत. फळांचा आकार लहान राहतो आणि फळाच्या गरामध्ये साका तयार होतो. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.
वाढलेल्या तापमानामुळे पपई झाडावर पांढरी माशी, तुडतुडे या रसशोषक किडी आणि काही विषाणूजन्य रोगही पडतात. त्यामुळे पानांचा रंग हिरवट पिवळसर होतो. पानांवर सुरकुत्या पडतात. जास्त प्रादुर्भावामध्ये फळावर पिवळे चट्टे पडतात. त्यामुळे फळांची प्रत खालावते.पपई बागेत जर अशा समस्या येत असतील तर,
बागेला ठिबक सिंचनाद्वारे शक्यतो रात्रीच्या वेळी पाणी द्यावं. झाडाच्या खोडाच्या चारही बाजूंनी शेतातील उरलेल्या काडीकरचऱ्याचं आच्छादन कराव. आच्छादनाचा थर साधारणपणे ३ ते ४ इंच इतका खोडाच्या चारही बाजूंनी करावा. बागेत ६० ते १०० मायक्रॉन जाडीच काळ्या रंगाच प्लॅस्टिक आच्छादन कराव. झाडावर ५ ते ८ टक्के तीव्रतेच्या बाष्परोधकाची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.याशिवाय झाडाच्या आळ्यात मटाका सिंचनाने पाणी दिले तरी जमिनीत ओलावा टिकून राहतो.
बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण केल्यासही बागेच उन्हापासून संरक्षण होतं. नवीन लागवड केलेल्या झाडांना गोणपाट किंवा जुन्या साड्या लावून सावली करावी.सायंकाळच्या वेळी संपूर्ण झाडावर एक दिवसाआड पाण्याचा फवारा पंपाने करावा. पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पानांवर १ ते दीड टक्के पोटॅशिअम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी. याशिवाय
कडक उन्हात पेरु बागेला जर पाणी कमी पडत असेल तर फूलगळ, फळगळ होते. लहान फळे पिवळी पडून गळतात. झाडाची पाने सुकतात, करपतात. बागेतील उघडी पडलेली फळे कडक उन्हामुळे अकाली पिवळी पडतात.फळांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तापमान वाढीमुळे फळांची गुणवत्ताही खालावते. अशा वेळी लक्षणे ओळखून लगेच उपाय करावे लागतात. उपाय करताना..पेरु बागेतील काळी पडलेली, वाळलेली फळे आणि झाडाखाली गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. झाडातून होणारं पाण्याचं बाष्पीभवन कमी होण्यासाठी केओलिनच्या ८ टक्के द्रावणाची फवारणी करावी.
केओलीनची फवारणी केल्यामुळे पिकाच्या पानांवर तसच फळांवर पातळ पांढरा थर तयार होतो. हा पांढऱ्या रंगाचा थर तीव्र सूर्यकिरणे पानांत किंवा फळांत जाऊ न देता तो वातावरणात परावर्तित करतो. त्यामुळे पानांमधून होणारे बाष्पोत्सर्जन २५ ते ३० टक्क्यांनी कमी होतं. कमी पाण्यातही पीक तग धरुन राहतं. दुष्काळी परिस्थितीत झाडे तग धरून राहण्यासाठी १ टक्के पोटॅशिअमची फवारणी केली तरी चालते. तसेच हलकी छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा. त्यामुळे झाडाची पाण्याची गरज कमी होते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत प्रति हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत. अशा प्रकारचे उपाय करुन कडक उन्हापासून पपई आणि पेरु बाग वाचवता येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.