Cashew Crop Management
Cashew Crop Management Agrowon
ॲग्रो गाईड

Cashew Crop Management : शेतकरी नियोजन पीक : काजू

Team Agrowon

शेतकरी ः प्रमोद दत्तात्रय लोके

गाव ः खांबाळे, ता.वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

काजू लागवड ः २ एकर (१५० झाडे)

वेंगुर्ला ४ ः ९० झाडे

वेंगुर्ला ७ ः ६० झाडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे (ता.वैभववाडी) येथे प्रमोद लोके (Pramod Loke) यांची ७ एकर शेती आहे. त्यापैकी २ एकरामध्ये काजू, दीड एकरांत आंब्याची ५५ झाडांची लागवड आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये खरीप हंगामात (Khrip Season) भात पिकाची लागवड (Paddy Crop Sowing) केली जाते. २०१७ रोजी २० बाय २० फूट अंतरावर दोन एकरांत काजूच्या वेंगुर्ला ४ आणि ७ या जातींच्या झाडांची लागवड केली आहे. त्यापैकी वेंगुर्ला ४ या काजू जातीची ९० झाडे आणि वेंगुर्ला ७ या जातीची ६० झाडे आहेत.

व्यवस्थापनातील बाबी ः

- साधारण मे महिन्यात काजू हंगाम संपतो. त्यानंतर बागेत पुढील कामकाजास सुरुवात केली जाते.

- हंगाम संपल्यानंतर जून महिन्यात बागेतील पालपाचोळा गोळा करून झाडाच्या बुंध्यात रचून ठेवला. जेणेकरून पावसाळ्यात पालापाचोळा कुजून झाडाला सेंद्रिय खतांचा पुरवठा होईल. बागेतील रोगग्रस्त आणि मोडलेल्या फांद्या काढून बाग स्वच्छ केली.

- जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झाडांच्या आकारमानानुसार प्रतिझाड ५ ते १० किलो प्रमाणे शेणखताची मात्रा दिली. ही मात्रा झाडाच्या बाजूने रिंग पद्धतीने चर काढून दिली.

- दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या मध्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. परंतु यावर्षी ऑगस्टमध्ये सतत पाऊस पडत होता. त्यामुळे पावसात उघडीप मिळताच ऑगस्टच्या अखेरीस सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया खतांच्या मात्रा दिल्या.

आगामी नियोजन ः

- पावसामुळे बागेत मोठ्या प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पुढील आठवड्यात ग्रास कटरच्या मदतीने संपूर्ण बागेतील तण काढून बाग तणविरहित केली जाईल.

- ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पालवी येण्यास सुरुवात होते. या काळात टी मॉस्किटो बगचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी शिफारशीप्रमाणे दरवर्षी फवारणी केली जाते. मात्र, यावर्षी सततच्या पावसामुळे अद्याप फवारणी करता आली नाही. पुढील काळात पाऊस थांबताच फवारणी केली जाईल. पहिल्या फवारणीनंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी केली जाते.

- फवारणीपूर्वी संपूर्ण बागेचे निरिक्षण केले जाते. त्यानंतर फवारणीसाठी कीटकनाशकांची निवड केली जाते. साधारण मोहोर आल्यानंतर पहिली आणि फळधारणा झाल्यानंतर दुसरी फवारणी केली जाते. शिवाय वातावरणातील बदलानुसार फवारणीचे नियोजन केले जाईल.

- यावर्षी परतीचा पाऊस लांबला आहे. याचा काजू हंगामावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. बागेतील काही झाडांवर सध्या पालवी फुटताना दिसते आहे. सध्याचे वातावरण पाहता संपूर्ण पालवी येण्यासाठी अजूनही १५ ते २० दिवस लागतील. त्यानंतर मोहोर येऊन फळधारणा होणार. म्हणजेच याचा एकूण परिणाम काजू हंगामावर होणार अशी शक्यता वाटते.

- नोव्हेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात झाडांना मोहोर येण्यास सुरुवात होते. या काळात बागेचे निरिक्षण करून फवारणी केली जाईल.

- दरवर्षी वेंगुर्ला ४ या जातीच्या काजू झाडांस आधी मोहोर येतो. त्यानंतर १० ते १५ दिवसांनी वेंगुर्ला ७ या जातीच्या झाडांना मोहोर येतो. झाडावर पूर्ण परिपक्व होऊन जमिनीवर पडलेले काजू बी गोळा केले जाते. प्रतवारी करून काजू बी ची साठवणूक केली जाते. त्यानंतर एप्रिल किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात काजू बी ची विक्री केली जाते.

उत्पादन ः

सध्या झाडे कमी वयाची असल्याने कमी प्रमाणात उत्पादन मिळत आहे. मागील हंगामात वेंगुर्ला ४ या जातीच्या झाडांपासून २०० किलो आणि वेंगुर्ला ७ झाडांपासून २५० किलो काजू उत्पादन मिळाले.

- प्रमोद लोके, ८३०८७६७१३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT