Emergency Crop Planning Agrowon
ॲग्रो गाईड

Emergency Crop Planning : अनियमित पावसाच्या स्थितीतील आपत्कालीन पीक नियोजन

Crop Management : महाराष्ट्रातील बहुतांशी शेती कोरडवाहू असून, जमीन, हवामान आणि पर्जन्यमानातील विविधतेप्रमाणे पिकांच्या प्रकारातही विविधता आढळते. प्रामुख्याने पावसाच्या लहरीपणामुळे बऱ्याचवेळा पिकांच्या दृष्टीने बिकट परिस्थिती निर्माण होत आहे

Team Agrowon

अमर तायडे

Emergency Crop Management : गेल्या काही वर्षापासून पावसाच्या अनियमितपणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. कधी पाऊस वेळेवर आला तरी मध्येच मोठा खंड पडणे, पाऊस उशिरा सुरू होणे, लवकर संपणे, उशिरापर्यंत पडणे, अतिवृष्टी होणे अशा घटनांमुळे पिकांवर गंभीर परिणाम होतात. या वर्षीही पाऊस उशिरा आला आणि त्यातही मोठा खंड पडला आहे. अशा आपत्कालीन स्थितीत करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.

महाराष्ट्रातील बहुतांशी शेती कोरडवाहू असून, जमीन, हवामान आणि पर्जन्यमानातील विविधतेप्रमाणे पिकांच्या प्रकारातही विविधता आढळते. प्रामुख्याने पावसाच्या लहरीपणामुळे बऱ्याचवेळा पिकांच्या दृष्टीने बिकट परिस्थिती निर्माण होत आहे
पावसात खंड हा सर्वसाधारणपणे जुलै-ऑगस्ट महिन्यात पडतो. पाऊस वेळेवर सुरू झाला, तर १५ जुलैपर्यंत खरीप हंगामातील सर्व पिके चांगली येतात. मात्र, १५ जुलैनंतर पावसामध्ये दोन ते चार आठवडे खंड पडला, तर पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते.
पीक फुलोऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत दीर्घकाळ पावसाचा खंड असताना व्यवस्थापनामध्ये पुढील बाबींचा समावेश करावा.
- सोयाबीन पिकाला संरक्षित पाणी व पोटॅशिअम नायट्रेटची २ टक्के (म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर पाणी)प्रमाणे फवारणी करावी.

- कापूस पिकाला पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) या विद्राव्य खताची साधारणपणे १ टक्का (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे पिकामध्ये पाण्याच्या संभाव्य ताणास प्रतिकार क्षमता वाढवते.
- सध्याच्या पावसाच्या खंड स्थितीमध्ये वारंवार डवरणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी. त्यासाठी डवऱ्यांच्या जानकुळास दोरी गुंडाळून पिकाच्या ओळीत चर काढावेत. त्यामुळे पडणारे पावसाचे पाणी जागेवरच मुरेल.
- शेततळे असल्यास जास्तीचे पाणी शेततळ्यात साचवावे. पावसाचे पाणी शेताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- पाण्याची थोडीफार व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबक संच, तुषार सिंचन किवा एकआड एक सरी पद्धतीने संरक्षित ओलीत करावे. पिकाला संवेदनशील अवस्थेत (विशेषतः कपाशीला बोंडे भरण्याच्या अवस्थेत व सोयबीनला शेंगा भरण्याच्या अवस्थेत) पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

-कापूस पिकाला खताची पूर्ण मात्रा जमिनीत पुरेसा ओलावा (२०० ते ३०० मि.मी. पाऊस) असल्याशिवाय देऊ नये.
-कापसाला पावसाचा खंड पडल्यास संरक्षित पाणी द्यावे. जर पाणी नसेल तर हलकी कोळपणी करावी. त्यामुळे तण नियंत्रणासोबतच जमिनीच्या भेगा बुजल्यामुळे जमिनीतील ओलावा उडून जाण्याचे प्रमाण कमी होते.
-पाऊस किवा सिंचनपश्चात पिकामध्ये पाण्याच्या ताणाची स्थिती सुधारल्यावर कापूस पिकामध्ये फुलोरा अवस्थेत युरिया (२ टक्के) व बोंडे धरण्याच्या/पोसण्याच्या अवस्थेत डीएपी (२ टक्के) प्रमाणे फवारणी फायदेशीर ठरते.
-सोयाबीन पिकामध्ये ५० व ७० दिवसांच्या पीक अवस्थेत २ टक्के युरियाची फवारणी किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेत विद्राव्य १९:१९:१९ ची २ टक्के प्रमाणे फवारणी केल्यास अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
- कमी क्षेत्रावर लागवड केलेल्या किवा भाजीपाला पिकामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा (गव्हाचा भुस्सा, काडी कचरा/धसकटे, वाळलेले गवत इ.) वापर करावा. यामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.

फळबागांचे आपत्कालीन नियोजन
१) आच्छादनाचा वापर :

बाष्पीभवनाने ओल उडून जाते. ही ओल टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रीय पदार्थ उदा. उसाचे पाचट, गवताचे काड, लाकडाचा भुस्सा, पालापाचोळा या पदार्थांचे आच्छादन प्रत्येक झाडाच्या तंतूमय मुळ्या पसरलेल्या ठिकाणी करावे किंवा फळझाडाच्या आळ्यामध्ये सोयाबीन/गव्हाचा भुस्सा, वाळलेले गवत, गिरीपुष्प पाल्याचे आच्छादन करावे. फळबागेमध्ये बोर्डो पेस्टचा वापर करावा. सिंचनासाठी शक्यतो सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.


२) पाण्याची फवारणी करावी :
सायंकाळच्या वेळी शक्य असल्यास संपूर्ण झाडावर एक दिवसाआड पाण्याची फवारणी पंपाच्या साह्याने करावी. फळझाडे ताणावर असल्यास पानांचे तापमान वाढते. ते या फवारणीमुळे कमी होते. पानाद्वारे पाण्याने उत्सर्जनही कमी होते. झाडाच्या अंतरंगात गारवा निर्माण होतो. पानाची कर्बग्रहणाची क्रिया सुधारते.

३) फवारणीद्वारे खताचा वापर : दुष्काळी परिस्थितीत फळझाडाची तग धरून राहण्याची शक्ती किंवा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पानावर एक ते दीड टक्के पोटॅशिअम नायट्रेटची (१३:००:४५) फवारणी करावी.

हे महत्त्वाचे...
खरीप पिकाची पेरणी झाल्यावर ३० ते ४० दिवसांनी आंतरमशागतीचे कामे पूर्ण झाल्यावर उभ्या पिकात २, ४ किंवा ६ ओळीनंतर कोळप्याच्या साह्याने किवा बळीराम नांगराने सरी काढून घ्यावी. या सरीचा उपयोग ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील पावसाचे पाणी यशस्वीरीत्या मुरविण्यासाठी होतो.

अमर तायडे, ९८५०६२०००२
(विषय विशेषज्ञ - कृषी विस्तार, कृषी विज्ञान केंद्र, घातखेड, अमरावती.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT