सुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने श्रीवर्धनी जातीच्या क्षेत्रात इतर जातीच्या सुपारीची लागवड करुन चालणार नाही. कारण भविष्यात श्रीवर्धनी सुपारीच्या प्रतीवर परिणाम होवून बाजारपेठेत दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीवर्धनी ही जात टिकून रहाणे गरजेचे आहे. सुपारीला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याबरोबरच व्यापारी, आर्थिक आणि औषधी महत्व आहे. सुपारीची लागवड सिंधुदुर्गातील वैभववाडी, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, देवगड, मालवण आणि रत्नागिरीतील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड त्याचप्रमाणे रायगड मधील श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, अलिबाग येथे मोठ्या प्रमाणात आहे. पालघर जिल्हयात वसई व पालघर मध्ये सुपारीची तुरळक लागवड दिसते. निसर्ग वादळाने इतर पिकांबरोबर सुपारीचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील सुपारीच्या बागा या पारंपारिक पध्दतीने लागवड केलेल्या बागा आहेत. यामध्ये १ वर्ष ते ३० ते ३५ वर्षे वयोगटातील झाडे आहेत. दरवर्षी बागायतदार स्वत:साठी उत्तम जातीची रोपे आपल्या बागेत तयार करत असतात. दरवर्षी किरकोळ स्वरुपात पावसाळ्यात सुपारीची झाडे रोगाने किंवा वाऱ्याने पडून मरत असतात. हे दरवर्षी कमी अधिक प्रमाणात चक्र चालू असल्याने पिढयानपिढया या बागा उभ्या आहेत. त्यामध्ये सुपारीबरोबर नारळ, फणस, आंबा, चिकू, पेरु, लिंबू, कोकम, केळी, अननस, अळू, सोनचाफा, फुलझाडे इ. झाडांची देखील लागवड केलेली असते. जेणेकरुन वार्षिक गरजा काही प्रमाणात भागविता येतात. रोपनिर्मितीवर भर द्या
निसर्ग वादळामुळे श्रीवर्धनी जातीच्या रोपांची लागवडीसाठी उपलब्ध होण्याची समस्या निर्माण झाली आहे. सुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने श्रीवर्धिनी जातीच्या क्षेत्रात इतर जातीच्या सुपारीची लागवड करुन चालणार नाही. अशी मिश्र लागवड झाली तर भविष्यात सुपारीच्या प्रतीवर परिणाम होवून बाजारपेठेत दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीवर्धनी ही जात टिकून रहाणे गरजेचे आहे. सुपारीचे रोप लागवडीसाठी एक ते दिड वर्षाचे असणे आवश्यक आहे. सुपारी काढणीचा हंगाम ऑक्टोबर ते मार्च असा असतो. त्यामुळे या कालावधीत उपलब्ध होणारे बियाण्याची लागवड वाफ्यांवर करुन ती जून पर्यंत दोन पानांची होतात. परत त्यांना योग्य अंतरावर रोपवाटिकेत लावली जातात. आता पॉलिथिनच्या पिशवीत भरुन रोपे वाढविली जातात जेणेकरुन वाहतूकीस फायदेशीर ठरते.वादळातून शिल्लक राहिलेल्या श्रीवर्धनी झाडांमधून चांगले उत्पन्न देणाऱ्या मातृवृक्षांची निवड करावी. त्यापासून येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर पासून मिळणाऱ्या सुपाऱ्यांची बियाण्यासाठी निवड करुन त्यापासून रोपांची निर्मिती करावी.जेणेकरुन श्रीवर्धनी सुपारीची प्रत आणि महत्व टिकून राहील आणि त्याचा फायदा या पिढीबरोबर पुढील पिढीला देखील करुन देता येईल. नवीन सुपारीच्या बागा उभारताना लागवडीसाठीचे योग्य अंतर ठेवावे. सुपारीच्या श्रीवर्धनी जातीचा विचार करावा. कोकणातील श्रीवर्धन तालुक्यात होणारी सुपारी ही श्रीवर्धनी (श्रीवर्धन रोठा) म्हणून प्रसिध्द आहे. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने ‘श्रीवर्धन रोठा’ या स्थानिक वाणातून ‘श्रीवर्धनी’ ही जात निवड पध्दतीने विकसित केली आहे. सुपारी मोठ्या आकाराची असून, पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त आहे. सुपारी मऊ असून चवीला गोड आहे. साखरेचे प्रमाण २.४५ ते ३.५९ टक्के आहे. या सुपारीचे आकारमान, मऊपणा आणि गोडी यामुळे तिला मोठी मागणी असून मुंबई तसेच देशभरातील शहरात चांगला दर मिळतो. त्यामध्ये श्रीवर्धन मधील दिवेआगर सुपारीला सर्वात चांगला दर मिळतो. त्याची प्रतही उत्तम आहे.बागायदार सुपारी काढणी नंतर वाळविण्यापूर्वी त्याच्या सालीवरील पातळ पापुद्रा तीन ठिकाणी विळीच्या सहाय्याने काढतात. त्याला सुपारी ‘फाळसटणे’ म्हटले जाते. वाळविल्यानंतर अशी सुपारी किलोच्या / मणाच्या भावाने विकली जाते. काही ठिकाणी काढणीनंतर नगावर विकली जाते.व्यापारी वाळलेली सुपारी बागायतदारांकडून खरेदी करून सोलता. त्यानंतर ती चाळणीच्या सहाय्याने चाळली जावून त्याच्या चार प्रती काढल्या जातात. त्यामधून चांगली आणि खराब सुपारी वेगळी केली जाते. अशी सुपारी ८ प्रतीमध्ये विकली जाते. त्यामध्ये मोहरा, मोती, वचरास आणि झीनी हे चार प्रकार चांगल्या प्रतीच्या सुपारीचे आहेत. तर पुढील चार प्रकार म्हणजे मोहरा फटोर नं.१, बारीक फटोर नं.१, बारीक फटोर नं.२ आणि खोका हे दुय्यम प्रतीचे आहेत. परंतु उत्तम प्रतीच्या सुपारीची प्रत ही चांगली असते.बाजापेठेत श्रीवर्धनी सुपारीला चांगली किंमत मिळत आहे. तसेच सुपारी संशोधन केंद्र, विठ्ठल येथील तज्ज्ञांनी काही वर्षापूर्वी रत्नागिरी आणि रायगड भागातील सुपारीचे सर्वेक्षण करुन काही चांगल्या प्रकारचे सुपारी बियाणे नेऊन त्याची लागवड केली होती.त्याचा अभ्यास करुन श्रीवर्धनी सुपारीचे उत्पादन आणि प्रत चांगली असल्याचे त्यांना आढळून आल्याने त्यांनी शिरीमंगला या नावाने कर्नाटक आणि कोकणात लागवडीसाठी प्रसारित केली. या जातीचे उत्पादन हे त्यांनी अगोदर प्रसारित केलेल्या मंगला, सुमंगला, श्रीमंगला पेक्षा अधिक असल्याचे देखील आढळून आले आहे. - डॉ.दिलीप नागवेकर,९४२११३७७६९,
(माजी कृषि विद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये,जि.रत्नागिरी)