पाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता, काही काळ थांबेल आणि त्यामुळे ते जमिनीत जिरून भूजल साठा वाढेल यासाठी आहे. हा काही साठवणीचा तलाव नव्हे, हे लक्षात घ्यावे. पाझर तलाव हा जर गावाच्या वरच्या बाजूला असेल, तर पडणाऱ्या पावसाचे पाणी या पाझर तलावात काही काळ थांबेल आणि जमिनीत मुरून हळूहळू खाली येईल.
मागच्या लेखात आपण प्राचीन जलस्रोत असलेल्या झऱ्यांचा उपयोग जलसंधारण करायला कसा करता येतो याबद्दल माहिती घेतली. हे झरे पुढे उताराने वाहायला लागतात आणि त्यांचे रुपांतर ओढ्यांमध्ये होते. जसे झरे डोंगरात साठवलेले पाणी एका मर्यादेनंतर पुढे जाऊ देतात, तसंच त्या त्या भागातील जमीनदेखील पाणी शोषून घेते, साठवून ठेवते आणि पुढे उताराने जाऊ देते. हेच पाणी सर्व परिसरातून जमिनीत मुरते. तिथे असलेल्या मातीच्या गुणधर्मानुसार पाणी पुढे जाऊ देते. जलसंधारण करताना सध्या लोकप्रिय असलेला आणि तुलनेने सोपा असणारा उपाय आहे पाझर तलाव. अनेक ठिकाणी जलसंधारण करताना त्या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला न घेता आपल्या मनाला पटेल अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत आहे. एकूणच पाणी आणि पर्यावरण क्षेत्रात काही अभ्यास करायची गरज आहे हेच खूप लोकांच्या जाणीवेत नाही. केवळ कोणीतरी कुठेतरी सांगते म्हणून, किंवा कुठेतरी वाचून फारसा विचार किंवा अभ्यास न करता कामे केली जात आहेत. त्याचे दुष्परिणामही बघायला मिळत आहेत. हे अगदी पाझर तलावासारख्या तुलनेने सोप्या उपायातही बघायला मिळते.
पाझर तलाव कुठे करावा याबद्दलही अनेक ठिकाणी गैरसमज आढळतात. पाणलोट क्षेत्र विकास करताना त्यातील प्रत्येक उपाय हा स्थलानुरूप असायला हवा ही प्राथमिक माहिती अनेक लोकांना नसते, ही सध्याची परिस्थिती आहे. मला आलेल्या एका अनुभवाबद्दल सांगतो, म्हणजे सध्याची बहुसंख्य कामे काय विचार करून केली जातात हे लक्षात येईल. एका संस्थेने घेतलेल्या जलसंधारण स्पर्धेत एका गावात एक पाझर तलाव खोदला गेला. पाझर तलाव झाला, त्यात पाणी साठले. पण ते पाणी काही जमिनीत मुरेना. पाणी गावापासून उंचावर, लांब अडवलं होतं, त्यामुळे गावाला काहीच उपयोग होत नव्हता. गंमत तर पुढे आहे. या पाझर तलावाच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला लोकांनी विहीर खणली, तर चाळीस फुटांपर्यंत पाणी लागत नाही ही समस्या घेऊन त्या गावात काम करणारी संस्था माझ्याकडे आली होती. मी त्यांना विचारलं, कोणत्या तज्ज्ञाने पाझर तलावाची जागा निवडली त्याला आधी विचारा, कारण त्याने काही विचार करून हा उपाय आणि ती जागा निवडली असेल. त्यावर उत्तर आले की, हे गावातल्या लोकांनीच ठरवलंय. आम्ही इंटरनेटवर काही शोध घेतला आणि काही कृषी अधिकाऱ्यांशी बोललो आणि हा निर्णय घेतला. विहिरीचा निर्णय लोकांनी घेतला आणि त्याचे सोपे कारण म्हणजे त्या जमीन मालकाने तिथे विहीर करायला परवानगी दिली.
कोणत्याही तांत्रिक अभ्यासकाने अस्वस्थ व्हावे अशी मानसिकता समाजात रुजली आहे. जल निरक्षरता इतकी वाढली आणि रुजली आहे की, पाणी या विषयात काही अभ्यासाची गरज आहे, आपल्याला वाटतंय की आपल्याला कळतंय, पण तो गैरसमज आहे. योग्य तज्ज्ञाला काम करायच्या आधी विचारायची गरज आहे, हीच जाणीव सध्या हरवली आहे. केवळ तुमचं ध्येय किंवा हेतू चांगला असून पुरत नाही, तर त्या विषयातील योग्य तांत्रिक ज्ञान तुमच्याकडे आहे का हेही खूप महत्त्वाचं ठरते. नुसते जमिनीला छिद्र पाडून पाणी मिळतंच असं नाही. जिथे भूगर्भात पाणीसाठा होऊ शकतो तिथे जमिनीला छिद्र पाडले तर पाणी मिळते, ही बाब बहुसंख्य लोकांच्या कल्पनेबाहेर आहे.
पाझर तलावाची निर्मिती
- डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०
(लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.