नवीन फुटींवर तांबेरा रोगाची शक्यता, दुर्लक्ष नको
मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी अधूनमधून चांगल्या पावसाच्या सरी मिळाल्या. येत्या आठवड्यातही पावसाच्या सरी अधूनमधून मिळत राहतील. कोकणपट्टीच्या जवळपासचा भाग म्हणजेच नाशिकचा पश्चिमेचा भाग. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर भाग येथे शुक्रवार ते रविवार (ता. २७ ते २९) बऱ्यापैकी पाऊस होईल. नाशिक, पुणे, नगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर अशा सर्व द्राक्ष विभागामध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोकणपट्टीच्या जवळपासचा भाग वगळता अन्य ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे. अशा पावसामध्ये नवीन फुटी जास्त प्रमाणात येतात. या नवीन फुटींवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी थायोफिनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर या बुरशीनाशकांची (टॅंक मिक्स) फवारणी घ्यावी.
वाळवा, गोळेगाव, बोरी या विभागामध्ये शरद सीडलेस व त्याचे क्लोन्स (जंबो, नाना पर्पल इ.) यांची लागवड जास्त प्रमाणात आहे. या जातीच्या द्राक्षबागेमध्ये सध्याच्या वातावरणामध्ये तांबेरा वाढण्याची शक्यता असते. ताम्रयुक्त बुरशीनाशकाच्या फवारण्या झाल्या असल्यास तांबेरा रोग सहजासहजी वाढत नाही, परंतु ताम्रयुक्त बुरशीनाशकांची फवारणी झाल्यानंतर आलेल्या फुटींवर तो वेगाने वाढू शकतो. वर नमूद केल्याप्रमाणे थायोफिनेट मिथाईल अधिक मॅन्कोझेब ही फवारणी घेतल्यास तांबेरा रोगाचासुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकेल. ज्या ठिकाणी तांबेरा जास्त प्रमाणात वाढलेला असेल, अशा ठिकाणी वरील फवारणीनंतर तीन ते चार दिवसांच्या अंतराने ट्राय अझोल वर्गातील टेब्युकोनॅझोल (२५ ईसी) ०.५ मिलि प्रतिलिटर किंवा फ्लुसीलॅझोल (४० ईसी) २५ मिलि प्रति २०० लिटर पाणी या बुरशीनाशकाची फवारणी करावी. असे केल्याने तांबेरा संपू्र्णपणे नियंत्रणात येईल.नवीन बागेच्या लागवडीसाठी बागेमध्ये खुंटाची झाडे लावलेली असतात. या खुंटाच्या झाडांवर तांबेरा लवकर येतो आणि वेगाने वाढतो. खुंटावर ऑगस्ट महिन्यामध्ये कलम बांधले जाते. त्या वेळी त्याची सर्व पाने व अन्य फुटी काढल्या जातात. या कारणाने खुंटाच्या झाडावर सर्वसाधारणपणे बुरशीनाशकांचा वापर होत नाही. परिणामी, खुंटाच्या पानावर तांबेरा वेगाने वाढतो. हा रोग खुंटाचे जास्त नुकसान करत नाही, परंतु जवळपासच्या बागेमध्ये तांबेरा रोगाच्या प्रसारासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरतो. तांबेरा आलेल्या बागेमध्ये रोगनियंत्रित केल्यानंतर सुद्धा लवकर पानगळ होऊन थांबलेल्या शेंड्यावर फुटी फुटण्यास सुरवात होते. काडीमध्ये चांगल्या प्रकारे अन्नसाठा होत नाहीच. त्या बरोबरच नवीन फुटींमुळे कमी अधिक झालेल्या अन्नसाठाही कमी होतो. परिणामी, त्यावरील काड्या व त्यानंतर तयार होणारा घडसुद्धा कमकुवत होतो. म्हणूनच तांबेरा रोगाकडे दुर्लक्ष करू नका. त्याचे वेळीच नियंत्रण करावे. जवळपासच्या खुंटावरील बागेमध्येही तांबेरा वाढू देऊ नका. खुंटावर अर्धा टक्के बोर्डो मिश्रण फवारल्यास तांबेरा नियंत्रणात राहील.मागील आठवड्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ढगाळ वातावणामध्ये भुरी वेगाने वाढू शकते. त्याच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करून घ्यावी. ज्या विभागामध्ये रिमझिम पाऊस होत असेल, तिथे पावसामुळे आर्द्रता वाढते. ढगाळ वातावरणामुळे दुपारचे तापमानसुद्धा २० -२५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात नाही. अशा परिस्थितीमध्ये जैविक नियंत्रणासाठी अॅम्पीलोमायसिस ५ मिलि किंवा ट्रायकोडर्मा ५ मिलि किंवा बॅसिलस सबटिलिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात फवारल्यास भुरीचे चांगले नियंत्रण मिळू शकते. ज्या ठिकाणी सल्फर वापरलेले आहे, अशा ठिकाणी जैविक नियंत्रणासाठी वरील घटकांचा वापर शक्य आहे. ज्या ठिकाणी जैविक नियंत्रण केले असेल, अशा जातीतील ट्राय अझोल वर्गातील बुरशीनाशकांचा वापर कटाक्षाने टाळावा. कारण त्यामुळे जैविक नियंत्रणाच्या बुरशी कार्यरत राहणार नाहीत.