ॲग्रोवन वृत्तसेवा
Yavatmal News : यवतमाळ : जिल्ह्याला बुधवारी (ता. २२) वादळ वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. मारेगाव, झरी तालुक्यांतील ४६ घरांची पडझड झाली. वीज पडून आठ जनावरे दगावली. वादळासह झालेल्या पावसाने झरी तालुक्यातील मूग पिकाचे मोठ नुकसान झाले. गाझीपूर येथील केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारी (ता. २२) वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने अचानक हजेरी लावली. सायंकाळी आलेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दाणादाण उडाली. वादळी वाऱ्याने घरांचे तसेच शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे झरी तालुक्यात घरांची पडझड झाली. अडीच हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले.
पूर्वमोसमी पावसाने या महिन्यात जिल्ह्यात मुक्कामच ठोकला आहे. वादळी वाऱ्यासह दररोज जिल्ह्यातील कोणत्यातरी भागात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांवर संक्रांत आली आहे. वाऱ्यामुळे सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. संत्रा, मोसंबी, आंबा, केळी, पपई आदी पिकांच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
यवतमाळ शहर, दारव्हा तसेच इतर तालुक्यांत झाडे पडली. दिवसभर उकाडा व रात्री पावसाच्या धारा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात जवळपास तीन ते चार दिवस पावसाने हजेरी लावली. पावसासोबत वादळी वाऱ्यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढले आहे. रब्बी हंगामातील शेतपिकांसह उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. पंचनाम्यानंतर नुकसानीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.
केळी बागांना फटका
वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याने गाझीपूर येथील केळी बागेतील झाडे पूर्णपणे भुईसपाट झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक तसेच कृषी विभागाच्या पथकाने नुकसानाची पाहणी केली. बाग उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.