Kolhapur News : ‘‘वन्यप्राण्यांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासकीय यंत्रणा दाद देत नाही. प्रतिगुंठ्याला पाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे,’’ असे आवाहन शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केले.
वन्यप्राण्यांकडून सध्या तालुक्यात ऊस, रताळी, मका यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विचार करण्यासाठी सोमवारी (ता. ११) येथे शेतकऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी श्री. पाटील बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘आज वन्यप्राण्यांनी शेतात धुमाकूळ घातला आहे. उद्या ते दारात आणि घरातही येतील. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या महिन्यातच शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर काढणार आहोत.’’
कृष्णा पाटील म्हणाले, ‘‘आंबर्डेतील शेतकरी, वन समिती किंवा ग्रामपंचायत यांना कोणालाही विश्वासात न घेता वन विभागाने मनमानी सर्वे करून वन हद्दीचे बुरूज उभारले आहेत. वन विभाग दडपशाही करत आहे.’’ श्यामराव पाटील म्हणाले, ‘‘माझ्या एक एकर शेताचे नुकसान वन्यप्राण्यांनी केले आहे.
त्याबाबत वन विभागात तक्रार देण्यासाठी गेलो असता तुम्ही ऊस शेती करू नका, अशी उद्धट उत्तरे वनाधिकारी देत आहेत. एक एकरऐवजी केवळ दहा गुंठ्यांचाच पंचनामा केला. हा कोणता न्याय?’’ माणचे सरपंच संजय पाटील म्हणाले, ‘‘पिकांच्या नुकसानीमुळे चारी बाजूंनी शेतकरी अडचणीत आहे. कोणतेच पीक वन्यप्राणी ठेवत नाहीत, मग आता आम्ही काय गांजाची शेती करावी का?’’
या वेळी अनेक गावांच्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या, शेतीचे नुकसान याबाबत तीव्र शब्दात आपले मत मांडले. बैठकीस प्रकाश काळे, शिवाजी भोसले, विक्रम केसरे, लक्ष्मण पाटील, दिलीप बसरे, तानाजी पाटील, विकास चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.