Soil
Soil Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : मातीचे आरोग्य का जपले पाहिजे?

डॉ. निलेश हेडा

जमिनीची धूप थांबवा, आपले भवितव्य सांभाळा’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन जगभर जनजागृती मोहीम राबविली जाताना दिसते. अर्थात जमिनीची धूप (Soil Erosion), मातीचं आरोग्य (Soil Health) हा सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न ठरू शकतो म्हणूनच अशा बऱ्याच मोहिमा राबविलेल्या दिसतात. पण या मोहिमांना यश मिळताना दिसतं का? हा खरं तर गहन अभ्यासाचा विषय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का जगभरातल्या अनेक संस्कृत्या जशा मातीमूळ समृद्ध झाल्या अगदी तशाच मातीच आरोग्य न जपल्यामूळ मातीत गेल्या. होय.

तर सुरुवात करू नाईल नदीपासून. नाईल ही जगातली सर्वात लांब नदी. टांझानिया, युगांडा, रवांडा, रिपब्लिक ऑफ कोंगो, केनिया, इथियोपीया, एरित्रिया, दक्षिण सुदान, सुदान आणि इजिप्त मधून वाहत जाऊन शेवटी ही नदी भुमध्य समुद्रात विलीन होते.

नाईल नदी व्हाईट नाईल व ब्लु नाईल या दोन विशाल नद्यांनी बनते. ब्लु नाईल जिथुन वाहते तो इथियोपीयाच्या जंगलांचा व कुरणांचा प्रदेश आहे. हजारो वर्षांपासुन पशुपालक आपली जनावर या प्रदेशात चारतात. गवत चांगलं उगवावं म्हणून या पशुपालकांनी झाडाझुडपांना आगी लावल्या. त्यातुन मोठ्या प्रमाणावर जंगलांचा ऱ्हास झाला. माती उघडी पडली. पावसाच्या पाण्यासोबत नाईल मध्ये गेली.

इथियोपीयन पशुपालकांनी आपली कुरणं गमावली. मात्र इजिप्तला नाईलमुळे भरपुर प्रमाणात सुपीक गाळाची माती मिळाली. इजिप्त मध्ये शेतीचा फार मोठा विकास झाला. अशीच सभ्यता विकसित झाली टिग्रिस, युफ्रॅटस नदीच्या, सिंधू आणि चिन मधल्या यलो आणि यांगत्से नदीच्या खोऱ्यात. थोडक्यात सुपीक माती ही सभ्यता विकसीत करते.

टिग्रिस आणि युफ्रॅटस ह्या दोन नद्यांचं खोरं हे पश्चिम आशियातलं एक महत्वाचं खोरं समजलं जातं. पुर्व तुर्कस्थानात उगम पावणाऱ्या ह्या दोन्ही नद्या इराक आणि सिरीया मधून वाहत जाऊन पर्शियाच्या आखातात विलीन होतात. या नद्यांच्या खोऱ्यात सुमारे ५००० वर्षांआधी मिसोपोटेमीयाची संस्कृती बहरली. या संस्कृतीने मानवाला चाकाचा शोध दिला, धान्य पिकवण्याचं ज्ञान दिलं आणि सोबतच गणीत, लेखन कला, ग्रह नक्षत्रांच्या ज्ञानात सुद्धा प्रचंड भर पाडली.

बायबल मध्ये सांगितलेली "गार्डन ऑफ एडेन" ही बाग ह्याच मुलखात वसलेली होती. गार्डन ऑफ एडेन हा असा बगीचा आहे जिथे सुपीक माती आहे, भरपुर पाणी आहे. मिसोपोटेमीयातल्या लोकांनी चक्क सात हजार वर्षांआधीचं सिंचनाचा शोध लावला होता. पण आजचा इराक आणि सिरीयाचा ओसाड भकास वाळवंट झालेला प्रदेश बघीतला तर कधी तरी गार्डन ऑफ एडेन खरचं होतं काय असा प्रश्न पडतो. अशा वाळवंटीकरणाचं मुख्य कारण काय असावं?

मिसोपोटेमीया कोसळण्यामध्ये इतर अनेक पर्यावरणीय कारणांसोबतच मुख्य प्रश्न होता मातीच्या खारवटण्याचा. टिग्रीस आणि युफ्रॅटसनद्यांमुळे मोठ्या प्रमाणावर सिंचन झालं. परिणामत: जमीनीत क्षारांचं प्रमाण अतोनात वाढलं. सोबतच शेतातील पाणी बाष्पीभवन होण्याच्या प्रक्रियेत जमीनीतल्या खोलवर भागातले क्षार सुद्धावर आले. उत्पादन घटलं आणि इससन पुर्व २३०० च्या आसपास शेतीची अर्थ व्यवस्था पुर्णत: मोडून पडली. म्हणजे ज्या सिंचनाच्या तंत्राने मिसोपोटेमीयाची शेती आपल्या चरम सिमेवर नेली त्याच सिंचनाच्या तंत्राने त्याचा घात सुद्धा केला!

आता बघू आपल्या सिंधूच्या खोऱ्याच उदाहरण.

तिबेटच्या पठारावर मानसरोवर जवळ सिंधू नदी उगम पावते. सुमारे ५००० वर्ष ते ३००० हजार या दोन हजार वर्षांच्या कालावधीत सिंधूच्या खोऱ्यात सिंधू संस्कृती बहरली. सिंधू संस्कृती पाकिस्तानपासुन उत्तरप्रदेशपर्यंत, तर अफगानिस्तानपासून महाराष्ट्रापर्यंत पसरलेली होती. तिच्या उत्कर्षाच्या काळात तिची लोकसंख्या 50 लाख असावी.

पण या संस्कृतीचा ऱ्हास झाला तो मानवी हस्तक्षेपामुळं. खंडाच्या सरकण्याने, हिमालयाच्या वाढीमुळे आणि सिंधू नदी मध्ये झालेल्या मानवनिर्मित बदलामुळे सिंधू आणि इतर नद्यांनी आपले मार्ग बदलवले. परिणामी नदीत प्रचंड गाळ साचला. सिंधू नदीच पात्र कीतीतरी फुटाने वर उचललं गेलं. यामुळे सातत्याने पूर यायला लागला. आणि अतिशय उन्नत अशी सिंधू संस्कृती लयाला गेली.

अमेरिकेच्या अंदेस प्रांतातील मुळ निवासी हजारो वर्षांपर्यंत मातीला आई मानत होते. शेती हाच त्यांचा मुळ धर्म होता. मात्र ख्रिस्त धर्माच्या आक्रमनानंतर धर्म बदलला आणि मातीचं अतोनात नुकसान झालं. तसचं काहीसं उत्तर अमेरीकेतील मुळ निवास्यांच्या बाबतीत बघायला मिळतं. जमीन विकणे, विकत घेणे किंवा जमीनीचा अनादर करणे हे त्यांच्याकरीता पाप होतं. मात्र युरोपीयन आले आणि श्रद्धांचं स्वरुप बदललं आणि मातीचं नुकसान झालं.

जगाचं पाहिलं तसं आता आपल्या महाराष्ट्राच आपल्या घरचं उदाहरण बघू. पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने नद्यांना पूर येतो त्यामागे मानवनिर्मित कारण आहेत. नदी नाल्याचं पात्र उथळ झाल्यान आसपासच्या शेतीला पुराचा धोका वाढलाय. शेती खरवडून जाण्याचं प्रमाण वाढतय. आपण नद्यांवर धरण बांधलीत. नदीपात्रात शेती वाढवली, अतिक्रमण झाली. नद्यांचे प्रवाह बदलले, नदीची पात्र लहान केलीत. साहजिकच नदीचं पाणी गावाशहरांमध्ये शिरलं.

त्यात आणि वाढत चाललेलं तापमान, चुकिचे पिक नियोजन, रासायणीक खतांचा बेबंद वापर आणि जमीनीची वाढत चाललेली धुप ही कारणंही या मागे आहेत.

त्यामुळे भारतीय शेती व्यवस्था आणि त्या शेती व्यवस्थेशी जुळलेली अन्न सुरक्षा अबाधीत राखण्यासाठी मातीच्या आरोग्याला प्रथम प्राधाण्य देणे अत्यावश्यक आहे. तेवढा एक धडा जरी आपल्या आधीच्या मानवी सभ्यतांकडून आपण घेतला तरी पुरेसा आहे.

-----

(लेखक इकॉलॉजी व जैवविविधतेचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT