Onion Fertilizer Use : सुधारित जातींच्या बियाण्यांच्या अभाव, संतुलित खत व्यवस्थापनाचा अभाव, पीकवाढीच्या महत्त्वाच्या काळात पाण्याचा तुटवडा,कीड,रोगांमुळे होणारे नुकसान आणि सुधारित लागवड तंत्राचा कमी वापर या कारणांमुळे कांद्याच्या उत्पादकता कमी झाली आहे.
उत्पादनातील समस्या ः
१) एकसमान आकाराचे कांदे कमी तर चिंगळी कांद्याचे प्रमाण जास्त. यामुळे चांगला बाजारभाव मिळत नाही.
२) जोड कांदा, डेंगळा कांद्याचे जास्त प्रमाण.
३) साठवणुकीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. त्यामुळे कांदा साठवणुकीत सुद्धा कमी काळ टिकतो. साठवणुकीत २०ते ४० टक्के नुकसान.
४) उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये घट.
कांद्याच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी कांद्याचे संतुलित पोषण व्यवस्थापनाबरोबरच सुधारित लागवड तंत्राचा वापर महत्त्वाचा आहे. योग्यवेळी शिफारशीत जातींची योग्य अंतरावर लागवड, योग्यवेळी तण व्यवस्थापन, पीकवाढीच्या महत्त्वाच्या काळात पाण्याचा योग्य वापर, वेळेवर कीड आणि रोग व्यवस्थापन केल्यास दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येते. संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पोषक घटकांचा योग्य स्रोत, योग्य मात्रा, वापराचे योग्य ठिकाण आणि घटकांचा पुरवठ्यासाठी पिकाच्या वाढीचा योग्य टप्पा लक्षात घ्यावा.
असंतुलित पोषणाचे दुष्परिणाम:
कांदा पिकास खते देताना शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा माहिती नसल्याने अंमलबजावणी होत नाही. विविध अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार होत नाही. अन्नद्रव्यांचे एकसारखे मिश्रण होत नाही आणि हेच मिश्रण पिकास दिल्यावर ते पिकाच्या मुळाजवळ एकसारखे पडत नाही. पोषणतत्त्वांच्या असमान वाटपामुळे पिकाचे संतुलित आणि संपूर्ण पोषण व्यवस्थापन होत नाही. परिणामी उत्पादन घटते. साठवणुकीत कांद्याचे मोठे नुकसान होते.तसेच जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. कार्यक्षम अन्नद्रव्यांचा अत्यल्प वापर होतो.
अन्नद्रव्यांचा योग्य वापर ः
१) सातत्याने पीक लागवड आणि मशागतीसाठी अशाश्वत पद्धतींच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा दिवसेंदिवस अतिशय तीव्रगतीने ऱ्हास होत आहे. सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची प्रक्रिया मंदावते. सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे जमिनीतील अन्नघटकांची उपलब्धता आणि पोषण कमी होते.
असंतुलित अन्नद्रव्यांच्या पोषणामुळे पिकाच्या उत्पन्नात घट येते, गुणवत्ता खालावते.
२) लागवड करताना खताचा बेसल डोस देण्यासाठी लागणारी खते योग्य वेळेवर आणि योग्य मात्रेत उपलब्ध करणे गरजेचे आहे. पिकाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये पिकाला चांगली मुळी फुटणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे पिकाचा जमिनीच्यावरील भागाचा विकास चांगला होतो. बेसल डोसमध्ये प्रामुख्याने पिकाच्या मुळांसाठी आवश्यक स्फुरद, नत्र, सूक्ष्म अन्नघटकांचा समावेश असतो. त्यामुळे पिकाची मुळे चांगली फुटतात. त्यामुळे अन्नघटकांचे पोषण चांगल्या प्रकारे होते. पिकाच्या जोमदारवाढीसाठी चांगली चालना मिळते. त्याचा चांगला परिणामी पिकाच्यापुढील वाढीच्या टप्प्यामध्ये होतो. पिकाची मुळे चांगली वाढलेली असतील तर रोपांची जोमदार वाढ होऊन कांद्याची चांगली वाढ होते.
३) बेसल डोस मातीत चांगला मिसळला पाहिजे. बेसल डोस हा लागवडीच्या वेळेस किंवा लागवड झाल्यानंतर जास्तीत जास्त १० ते १५ दिवसांनी दिला पाहिजे. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन त्याचा चांगला परिणाम म्हणून एकसमान आकाराचे कांदे मिळतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.