Mango Crop
Mango Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Orchard : आमराई गेली कुठे?

डॉ. निलेश हेडा

- डॉ. निलेश हेडा
आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलमभून्नारिकेलान्तरम ।
प्राय: कणकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम ।
आस्तैधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रताम ।
शामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ।।

अर्थः आंब्याची स्तुती ऐकून नारळाच्या काळजाचे पाणी पाणी झाले. फणसाच्या अंगावर काटा आला. काकडी दुभंगली. द्राक्षे संकोचाने खुजी झाली आणि जांभळे मत्सराने काळवंडली.
(सुभाषितरत्नभांडार, सहकारान्योक्तिं)

लहाणपणी उन्हाळ्याच्या सुटीत गावात आम्हा मुलांचा दुपारचा बहुतांश वेळ हा गावालगतच्या आमराईतच (Amrai) जायचा. कच्च्या कैऱ्या पाडणे, कोकिळेचा आवाज ऐकत बसणे, पाडावर आलेल्या आंब्यांचा शोध घेणे, डाबडुबीचा खेळ खेळणे आणि मध्ये-मध्ये आमराईच्या जवळूनच वाहणाऱ्या अरुणावतीच्या खोल डोहामध्ये मनसोक्त डुंबने हे आमचे आवडते उद्योग. आसपास जेव्हा उन्हाचा वणवा पेटलेला असायचा त्याही वेळी आमराईतल्या थंडगार वातावरणात आमचा उन्हाळा सुसह्य व्हायचा.

कैऱ्या उतरवणीयोग्य झाल्या की आजोबा आंबे उतरवण्याचा ठेका `उताऱ्याला` द्यायचे. आंबे उतरवणीचा दिवस मोठा लगबगीचा असायचा. मोठ्या बांबूच्या काठीवर जाळीच्या खुडी घेऊन उतारे आजोबांसोबत आमराईत यायचे. झाडावर चढण्यात निष्णात असणारे उतारे सरसर झाडावर चढायचे. खुडीने तोडलेले आंबे दोरीच्या `झेल्या`मधून खाली सोडले जायचे. कच्च्या आंब्यांचा मोठा ढीग लागायचा. शेवटी आंब्यांची वाटणी व्हायची. पैशाचा स्वरुपात उताऱ्यांना मोबदला देण्याची प्रथा नव्हती. मोबदला आंब्यांच्या स्वरुपातच दिल्या जायचा. आंबे मोजण्याच्या पारंपरिक एककात आंब्याची मोजदाद व्हायची. सहा आंब्यांचा एक फाडा. वीस फाड्यांमागे उताऱ्यांना एक फाडा मिळायचा. राखणदार जर असेल तर त्याला एकूण आंब्यांचा चवथा हिस्सा मिळायचा. एकाच आमराईत शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या अशा अनेक स्थानीक नावांच्या आंब्याच्या प्रजाती गुण्यागोविंदाने नांदायच्या. प्रत्येकाचे गुणधर्म, चव, आकार, उपयोग वेगवेगळे. आमट्या फक्त लोणच्या साठी तर शहद्या रसाळीसाठी, नारळी कच्चा खावा तर शेप्या नावडता!

उतरलेले आंबे बैलगाडीतुन घरी आले की एका वेगळ्या खोलीत भरपूर गवत घालून आजोबा `माच` घालायचे. आठ दिवसानंतर पिकलेले आंबे खायचा कार्यक्रम सुरु व्हायचा. मोठ्या बादली मध्ये भरपूर आंबे टाकून त्यांचा आस्वाद घेतल्या जायचा. सर्वांना उत्तर माहीत असुनही लहाणपणी एक कोडं आम्ही घालायचो, `इवलासा बाबू, गवतात दाबू.` सर्वजण ओरडायचे `आंबा!` दररोज रसाळी व्हायची. उरलेल्या कोया गोळा करणे, वाळवणे आणि फोडून विकण्यातून आम्हा मुलांचा खाऊचा खर्च भागायचा. एका वर्षी तर विकलेल्या कोयांमधून शाळेची सर्व पुस्तकं घेतल्याचेही आठवते. कोयांचे पैसे हातात पडले की म्हणायचो, “आम तो आम, गुठली के दाम”. विकलेल्या कोयांचं काय होते, असा मोठा प्रश्न आम्हाला पडायचा. कोणी म्हणायचं की साबण बनवण्यासाठी कोयांचा उपयोग होतो, तर कोणी म्हणायचं की कोयांपासून तेल काढतात!

पाऊस पडण्याच्याआधी लोणच्यासाठीचा आंबा उतरवल्या जायचा. फ्रिजची सोय नसल्याने पाऊस पडून गारवा निर्माण झाला की लोणचे घालण्याचा कार्यक्रम पार पडायचा. घराघरातून मसाल्यांचा घमघमाट यायचा. प्रत्येक घरच्या लोणच्याची चव वेगळी असायची. शाळेत न्यायच्या डब्यांमध्ये अशी लोणच्यांची विविधता चाखण्यासारखी असायची.
 

बऱ्याच वर्षानंतर गावाकडे जाणं झालं. आजोबा कधीचेच आमराई सोडून गेले होते. जिथे आधी आमराई होती तिथेच त्यांच्या अस्थी ठेऊन एक चबुतरा बनवला आहे. आता आमराई नव्हती. अरुणावतीचा डोह गाळाने भरला होता. आंबा नसल्याने कोकीळेचा आर्त स्वरही नव्हता. आजोबा जाणे, आमराई जाणे, नदीचा डोह जाणे, कोकीळेचा स्वर जाणे यात काही परस्परसंगती आहे काय हे शोधण्याचा प्रयत्न माझ्यातला अभ्यासक करत होता. त्यावेळी दोन ओळींची एक झेन कथा आठवली: एका जंगलातून शेवटचा वाघ संपला आणि जंगलातून वाहणारी एक नदी कोरडी झाली... एवढीच ती कथा. आजच्या आपल्या परिस्थितीकी शास्त्राची (इकॉलॉजी) साक्ष काढली तर ही कथा खरी ठरते. या गोष्टीतले सूत्र आमराईलाही लागू पडते.

विषन्न मनाने आजोबाच्या समाधीजवळ बसलो. उण्यापुऱ्या २०-२५ वर्षांमध्ये तथाकथीत विकासाचा बराच मोठा टप्पा गाठल्या गेला होता. आमराई संपली होती. विदर्भातला शेतकरी कर्जामध्ये आकंठ बुडाला, किटकनाशके- रासायनिक खतांचा अवाजवी खर्च भागेना तेव्हा त्याने सर्वप्रथम शेतातली, धुऱ्यावरची आंब्याची झाडे तोडून विकण्याचा डोळ्यात पाणी आणनारा निर्णय घेतला. मातीत आधीसारखी ओल टिकत नाही म्हणूनसुद्धा अनेक आंब्यांची झाडे आपसुकच वाळली. गेल्या काही वर्षात माकडांचा त्रास अतोनात वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांपासून दूर व्हायला सुरुवात केली. बाजार प्रत्येक ठिकाणी आपला रंग दाखवतो. स्वस्तात मिळणारी, बाहेरुन येणारी, रसायनांनी पिकवलेली कलमी, बदाम आंब्यांनी गावरान आंब्याचा गोडवा नष्ट केला. बाजारात नेलेला गावरान आंबा बेभाव घेण्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे शेतकरी निरुत्साहीत, हतोहत्साहित झाला. आंब्याला जेव्हा बार नसतो तेव्हा भाव भरपूर, जेव्हा बार भरपूर तेव्हा भाव नाही अशा दुष्टचक्राने शेतकरी नागवला गेला. एकेकाळी रस्त्याच्या कडेने दुतर्फा असणारी आंब्याची जुणीजाणती झाडं रस्त्याच्या रुंदीकरणात कापल्या गेली. एकूणच काय तर मातीशी इमान असणारी जुनी माणसे माती आड गेल्याने, पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास झाल्याने आणि बाजाराच्या बदललेल्या स्वभावाने आमराई नष्ट झाली...

हराळचा दुर्मिळ आंबा
काही दिवसांआधी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या हराळ ह्या गावात होतो. गावातील नरवाडे नावाच्या शेतकऱ्याने दोन्ही हातातही मावनार नाही एवढा मोठा एक आंबा आणून दिला. अशी आंब्याची जात पूर्वी कधीही बघितली नव्हती. असा गोडवाही कधीच चाखला नव्हता. त्या प्रकारचं ते गावात एकमेव झाड होतं. अशा आंब्याच्या जातीची दखल घेण्याची सुबूद्धी सरकारच्या कृषी विभागाला, कृषी विद्यापीठांना होऊ नये याचे आश्चर्य आहे. विदर्भातील विविध आंब्यांच्या जातींची साधी चेक लिस्ट, त्यांचा आढळ यांची माहिती जमवल्याचे मला माहीत नाही. परवा एका गावाला तंटामुक्तीचा दोन लाख रुपयांचा धनादेश मिळाला. आलेल्या पैशातून मोठं प्रवेशद्वार निर्माण करायचं नियोजन सुरु झालं. त्यावर माझा एक पर्यावरणप्रेमी मित्र म्हणाला, ``गावच्या इ क्लास जमिनीवर गावरान आंब्यांची आमराई उभारुया. दरवर्षी गावाला उत्पन्नही मिळेल आणि आमराईच्या पुननिर्माणाच्या दिशेने एक पाऊल टाकल्या जाईल.`` ज्या प्रमाणे आजकाल नक्षत्रवन, स्मृतीवन या संकल्पना रूजत आहेत, तशीच वाटचाल आमराईच्या बाबतीतही व्हायला हवी.

हराळ गावात जो दूर्मिळ आंबा आहे, त्या प्रकारच्या जातीची कलमे करुन त्याला संरक्षीत करता येईल. गावोगावची ही दुर्मिळ संपत्ती जपणे आणि तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ही बाब केवळ एक नष्ट होऊ घातलेली वनस्पतीची जात जगविण्यापुरती मर्यादीत नाही तर संस्कृतीचा तो एक अमूल्य ठेवा आहे, या दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे. रोजच्या जगण्याशी, जीवनक्रमाशी, उपजीविकेशीही त्याचा जवळचा संबंध असतो. जुन्या पर्यावरणीय गोष्टी नष्ट होता कामा नयेत, ही जाणीव खोलवर रूजली पाहिजे. या जुन्या गोष्टींचं एक सांस्कृतिक, पर्यावरणीय महत्त्व आहे अशी मानसिकता बनली पाहिजे. त्याशिवाय या गोष्टींचं महत्त्व पटणार नाही आणि पर्यावरणसंवर्धनाचं हे कार्य तडीस जाणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT