Modi vs Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Politics : मोदींचा खरा चेहरा कोणता?

Article by Vikas Zade : एकीकडे शरद पवारांना गुरुस्थानी मानायचे आणि दुसरीकडे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याचे काम नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते करत आहेत. कृषिमंत्री म्हणून काय कामगिरी बजावली, असे विचारत आहेत.

विकास झाडे

विकास झाडे

Politics Update : ‘‘शरद पवार हे माझे राजकीय गुरू आहेत. त्यांनी कृषी क्षेत्रात उत्तम काम केले. त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवले. पाच दशकांपेक्षा अधिक राजकीय अनुभव असलेल्या पवारांचे मी मार्गदर्शन घेत असतो. देशासमोरच्या प्रश्‍नांवर आम्ही चर्चा करतो. महिन्यातून किमान दोन-तीनदा तरी मी त्यांच्याशी बोलतो,’’ हे विधान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे.

संसदेत असो वा सार्वजनिक कार्यक्रमात मोदी शरद पवारांचे कौतुक करताना दिसले. परंतु हेच मोदी अलीकडे, ‘‘पवारांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केले. अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री असून शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले?’’, असा प्रश्‍न करतात. तेव्हा मोदींचा खरा चेहरा कोणता? हा प्रश्‍न पडतो. चारशेपार म्हणणाऱ्या मोदींना ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’च्या (सीएसडीएस) निवडणूकपूर्व सर्वेक्षणाने धक्का दिला आहे.

गेल्या दहा वर्षांत मोदींनी देशात काहीच केले नाही, असे अजिबात म्हणता येणार नाही. ‘उज्ज्वला’, ‘जनधन’, ‘डिजिटल इंडिया’ ‘मेक इन इंडिया’ अशा अनेकविध कल्याणकारी योजना, ओबीसी आयोगाची स्थापना, ‘आयुषमान भारत’सारख्या आरोग्यविषयक योजना लागू करून लोकांच्या मनात आशा निर्माण केली.

मोदींचा करिश्‍मा निर्विवाद आहे. त्यांनी देशातील जनतेची नस ओळखली आहे. लाखोंच्या समुदायाला नेमके काय आवडेल, याची जाण आहे. भारतीय समाज भावनेच्या लाटेवर स्वार होतो. त्यामुळेच मोदींच्या भाषणात देशाच्या सद्यःस्थितीपेक्षा राममंदिर, नवरात्री, मटण-मासे, राष्ट्रवाद असे मुद्ये वारंवार येतात. परंतु समाजाला फार काळ धर्माच्या प्रभावाखाली ठेवता येत नाही. त्यामुळे गेल्या काही सर्वेक्षणामध्ये जनतेला भेडसावणारे प्रश्न ऐरणीवर येत आहेत. जेव्हा मुख्य प्रश्न ऐरणीवर येतात तेव्हा जनतेच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेत्यांची गरज देशाला भासते.

वातावरणनिर्मितीचे प्रयत्न

शरद पवार पुरोगामी विचाराचे आहेत. धर्मनिरपेक्ष नेता, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त झाल्याचे विधान केले होते. तेच फडणवीस विधिमंडळात पवारांच्या कार्याचे कौतुक करतात. कृषिमंत्री म्हणून पवार यांची दशकभराची कामगिरी लक्षवेधी होती. तांदूळ निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख पवारांमुळेच झाली.

कापसाच्या गाठी वा साखर निर्यातीमध्ये भारताला जगात दुसऱ्या क्रमांकावर नेणारे पवारच आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संस्थेने पवारांनी कृषी क्षेत्रात केलेल्या क्रांतीचे कौतुक केल्याचे फडणवीस सांगतात, तेव्हा तो महाराष्ट्राचा गौरव ठरतो. संयुक्त पुरगामी आघाडीच्या (यूपीए) काळात शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींचे कर्जमाफ करण्यात पवारांचा मोठा वाटा राहिला.

त्यामुळे, पवारांनी काय केले? हा प्रश्‍न अप्रस्तुत ठरतो. हेच मोदी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना म्हणतात, ‘‘कोरोनावर सर्वपक्षीय बैठक बोलावली. काही पक्षांनी बहिष्कार टाकला. बहिष्काराचा निर्णय ‘यूपीए’चा नसल्याने पवार यांनी काही पक्षांशी बोलणे केले आणि तृणमूल कॉँग्रेससह अन्य नेत्यांना घेऊन बैठकीला हजर राहिले. यासाठी मी शरदरावांचे आभार मानतो.’’ एकदा मोदी म्हणाले होते, ‘‘मी मुख्यमंत्री असताना गुजरातच्या योजना ‘यूपीए’ सरकारकडून अडवल्या जायच्या त्या वेळी पवारच मदतीला यायचे’’.

चारशेपारच्या घोषणा करत भाजपने आक्रमकपणे प्रचार चालवला आहे. सर्व जाहिरातीत केवळ ‘मोदींची गॅरंटी’ आणि ‘मोदी सरकार’ असाच वाक्प्रचार आहे. मोदीच सत्तेत येतील, असे वातावरण निर्माण केले जात आहे. दुसरीकडे विरोधकांना नामशेष करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा काम करताहेत, अशी भावना जगभरच्या प्रमुख वृत्तपत्रांची भारतातील लोकसभेच्या निवडणुकीबाबत झाली आहे.

बेरोजगारी, महागाई, धार्मिक ध्रुवीकरण आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर मुख्यत: चीन, श्रीलंका, नेपाळ व मालदीवसारख्या शेजारी देशांशी बिघडलेले संबंध; मणिपूर, लडाखसारख्या सीमावर्ती राज्यांमधील अशांतता यावर नागरिकांमध्ये चिंता आहे. मात्र ती मतांमध्ये बदलू नये, यासाठी मोदी-अमित शहा यांचे प्रयत्न आहेत.

क्षमता, इच्छाशक्तीचे बळ

महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल आणि पंजाब ही राज्ये बंडखोर आहेत. जेथे स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा दिल्लीला रोखण्याची त्या राज्यात परंपरा आहे. पवारांच्या इतिहासावर आणि शक्तीस्थळावर नजर टाकल्यास त्यांच्यातील विविध पैलूंचे दर्शन होते. ते एकदा इंदिरा गांधींना भेटायला गेले. बाहेर आल्यावर पत्रकारांनी विचारले, ‘पवार साहब आपको पावर मिली?’ त्यावर ते उत्तरले, ‘नही, एनर्जी मिली’. ऊर्जा आणि शक्ती यांच्यातील फरक ज्यांना कळेल त्यांनाच पवारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची जाणीव होईल.

शरद पवार वयाच्या ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. त्यांच्यावर जितके आरोप झाले तितके महाराष्ट्रातीलच काय, देशातील कुठल्याही नेत्यावर झाले नसतील. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांनी देश हादरला. त्या वेळी पवारांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. त्याच वर्षी ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूरच्या किल्लारीमध्ये भूकंप झाला;

तेव्हा त्यांनी बजावलेल्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न पेटला. महाराष्ट्र जातीय दंगलीत होरपळू नये म्हणून पवारांनी नामांतराऐवजी नामविस्ताराची कल्पना मांडली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला. मात्र, पक्षांतर्गत आणि बाह्य विरोधकांनी त्यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली होती.

१९९५मध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. पवारांबरोबरील मैत्रीमुळेच मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्याची चर्चा होती. एकीकडे बाळासाहेब ठाकरे टोकाचा राजकीय विरोध पवारांना करत, मात्र व्यक्तिगत संबंध जपत. पवारांचे सर्व पक्षीय नेत्यांशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते. ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर, प्रकाशसिंग बादल, डॉ. फारूक अब्दुल्ला, प्रफुल्लकुमार महंत आदींशी त्यांचे जवळचे संबंध होते. पवारांची अस्थिर स्थिती आणि संकटकाळात काम करण्याची क्षमता मोठी आहे. त्याच्याच बळावर आजही ते निवडणूक रिंगणात उतरून सभा, बैठका गाजवत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ICAR Wheat DBW : आयसीएआरने विकसित केलेल्या गव्हाच्या सहा वाणांवर पंजाब कृषी विद्यापीठाचा आक्षेप; आयसीएआरचा दावा काय?

Bihar Election 2025: बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! खात्यात १० हजार, १० व्यांदा नितीश कुमार; लाडक्या बहिणींनी NDAला तारलं

Chickpea Sowing: हरभरा पेरणी अनेक भागांत पूर्ण

Cooperative Sector Opportunity: सहकार क्षेत्रामध्ये चांगली संधी

Local Body Elections: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगर परिषद, एका नगरपंचायतसाठी होणार निवडणूक

SCROLL FOR NEXT