Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प हरोली (जि. कोल्हापूर) येथे अवघ्या सहा महिन्यात कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे हरोली व जांभळी या गावांतील ७९० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे.
कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना राबविण्यात येत आहे.
राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वांत मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता. ५) वाशिम जिल्ह्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यामध्ये हरोली (जि. कोल्हापूर) येथील प्रकल्पाचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी (एकूण क्षमता १७० मेगावॉट) व सांगली जिल्ह्यात ३४ ठिकाणी (एकूण क्षमता २०७ मेगावॉट) सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत.
या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता ३७७ मेगावॉट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतिपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७५ कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारीदेखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.