Water crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : राज्यात पाणी टंचाई गंभीर वळणावर

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पावसाळ्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्याचे डिसेंबरपासून परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या वाढत आहे.

जानेवारीच्या अखेरीस टंचाई गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे. राज्यात तब्बल ४५६ गावे व १०८७ वाड्या वस्त्यांवर ५११ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या काळात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळ्यात लांबलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतीसह पिण्याचा पाण्यावर सुद्धा झाला आहे. जुलै अखेरीस तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणे जेमतेम भरली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये खंड पडला असून सप्टेंबरच्या अखेरीस काही प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे पाणीपातळी वाढली नसल्याने अनेक गावांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली होती. त्यानंतर जानेवारी अखेरीस १३ जिल्ह्यांत पाणी टंचाई सुरू झाली आहे.

यंदा सहा नोव्हेंबरच्या दरम्यान काही प्रमाणात टँकरची संख्या कमी झाली होती. साधारणपणे या कालावधी टँकरची संख्या ३२२ पर्यंत खाली आली होती. त्यानंतर टँकरच्या संख्येत वाढ होत गेली. १३ नोव्हेंबरच्या दरम्यान ३१६ गावे व ९३९ वाड्या रस्त्यांवर ३२७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.

त्यानंतर टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन २६ डिसेंबरच्या दरम्यान ४२२ गावे व ९९७ वाड्या वस्त्यांवर तब्बल ४५० टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. जानेवारी महिन्यात पाणीटंचाई आणखी तीव्र झाली आहे. त्यामुळे टँकरच्या संख्येत तब्बल ६१ ने वाढ होऊन ती ५११ टॅंकरपर्यंत पोहोचली आहे.

गेल्यावर्षी ३० जानेवारीच्या दरम्यान अवघे ३ वाड्यावस्त्यांवर दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षीचा विचार केल्यास टँकरची संख्या अधिक आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात काहीसा कमी पाऊस पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे टँकरची संख्या डिसेंबर महिन्यापासून वाढल्याचे दिसून येते. जळगाव, नगर जिल्ह्यात टंचाईची तीव्रता कमी आहे. पुणे विभागातील सातारा, सांगली कमी पावसामुळे संख्या वाढली आहे. साताऱ्यामध्ये ८० टँकर, तर सांगलीत ४३ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालन्यात टँकर वाढले

पावसाळ्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण काहीसे कमी होते. त्यामुळे भूजल पातळी फारशी वाढलेली नाही. जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९७ गावे व १३ वाड्यावस्त्यांवर १०५ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यातील ५८ गावे व २५ वाड्यावस्त्यांवर सर्वाधिक ११० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही जिल्ह्यांना भीषण पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.

मागील सात वर्षांतील जानेवारीअखेरीस गावनिहाय सुरू टँकरची संख्या :

वर्ष --- गावे --- वाड्या वस्त्या -- टॅंकर संख्या

२०२३ --- ० -- ३ -- ३

२०२२ -- ३-- १ -- २

२०२१ -- ० -- ० -- ०

२०२० -- १ -- ० -- १

२०१९ -- १५७६-- ३४४२ -- १८९१

२०१८ -- २०४ -- ० -- १५९

२०१७ -- २४ -- २३ --- ६४

जिल्हानिहाय टँकरची संख्या

जिल्हा -- गावे --- वाड्या वस्त्या -- टँकर संख्या

पालघर --- १ --- ३ --- २

नाशिक --- १२८ -- २५५ -- १२३

धुळे --- १ -- ० --- १

जळगाव --- १५ -- ० -- १६

नगर --- १५ -- ६३ -- १२

पुणे --- १० -- ६१ -- १२

सातारा --- ८० -- २९१ -- ८०

सांगली --- ४४ -- ३३८ -- ४३

सोलापूर -- ४ -- ३५ -- ४

छत्रपती संभाजीनगर -- ९७ -- १३ -- १०५

जालना -- ५८ -- २५ -- ११०

बीड -- १ -- ३ -- १

बुलडाणा -- २ --० -- २

मागील पन्नास वर्षांचा इतिहास पाहता, पावसाचे प्रमाण सरासरी इतकेच आहे. मागील दहा वर्षांत लोकसहभागातून खूप काही कामे केली गेली आहेत, पण भूजलपातळीत फार वाढ होताना दिसून येत नाही. एखाद्या वर्षी काही ठिकाणी भूजल पातळी वाढली तरी उपसा अधिक होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यंदा तर अत्यंत कमी पाऊस झाल्याने आणि भूजल पातळी न वाढल्याने टँकरची संख्या चार वर्षानंतर पहिल्यांदा वाढली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्या जलव्यवस्थापन कौशल्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
- उपेंद्र धोंडे, भूजल वैज्ञानिक, केंद्रीय भूजल विभाग, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT