Shaktipith Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipith Higway : आमच्या तर जगण्याचा आधारच हिरावला जाणार !

Land Acquisition : वळसे यांच्यासारख्या अनेक अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मनात शक्तिपीठ महामार्गाचा फक्‍त विषय निघाला तरीही धस्स होतं. उपजीविकेचे मुख्य साधनच शासन हिरावणार असल्याने या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘आमच्या जगण्याचा आधारच हिरावला गेला तर पुढे काहीच उरणार नाही. अत्यल्पभूधारकांची शेती हिरावल्यानंतर आमच्यावर विस्थापितांसारखे जगण्याची वेळ येईल, असे दुहेरी संकट आहे,’’ शक्तिपीठ महामार्गावर प्रतिक्रिया देताना काऊरवाडी गावच्या शैलेश वळसे (पाटील) या शेतकऱ्याचे डोळे पाणावले होते.

वळसे यांच्यासारख्या अनेक अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मनात शक्तिपीठ महामार्गाचा फक्‍त विषय निघाला तरीही धस्स होतं. उपजीविकेचे मुख्य साधनच शासन हिरावणार असल्याने या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. शैलेश यांच्याकडे केवळ अडीच एकर शेती. त्यात विहीर आणि वीज जोडणी आहे.

हे संपूर्ण क्षेत्र जाणार असल्याने ते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे यापुढील काळात अधिग्रहणाविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्‍त केला. वर्धा जिल्ह्यात ३६, तर यवतमाळ जिल्ह्यातून १२९ किलोमीटरचा मार्ग जाणार आहे. ज्या भागातून हा रस्ता जात आहे हा भाग केळी, ऊस यांसारख्या पिकांसाठी ओळखला जातो.

खडका गावचे पंजाबराव देशमुख खडकेकर यांची जमीन यापूर्वी नागपूर-तुळजापूर महामार्गाकरिता अधिग्रहित करण्यात आली होती. त्यापोटी मोबदलाही मिळाला. आता मात्र शासनाकडून गेल्या तीन वर्षांत खरेदी खत झालेल्या जमिनींच्या व्यवहाराचा आधार घेत सरासरी काढून चार पट मोबदला देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

खरेदीवरील खर्च कमी व्हावा याकरिता ही रक्‍कम कमी दाखविली जाते. यामुळे व्यवहाराबाबतही साशंकता आहे. कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असा निर्धार या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्याकरिता गावागावांत बैठका घेतल्या जात आहेत. यापूर्वी या भागातून गेलेल्या नागपूर-तुळजापूर या मार्गामुळे अनेकांच्या शेतीचे दोन तुकडे झाले.

अशा शेतीचे व्यवस्थापन करणे शक्‍य होत नसल्याने ते विकण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. आता या नव्या मार्गामुळे शासनाला कोणता विकास साधायचा आहे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. त्यामुळेच येत्या काळात अधिग्रहणाविरोधात टप्प्याटप्प्याने लढा तीव्र करण्याचा इशारा पंजाबराव देशमुख यांनी दिला.

एजंटांच्या फेऱ्या वाढल्या...

एजंटाच्या फळ्या गावागावांतील विरोध बैठकांना हजेरी लावत आहे. जमीन द्या, पहिला हप्ता घ्या; दुसऱ्या हप्त्यावेळी न्यायालयात जाऊ आणि वाढीव मोबदला मिळवून देऊ, असा दावा त्या करीत आहेत. परंतु मला माझी सुपीक जमीन द्यायचीच नाही, असे उटी येथील विनोद मैंद यांनी ठणकावले.

महामार्गात या तालुक्यांचा समावेश

- यवतमाळ जिल्हा : आर्णी (१६ गावे), पांढरकवडा, उमरखेड (सहा गावे), महागाव (१८ गावे), यवतमाळ (१२ गावे), कळंब (१६ गावे), घाटंजी (१ गाव).

- वर्धा जिल्हा : देवळी (दहा गावे), वर्धा (९ गावे)

‘एमएमआरडीए’ यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ड्रोन सर्व्हेक्षण होत आहे. त्यांची प्रक्रिया आटोपल्यानंतर कदाचित भूसंपादन होईल. तूर्तास भूसंपादनासाठी कोणतेच आदेश नसल्याने त्यावर बोलणे सयुक्तिक ठरणार नाही.
- सखाराम मुळे, उपविभागीय अधिकारी, उमरखेड, यवतमाळ
गावखेड्यांतील रस्त्यांची दुरवस्था आहे. पांदण रस्त्यांचा प्रश्‍न कायम आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ पक्ष, कार्यकर्ते यांचे आर्थिक हित साधण्यासाठी अशाप्रकारच्या गरज नसलेल्या कामावर भर दिला जात आहे.
- जगदीश नरवाडे, अध्यक्ष, जनआंदोलन आधार संघर्ष समिती
नदीजोड प्रकल्पाकरिता केवळ १८ हजार कोटी रुपयांची गरज आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यास पूरक ठरू शकतो. परंतु सत्ताधाऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी येणार नसल्याने त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात त्यांना स्वारस्य नाही. समृद्धी महामार्गाकरिता चटकन ७५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन हा पूर्ण होण्याआधीच या मार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर या मार्गावर सामान्यांचे किती बळी गेले हे संपूर्ण देशाने पाहिले. सत्ताधाऱ्यांना यातून झालेल्या अर्थार्जनातूनच पुढे खोके सरकार अस्तित्वात आले. त्यामुळेच विकासाऐवजी आर्थिक लाभ याच उद्देशातून कधी शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक सुलभ होईल म्हणून समृद्धी मार्ग, तर कधी देवांच्या नावावर शक्तिपीठ मार्ग असे भावनिक करून रस्ते तयार करण्यावर भर दिला जात आहे. दिल्ली-आग्रा या रस्त्याच्या कामावर प्रतिकिलोमीटर २५० कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला. त्यावर ‘कॅग’ने देखील आक्षेप घेतला आहे. परिणामी, रस्ते विकासाचा हा पॅटर्न केवळ सत्ताधाऱ्यांच्याच समृद्धीसाठी असल्याचे सिद्ध होते.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस
शेतकऱ्यांच्या शेतीमालाची जलद वाहतूक व्हावी याकरिता समृद्धी महामार्ग साकारण्यात आला. आता धार्मिकस्थळातून पर्यटनाला चालना देण्याकरिता शक्तिपीठ मार्ग होत आहे. यातूनही शेतकऱ्यांचे अर्थकारण समृद्ध होईल यात शंका नाही. रस्ते विकासाशिवाय देश विकास शक्‍य नाही ही बाब समजणे गरजेचे आहे.
- नामदेव ससाणे, भाजप आमदार, उमरखेड मतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Industrial Development: नवीन मोठ्या उद्योगांसह प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण: मंत्री छगन भुजबळ

ZP Election 2025: पाच तालुक्यांतील गटांच्या संरचनेत बदल

Farmer Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यामध्ये कोरडवाहू फळपिकांचे मोठे योगदान

Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

SCROLL FOR NEXT